दिल्ली : देशाच्या जीडीपीमध्ये कमालीची घट झाली आहे. ही घट गेल्या सात वर्षातील सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचली आहे. केंद्र सरकारच्या वतीने आज जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार देशाचा आर्थिक विकास दर 2019-20 या चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत फक्त 4.5 टक्के इतका आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सेंट्रल स्टॅटिस्टिक ऑफिस म्हणजे केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने आज जीडीपीबाबतची आकडेवारी जाहीर केली.


यावर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी वृद्धी दर हा 5 टक्के इतका होता. तर मागील आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीमध्ये जीडीपीचा वृद्धी दर हा 5.8 टक्के इतका होता. 30 जून 2018 रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाही अखेर हा दर 8 टक्के होता. या आकडेवारीवरुन लक्षात येतंय की मोदींच्या कार्यकाळात देशाचा अर्थिक विकासदर सातत्याने घसरत चालला आहे.

मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर म्हणजे उत्पादन क्षेत्रातील घसरण गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत फक्त फक्त 0.6 टक्के आहे. गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत हा दर 12.1 टक्क्यांवर होता. कृषि, जंगल संपत्ती आणि मत्स्य व्यवसाय यातील वृद्धीही दोन टक्क्यांपर्यंत घसरली आहे. गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत ही वृद्धी 5.1 टक्के होती. त्याशिवाय बांधकाम आणि गृहनिर्मिती क्षेत्र, व्यापार, हॉटेल, वाहतूक आणि दळणवळण या क्षेत्रातही घसरण आहे.

खणीकर्म - खाणव्यवसाय तसंच विद्युत, गॅस, पाणीपुरवठा यासारख्या लोकोपयोगी सेवा क्षेत्रात मात्र वाढ झाल्याचं आकडेवारीवरून पाहायला मिळतं. सर्वसामान्य ग्राहकांची क्रयशक्ती कमी झाल्याने ऑटोमोबाईल आणि अन्य क्षेत्रातली मागणी कमी झालीय. त्यामुळेच जीडीपीच्या वृद्धी दरात घसरण झाली आहे.