मुंबई : अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सडकून टीका केली. यावर उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी पलटवार केलाय.



राज्यात कोरोनाची गंभीर परिस्थिती असताना राज्य सरकारने अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. मात्र, विरोधकांना राजकारणचं करायचे असल्याने त्यांना ते दिसणार नसल्याचे अजित पवार म्हणाले. पेट्रोल-डिझेल करात सूट न दिल्याने करण्यात आलेल्या टीकेवर अजित पवार म्हणाले, की केंद्राने इंधनावर भरमसाठ कर लावला आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेल दर कमी करण्यासाठी केंद्रानेच कर कमी करायला हवेत. कोविड संकटामुळे राज्यात आर्थिक परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे इंधनावरील टॅक्स कमी करता येणार नाही. उलट केंद्राकडे असलेले राज्याचे पैसे त्यांनी लवकर द्यावे, अशी आशाही अर्थमंत्र्यांनी व्यक्त केली.


Maharashtra Budget 2021: राज्यातील अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये


भाजपचे आरोप बिनबुडाचे
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, त्यामुळे तिचा विकास होणंही आवश्यक आहे. मात्र, असे करताना महाराष्ट्रातील कुठल्याही भागावर अन्याय झालेला नाही. त्यामुळे भाजपने केलेला आरोप बिनबुडाचा आहे. उलट फडणवीस सरकारने विदर्भाला दिलेल्या निधीमध्ये आम्ही तीन टक्क्यांनी वाढ केल्याचे अजित पवार यांनी सांगितले तर मराठवाड्यालाही 18 टक्के निधी देण्यात आला आहे.


महिला दिनानिमित्त विशेष सवलत
स्त्रीमुळं घराला घरपण येतं, त्या घरावर तिचं नाव असावं, महिला सक्षमीकरणाच्या प्रक्रियेचाच तो भाग आहे, असं म्हणत राज्यातील तमाम महिलांच्या अपेक्षेला न्याय देणारी राजमाता जिजाऊ गृहस्वामीनी योजना आणण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे राज्यात कोणतंही कुटुंब घर विकत घेईल, त्या घराची नोंदणी गृहलक्ष्मीच्या नावावर करण्यात येणार आहे. 1 एप्रिल 2021 पासून घर खरेदेची नोंदणी त्या कुटुंबातील महिलेच्या नावावर झाल्यास मुद्रांक शुल्काच्या प्रचलित दरात सवलत देण्यात येणार असल्याचंही अर्थमंत्र्यांनी बोलताना स्पष्ट केलं.