Salary Hikes : दोन वर्षांपासून कोरोना महामारीने हाहा:कार माजवला आहे. कोरोना काळात अनेक व्यावसाय, कंपन्या तोट्यात गेल्या होत्या. जनजिवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. अनेकांना आपल्या नोकऱ्या गमावाव्या लागल्या. पण आता परिस्थिती बदलल्याचं चित्र आहे. त्यामुळे 2022 मध्ये नोकरदारांना चांगला पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. एका अभ्यासानुसार, 2022 मध्ये कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना सरसरी दहा टक्के पगारवाढ देण्याच्या तयारीत आहेत. कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळाल्यास ही पगारातील वाढ कोरोनाच्या कालावधीपूर्वीच्या पातळीवर पोहोचेल.  


कॉर्न फेरी इंडियाने (Korn Ferry India) आपला वार्षिक रिपोर्ट जारी केला आहे. कॉर्न फेरी इंडियाच्या रिपोर्ट्सनुसार, 2022 मध्ये कर्मचाऱ्यांना सरासरी 9.4 टक्के पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. 2021 मध्ये सरासरी  8.4 टक्के पगारवाढ मिळाली होती.  इतकेच नाही तर कोरोना महामारीपूर्वी 2019 मध्ये सरासरी  9.25 टक्के पगारवाढ झाली होती. कॉर्न फेरी इंडियाने घेतलेल्या सर्व्हेत व्यावसायिकांनी म्हटलेय की, यंदा व्यावसायावर कोरोना महामारीचा कोणताही प्रभाव होणार नाही. त्यामुळे कंपन्यांना नफा मिळवण्यास मदत होणार आहे.  


कंपन्यांवर दबाव - 
चांगली जीवनशैली आणि जास्त पैशांमुळे जवळपास 40 टक्के कर्मचारी नोकरी बदलण्याच्या तयारी आहे. त्यामुळे प्रतिभावंत कर्मचाऱ्यांना थांबवण्याचे आव्हानही कंपन्यांपुढे असेल. त्यासोबत कंपन्यांना सध्या मोठा नफा मिळत आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांना चांगल्या पगारवाढीची आपेक्षा आहे, असेही  कॉर्न फेरी इंडियाने म्हटलेय. 


म्हणून मिळेल चांगला पगारवाढ -  
मागील काही तिमाहीमध्ये कंपन्यांनी मोठा नफा झाल्याचे जाहीर केलं. कंपन्यांना झालेला नफा  व्यवसायाची कामगिरी, उद्योग मेट्रिक्स (industry metrics)  आणि बेंचमार्किंग ट्रेंडवर (benchmarking trends) अवलंबून असेल. त्याशिवाय प्रतिभावंत कर्मचाऱ्यांना थांबवण्याचे आव्हानही कंपन्यांपुढे असेल. त्यामुळे यंदा कर्मचाऱ्यांना मोठी पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे.  


आईटी सेक्‍टरमध्ये मिळेल सर्वाधिक पगारवाढ -
तंत्रज्ञान कंपन्या आपल्या क्रमचाऱ्यांना यंदा सरासरी 10.5 टक्के पगार वाढ देऊ शकते. त्याशिवाय कंज्‍युमर क्षेत्रात 10.1 टक्के,  लाइफ सायन्स  9.5 टक्के, सर्व्हिस, ऑटो आणि केमिकल कंपन्यामध्ये सरासरी 9 टक्के पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. 


वाय-फाय भत्ताही मिळणार -
कोरोना काळात अनेकांनी घरुनच काम केलं. यापुढेही घरुन काम करण्याची शक्यता आहे. काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची काळजी पाहाता कायमचे वर्क फ्रॉम होम हा पर्याय दिला आहे. कॉर्न फेरी इंडियाच्या सर्व्हेमध्ये सामाविष्ट असलेल्या 786 कंपन्यांपैकी 60 टक्के कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वाय-फाय भत्ता देणार असल्याचे सांगितलेय. यामधील दहा टक्के कंपन्यांनी प्रावस भत्ता कमी करण्याचा आणि रद्द करण्याचा विचार केला आहे.