RBI News : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी RBI 90 क्विझ सुरू करण्याची घोषणा केलीय. ही राष्ट्रीय स्पर्धा आहे. आरबीआयला 90 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या क्विझमध्ये सामान्य ज्ञानाशी संबंधित प्रश्न विचारले जातील. ही एक बहुस्तरीय स्पर्धा असणार आहे. या स्पर्धेची सुरुवात ऑनलाइन असणार आहे. त्यानंतर स्थानिक आणि राज्य स्तरावर चाचणी होईल. त्यानंतर शेवटी राष्ट्रीय स्तरावर अंतिम स्पर्धा होईल. प्रत्येक राज्यातील विजेत्यांसोबत फायनल स्पर्धा होणार आहे.  


17 सप्टेंबर ही अंतिम तारीख


RBI च्या 90 क्विझ कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या संघांना विविध स्तरांवर आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. 20 ऑगस्टपासून यामध्ये भाग घेण्याची नोंदणी सुरु झाली आहे. 17 सप्टेंबर ही अंतिम तारीख आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.


विद्यार्थ्यांमध्ये रिझर्व्ह बँक आणि आर्थिक परिसंस्थेबद्दल अधिक जागरूकता निर्माण व्हावी


20 ऑगस्ट 2024 रोजी RBI90Quiz ऑनलाइन प्लॅटफॉर्म लाँच करण्यात आली आहे. यावेळी RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी विश्वास व्यक्त केला की प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांमध्ये रिझर्व्ह बँक आणि आर्थिक परिसंस्थेबद्दल अधिक जागरूकता निर्माण करण्यास मदत करेल. बँकिंग नियामक, आपल्या जनजागृती मोहिमेद्वारे, तरुणांना जबाबदार आर्थिक वर्तन विकसित करण्यासाठी आणि डिजिटल वित्तीय उत्पादनांचा सुरक्षित आणि सुरक्षित वापर करण्याची सवय विकसित करण्यासाठी प्रोत्साहित करत असल्याचे ते म्हणाले. या RBI 90 क्विझ कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या संघांना विविध स्तरांवर आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार असल्याचे ते म्हणाले. 


10 लाखांपर्यंत बक्षीसे जिंकण्याची संधी 


या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला 10 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. त्यानंतर 8 लाख रुपये आणि तिसरे बक्षीस 6 लाख रुपये आहे. झोनमधील प्रथम पारितोषिक 5 लाख रुपये, त्यानंतर 4 लाख रुपयांचे द्वितीय आणि 3 लाख रुपयांचे तृतीय पारितोषिक आहे. तर राज्यस्तरीय प्रश्नमंजुषामध्ये प्रथम पारितोषिक 2 लाख रुपये, त्यानंतर द्वितीय पारितोषिक 1.5 लाख रुपये आणि तृतीय पारितोषिक 1 लाख रुपये आहे.


या स्पर्धेत कोण भाग घेऊ शकतो?


RBI90Quiz हे अंडरग्रेजुएट विद्यार्थ्यांसाठी खुले आहे. ज्यांचे वय 1 सप्टेंबर 2024 रोजी 25 वर्षांपेक्षा जास्त नाही म्हणजेच 01 सप्टेंबर 1999 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेले त्यात सहभागी होऊ शकतात. जे भारतातील महाविद्यालयांमधून पदवीधर झालेत किंवा पदवी घेत आहेत ते यासाठी पात्र आहेत. यामध्ये सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. यामध्ये भाग घेण्यासाठी 20 ऑगस्टपासून नोंदणी सुरू होईल. तर 17 सप्टेंबरला नोंदणी संपणार आहे. प्रश्नमंजुषेची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. या क्विझमध्ये चालू घडामोडी, इतिहास, साहित्य, क्रीडा, अर्थव्यवस्था, वित्त आणि सामान्य ज्ञानाशी संबंधित काही प्रश्न देखील असू शकतात.


महत्वाच्या बातम्या:


RBI: मोठी बातमी! CIBIL स्कोरच्या संदर्भात RBI ने नियमात केला मोठा बदल, कर्ज घेण्यापूर्वी जाणून घ्या 'हा' नियम