नवी दिल्ली : माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाने जामीन दिल्यानंतर ते पुन्हा एकदा राजकीय क्षेत्रात सक्रीय झाले आहेत. चिदंबरम यांनी आज राज्यसभेतही हजेरी लावली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेस मुख्यालयात एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत चिदंबरम यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. चिदंबरम म्हणाले की, हे सरकार आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. जीडीपी आणि महागाईबद्दल बोलू दिले जात नाही, सरकारला प्रश्न विचारणाऱ्या लोकांना रोखले जात आहे.


चिदंबरम म्हणाले की, देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीही बोलण्यास तयार नाहीत. सुरुवातीला नोटबंदी, त्यानंतर चुकीच्या पद्धतीने लागू केलेला जीएसटी, कर दहशतवाद या सर्व कारणांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान झालं आहे. देशाचा जीडीपी सातत्याने घसरतोय. सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशाचा जीडीपी 4.5 टक्के आहे. परंतु हे सत्य नाही. देशाचा जीडीपी 1.5 टक्के इतका खाली घसरला आहे. या आकड्यांवरुन स्पष्ट होतंय की, देशाची अर्थव्यवस्था मोडखळीस आली आहे.

चिदंबरम म्हणाले की, देशभरात सर्व प्रकारच्या वस्तूंची विक्री कमी झाली आहे. कारण मुळात लोकांची मागणीच कमी झाली आहे. लोकांकडे पैसे नाहीत. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्येदेखील भीतीचे वातावरण आहे. युपीए सरकारच्या कार्यकाळात आम्ही देशातील 14 कोटी लोकांना गरीबीमधून बाहेर काढले. परंतु एनडीएने 2016 नंतर लाखो लोकांना पुन्हा गरीब केलं आहे. अर्थव्यवस्थेवरील मंदीचे सावट दूर करता येईल, परंतु हे सरकार त्यामध्ये अपयशी ठरले आहे.

106 दिवस तिहार जेलमध्ये घालवल्यानंतर चिदंबरम काल बाहेर आले. चिदंबरम म्हणाले की, 106 दिवसांनंतर मी तुमच्याशी बोलतोय. याचा मला खूप आनंद होतोय. सुप्रीम कोर्टाने काल माझ्याबाबत जो फैसला दिला, त्याबद्दल मी आभारी आहे. न्यायालयीन प्रक्रियेवर मी सध्या काही बोलणार नाही.

पाहा काय म्हणाले चिदंबरम?



वाचा : मोदींच्या कार्यकाळात विकासदर पुन्हा घसरला, जीडीपीने गाठली निचांकी पातळी