Onion News : सध्या बाजारात शेतकऱ्याच्या (Farmers) कांद्याचा चांगला दर (Onion Price) मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे. चार पैसे अधिकचे त्यांच्या खात्यात जात आहेत. दरम्यान, अशातच कांद्याचे वाढते दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं (Central Govt) हालचाली सुरु केल्याची माहिती मिळत आहे. सरकार बफर स्टॉक केलेला कांदा बाजारात उतरवण्याच्या तयारीत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं म्हटलं आहे. सरकार शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचे धोरण राबवत असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप (Sandip Jagtap) यांनी केलीय.


शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचे धोरण


नाफेडच्या माध्यमातून केंद्र सरकारनं मोठ्या प्रमाणात कांद्याचा बफर स्टॉक केला आहे. तो बफर स्टॉक  बाजारात उतरवण्याची तयारी केंद्र सरकारनं केली असल्याचे संदीप जगताप म्हणाले. सध्या कांद्याला चांगला दर मिळत आहे. शेतकऱ्यांना चार पैसे मिळत आहे. यापूर्वी शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडले नव्हते. आज शेतकऱ्यांच्या खिशात चार पैसे पडत आहेत. मात्र, अशात जर सरकारनं कांद्याचा बफर स्टॉक बाजारात उतरवला तर शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचे काम सरकार करेल असे जगताप म्हणाले. 


...तर विधानसभेत देखील भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना दुष्परीणाम भोगावे लागतील


नाफेडमार्फत केंद्र सरकारनं शेतकऱ्यांनाकडून ज्या कांद्याची खरेदी केली आहे, तो कांदा सरकारनं जगातल्या इतर देशात विकावा. कारण परदेशात भारतीय कांद्याला मोठी मागणी असल्याचे जगताप म्हणाले. लोकसभेच्या निवडणुकीत भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाला कांद्याच्या धरसोडीच्या धोरणाचा मोठा फटका बसला होता. या मुद्यावरुन शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. आता आगामी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका पार्श्वभूमीवर जर केंद्र सरकारनं कांद्याचा बफर स्टॉक बाजारात उतरवला आणि शेतकऱ्यांच्या कांद्याचा दर पाडला तर येणाऱ्या विधानसभेत देखील भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना दुष्परीणाम भोगावे लागतील. स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील गप्प बसणार नाही, राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली आम्ही रस्त्यावर उतरु असा इशारा संदीप जगताप यांनी दिला आहे. 


दरम्यान, कांद्याच्या संदर्भात सरकारच्या धोरणाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. ज्यावेळी शेतकऱ्यांच्या कांद्याला दर होता, त्यावेळी देखील सरकारनं निर्यातबंदी करण्याचा निर्णय घेतला होता. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला होता. 


महत्वाच्या बातम्या:


बांगलादेशातील हिंसाचाराचा भारतातील शेतकऱ्यांना मोठा फटका, शेकडो ट्रक कांदा सिमेवर, राजू शेट्टींचं पंतप्रधान मोदींना पत्र