जन्मल्यापासून शहरात राहत असल्याने गावाशी तसा फारसा कधीच संबंध आला नाही... त्यामुळे गावाकडच्या गोष्टी म्हणजे नेमक्या काय असतात याची खासियत मला जास्त काही माहित नव्हतीच म्हणा... कोकणातलं छोटसं माझं गाव... ते ही आजवरच्या उभ्या आयुष्यात फक्त 3 वेळा दोन - दोन दिवस मुक्कामी गावी गेले त्यामुळे 'गाव' ही गोष्टच कमी परिचयाची...


इथे मुंबईत आपण जॉब करतो... कसल्या ना कसल्या चळवळीत भाग घेतो... स्त्रीवादावर मोठं मोठ्या चर्चा करतो याचं अप्रूप खूप होतं... पण गावापर्यंत हे सगळं कसं न्यायचं? हे आजवर तरी समजू शकलेलं नव्हतं. त्यातच ऑफिसमधून साताऱ्याच्या जाखणगावात जाऊन एबीपी माझा आणि पाणी फाऊंडेशन तर्फे महिला दिन साजरा करायचं ठरलं...

जायच्या आधीच मनात एक गोष्ट नक्की होती की आपण जरी एका दिवसासाठी जात असलो तरी ही गोष्ट म्हणजे मोहीम आहे... रोज एसीच्या हवेवर दिवस घालवत जगणाऱ्या आम्हाला आता भर उन्हात कुदळ फावड्याने माती खणून चर तयार करायचे होते... गेल्या पर्वातलं वेगवेगळ्या गावात झालेलं जलसंधारणाचं काम मी सुद्धा टीव्हीवर बघितलं होतं. आयुष्यात शेत पाहण्याचा कधी अनुभवही नव्हता...त्यामुळे मला भयंकर उत्सुकता होती...

मुळात जेव्हा आपण मनापासून जगायचं ठरवतो तेव्हा आजूबाजूला घडणारी प्रत्येक गोष्ट आपण नकळत आपल्या मनावर तिचा ठसा ठेवून जात असते... तशीच काहीशी ही गोष्ट...काही दिवसांपूर्वी मी लिहिलेला शेर मला चटकन आठवून गेला, "घेऊन ती भटकते दुष्काळ जीवनाचा माझ्या घरात वाहे चोवीस तास पाणी..."

ही गावातली आणि शहरातली दुर्दैवी परिस्थिती प्रचंड वेदनादायी असली तरी खरी होती... चाळीत राहायचे तेव्हा पाण्यासाठी नळावर होणारी भांडणं ओळखीची होती त्यामुळे आपण पुढच्या एका दिवसात जे काम करू ते जीव ओतून करू इतकं मनाशी पक्कं केलं...



गावातल्या लोकांचा उत्तम पाहुणचार... मुलांनी सादर केलेलं नाटक , गाणी सगळं छोटेखानी पण सुरेख होतं... गोष्ट छोटी असली तरी ती निर्मळ असली की जास्त समाधान देणारी असते. तशी सगळी गावातली माणसं होती. डोक्यावरुन पदर घेतलेल्या बायका... पंजाबी ड्रेसमधल्या मुली... आणि हिरहिरीने भाग घेणारी पुरुष मंडळी... आणि जीन्स टी शर्ट मधले शहरातले आपण... या सगळ्यात 'आपण महिला दिनासाठी' आलोय हे सतत डोक्यात फिरत होतं.

गावात शिरल्यापासून फक्त प्रसन्न आणि आनंददायी वाटत होतं. प्रवासाचा थोडा थकवा होता पण तरीही सगळ्याजणी प्रत्येक गोष्टीत जोमाने सहभागी होत होत्या. दुसऱ्या दिवशीचं पहाटेचं चांदणं... माझ्यातल्या लेखिकेच्या मनात कित्येक कविता रेंगाळत ठेवणारं होतं... त्यानंतर मोकळ्या माळरानावरून पाहिलेला लालभडक सूर्य नसानसात चैतन्य पेरून गेला...

साताऱ्याचं थंडगार पाणी.... जणू काही कित्येक युगांची तहान भागवणारं ठरलं...आणि तळपत्या उन्हात हातात कुदळ घेऊन खणलेले दोन चर म्हणजे आपल्याही मनगटात असणाऱ्या ताकदीला आजमावणं होतं...!

एरव्ही वही पेन घेऊन पावसावर, मातीवर, झाडा झुडुपांवर कित्येक कविता लिहिल्या... पण त्या दिवशी हातात पेनाऐवजी कुदळ होती आणि सोबत होता अंगांगाला चिकटून राहिलेला जिवंत मातीचा गंध...!जो मी आजवर कधीही अनुभवला नव्हता...

पाणी फाऊंडेशनच्या वतीने काम तर झालं... महिला दिनही साजरा झाला. पण यातून साध्य काय? असं जर कुणी मला विचारलं तर मला इतकंच सांगावंसं वाटतं की आताही ज्या महिलांना पुरुषांच्या बरोबरीची वागणूक नाही त्या सगळ्या जणी आमच्यात मिसळल्या... हसल्या...नाचल्या... गायल्या... खेळल्या... घरची चूल काही काळासाठी विसरून सामील झाल्या... मनसोक्त भिडल्या... त्यामुळे आमच्यातल्या प्रत्येकीने तिथल्या प्रत्येकीच्या मनात थोडासा आत्मविश्वास निर्माण केला... त्यांच्या मनगटात असणारं बळ आम्हालाही मिळालं...



हा इव्हेंट म्हणजे एक निमित्त असलं तरीही जाखणगावातली प्रत्येक स्त्री आता स्वबळावर कोणत्याही संकटाचा सामना करू शकते हा विश्वास त्यांच्यात निर्माण झालाय हाच मुळात या विशेष महिला दिनाच्या सेलिब्रेशनचा सर्वांग परिणाम... पाणी असो कि मग आयुष्य... कोणत्याही पातळीवरची लढाई जिंकण्याची धमक आणि प्रेरणा त्या महिलांनी आम्हाला दिली...

इथे मुंबईसारख्या शहरात... लखलखत्या इमारतींमधून वावरत असताना आता प्रत्येक गावच्या प्रत्येक कोपऱ्यात असणारी स्त्री सक्षम व्हायला हवी. ही 'जिद्द' आणि त्यासाठी माझाही महत्वाचा सहभाग असायला हवा ही 'वृत्ती' जाखणगावच्या त्या मैत्रिणींनी माझ्या मनात निर्माण केलीय...

दोन दिवसांच्या जाखणगावच्या कुशीत मी राहिले... हिंडले... खेळले... मनापासून मनापर्यंत जगले.... पण दोन दिवसांच्या दोन गोष्टी मनाच्या भिंतीवर कायमच्या कोरल्या गेल्या.
पहिलं म्हणजे - पाण्याचं महत्व
आणि दुसरं म्हणजे - बाईचं स्थान....!!!

शेतकऱ्यांच्या शिवरात या घाम जरा गाळूया
माती पाणी वाऱ्यालाही चला साद घालूया


धरतीलाही हवीहवीशी पाऊस आबदानी
मातीसाठी जिरवत राहू थेंब थेंबाने पाणी


कुदळ, फावडा हाती घेऊ चला करू सुरुवात
मातीच्या गर्भात खेळू दे पाणी, गाणे गात


चला सख्यांनो आभाळाशी घट्ट करूया नाते
तिच्यातूनही उमलून येईल हिरवे हिरवे पाते

दुष्काळावर मात करूया, फुलवू शिवार सारा
संकटास या ठोकर देऊ स्त्री शक्तीचा नारा


- यामिनी दळवी