अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात चोरांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून, गेल्या आठवडाभरात सलग झालेल्या चोऱ्यांमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. एकीकडे सर्वसामान्य नागरिक दहशतीखाली जगत असताना, दुसरीकडे शेवगाव पोलिसांची संशयास्पद आणि निरुत्साही भूमिका समोर आली आहे. विशेष म्हणजे, याबाबत जाब विचारणाऱ्या पत्रकारांना वरिष्ठांनी उलट उत्तरे देऊन टाळण्याचा प्रयत्न केला, तर खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षकांनीही फोन न उचलल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. चोरांच्या या मालिकेमुळे शेवगाव तालुक्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कुठे आणि कशी झाली चोरी?
शेवगाव तालुक्यातील अमरापूर, सुलतानपूर खुर्द, शहाजापूर आणि आव्हाने या परिसरात चोरट्यांनी हैदोस घातला आहे:
सुलतानपूर खुर्द : एका शेतकऱ्याच्या गोठ्यातून चोरांनी शेळ्या चोरून नेल्या.
अमरापूर (घटना 1) : सुभद्रा शिवराम पोटफोडे (वय80) यांच्या वर्षे गळ्यातील आणि कानातील सोन्याचे दागिने ती झोपेत असतानाच चोरट्यांनी लांबवले.
अमरापूर (घटना 2) : स्थानिक नागरिक एकनाथ चौधर यांच्या बांधकामाच्या ठिकाणी आणलेले 50 लोखंडी पत्रे चोरांनी थेट टेम्पो आणून पळवले. या चोरी गेलेल्या पत्र्यांची किंमत सुमारे 1 लाख रुपये आहे.
पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांचे प्रश्नचिन्ह
परिसरात सातत्याने चोरीच्या घटना घडत असूनही शेवगाव पोलीस याप्रकरणी गांभीर्याने तपास करत नसल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. पोलिसांच्या या दुर्लक्षामुळे संतप्त झालेले नागरिक 'आम्हाला सुरक्षेची हमी कोण देणार?ट असा सवाल उपस्थित करत आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा 'अजब' सल्ला
या सर्व प्रकाराबाबत माहिती घेण्यासाठी जेव्हा एबीपी माझाचे प्रतिनिधी सुरेश काटे यांनी शेवगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्याशी संपर्क साधला, तेव्हा त्यांची मुजोरी समोर आली. "आमची पेट्रोलिंग सुरू आहे, कोणाची तक्रार असेल तर त्यांनी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल करावी," असा अजब सल्ला त्यांनी दिला. तसेच तक्रारदारांना पोलीस ठाण्यात पाठवून द्या, असे उद्धट उत्तर देऊन विषय टाळण्याचा प्रयत्न केला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी फोन बंद केल्यामुळे प्रतिनिधींनी या गंभीर प्रकाराबाबत अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस अधीक्षक मुम्मका यांनीही फोन न उचलल्यामुळे या सर्व प्रकरणावर त्यांची कोणतीही प्रतिक्रिया समोर येऊ शकली नाही.
सर्वसामान्य नागरिकांनी दाद मागायची कोणाकडे?
स्थानिक पोलिसांची अरेरावी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष यामुळे शेवगाव तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. गुन्हे घडल्यानंतर उलट उत्तरे देऊन टाळले जात असेल आणि वरिष्ठ अधिकारीही प्रतिसाद देत नसतील, तर सर्वसामान्यांनी न्यायासाठी नक्की कोणाकडे जावे, असा सवाल आता विचारला जात आहे.
ही बातमी वाचा:
