Canada India Tension: दिल्लीत जी-20 समुहाची बैठक पार पडली. त्याच बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि जस्टिन ट्रुडो (Justin Trudeau)  यांच्यात एक विषेश बैठक पार पडली, या बैठकीत दोन्ही नेत्यांनी खलिस्तान्यांवरच चर्चा केली. त्याच बैठकीचा उल्लेख करत भारतातून कॅनडात परतल्याच्या तिसऱ्या दिवशीच कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडोंनी भारतावर गंभीर आरोप केले (Canada India Tensions) आणि संपूर्म जगभरात खळबळ माजली. भारतानं कॅनडाचे सर्व आरोप फेटाळून लावले असून कॅनडाच्या उच्चायुक्तांनीही देश सोडण्याचे आदेश दिले आहे. दरम्यान, कॅनडा आणि भारत यांच्यातील वाढत्या तणावामुळे व्यापारी जगतात चिंता वाढली आहे. 


भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यवहाराच्या बाबतीत कॅनडा नवव्या स्थानावर आहे. दोन्ही देशांमध्ये शैक्षणिक, औद्यागिक अशा अनेक क्षेत्रांमध्ये कोट्यवधींचे करार आहेत. मोठ्या व्यापार भागीदारी असलेल्या देशांमधील राजनैतिक स्तरावर सुरू असलेल्या वादामुळे कॅनडामध्ये कार्यरत असलेल्या भारतीय कंपन्यांसाठी समस्या निर्माण होऊ शकतात आणि त्यांच्याकडून तिथे केलेल्या प्रचंड गुंतवणुकीवर परिणाम होऊ शकतो. असे झाल्यास ही केवळ भारतीय कंपन्यांसाठीच नव्हे, तर कॅनडाच्या अर्थव्यवस्थेसाठीही  (Canada Economy)  चिंतेची बाब ठरेल, कारण या कंपन्यांमध्ये कॅनडातील हजारो लोक काम करतात.


सीआयआयनं प्रसिद्ध केलेला हा अहवाल 


कॅनडासाठी भारतीय कंपन्यांचं महत्त्व काय आहे आणि या कंपन्यांची तिथे किती मोठी गुंतवणूक आहे? यासंदर्भात याच वर्षी मे 2023 मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात आकडेवारीसह सविस्तर माहिती देण्यात आली होती. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) नं 'फ्रॉम इंडिया टू कॅनडा : इकॉनॉमिक इम्पॅक्ट अँड एंगेजमेंट' या शीर्षकाचा अहवाल प्रसिद्ध केला होता. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल टोरोंटो दौऱ्यावर असतानाच हा अहवाल जाहीर करण्यात आला होता.


कॅनडाच्या अर्थव्यवस्थेसाठी भारत महत्त्वपूर्ण 


सीआयआयच्या या अहवालात भारत केवळ श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ आणि आखाती देशांसाठीच नाही तर कॅनडासारख्या देशांसाठीही किती महत्त्वाचा आहे, हे आकडेवारीसह अधोरेखित करण्यात आलं आहे. कॅनडाच्या अर्थव्यवस्थेत भारतीय कौशल्यांचं योगदान आणि कॅनडातील भारतीय गुंतवणूक वाढल्याचं अहवालात म्हटलं आहे. यासोबतच कॅनडात भारतीय उद्योगांची वाढती उपस्थिती आणि एफडीआय, रोजगार निर्मितीमध्ये भारतीय कंपन्यांचं महत्त्व यावर प्रकाश टाकण्यात आला होता.


30 भारतीय कंपन्यांची मोठी गुंतवणूक 


'फ्रॉम इंडिया टू कॅनडा: इकॉनॉमिक इम्पॅक्ट अँड एंगेजमेंट' हा अहवाल पाहिला, तर सध्या सुरू असलेल्या कॅनडा आणि भारत यांच्यातील तणावाचा व्यवसाय क्षेत्रावर काय परिणाम होईल? याचा अंदाज येऊ शकतो. अहवालानुसार, कॅनडामध्ये 30 भारतीय कंपन्यांची उपस्थिती आहे आणि त्यांनी देशात केलेली गुंतवणूक 40,446 कोटी रुपयांची आहे. एवढंच नाही तर, दोन्ही देशांमधील सध्याच्या तणावापूर्वी, व्यापार संबंधांबद्दलच्या एका सर्वेक्षणाच्या अहवालात असं दिसून आलं आहे की, तिथे उपस्थित असलेल्या यापैकी 85 टक्के भारतीय कंपन्यांनी भविष्यात नाविन्यपूर्णतेसाठी निधी वाढवण्याची आशा व्यक्त केली आहे.


कॅनडात भारतीय कंपन्या देतायत 17 हजारांहून अधिक नोकऱ्या 


कॅनडामध्ये व्यवसाय करणाऱ्या भारतीय कंपन्यांच्या माध्यमातून 17 हजारांहून अधिक लोकांना रोजगार मिळाला आहे. या कंपन्यांचा R&D खर्च देखील 700 दशलक्ष कॅनेडियन डॉलर असल्याचं सांगितलं जात आहे. या अहवालात दावा करण्यात आला होता की, कॅनडामध्ये भारतीय व्यवसाय वाढत आहे, जे दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेसाठी चांगले आहे. आता भारत आणि कॅनडा यांच्यातील तणाव वाढू लागल्यानं तिथे व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांवरही याचा नक्कीच परिणाम होईल, असं दिसतंय. 


दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणूक


भारत आणि कॅनडामधील व्यापार सुलभता आणि चांगले संबंध यामुळे भारतानं तिथे मोठी गुंतवणूक केली आहे. कॅनेडियन पेन्शन फंडांनीही भारतात 55 डॉलर अब्ज गुंतवले आहेत. भारतीय आयटी कंपन्यांचा कॅनडामध्ये मोठा व्यवसाय आहे. याशिवाय सॉफ्टवेअर, नैसर्गिक संसाधनं आणि बँकिंग क्षेत्रात भारतीय कंपन्या सक्रिय आहेत. यामध्ये विप्रो आणि इन्फोसिससारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. दरम्यान, मागील वर्षी - 2022 मध्ये भारत हा कॅनडाचा दहावा सर्वात मोठा व्यापारी भागीदार होता. 2022-23 या आर्थिक वर्षात भारतानं कॅनडाला 4.10 डॉलर अब्ज किमतीच्या वस्तूंची निर्यात केली. तर कॅनडानं 2022-23 मध्ये भारताला 4.05 अब्ज डॉलरच्या मालाची निर्यात केली. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार 2021-22 मध्ये सात अब्ज डॉलर्स होता, जो 2022-23 मध्ये वाढून 8.16 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे.