ICC World Cup 2023 Semifinale, IND vs NZ: धडाकेबाज बॅटिंग, जिगरबाज फिल्डिंग आणि धारदार बॉलिंग. निकाल - भारत (Team India) 70 धावांनी विजयी. विश्वचषकाच्या (World Cup 2023) आज झालेल्या वानखेडे स्टेडियमवरील (Wankhede Stadium) सेमी फायनलमधल्या (World Cup 2023 Semifinale) यादगार विजयाचं हेच वर्णन करावं लागेल. अर्थात त्यात किवींच्या फायटिंग परफॉर्मन्सलाही दाद ही द्यावीच लागेल तरीही विश्वचषकाच्या रणांगणात रोहितसेनेने (Rohit Sharma) किवी सैनिकांचा पाडाव केला आणि फायनलच्या युद्धात प्रवेश केलाय. विजयाचा फरक जरी तब्बल 70 धावांचा असला तरी किवींच्या गट्सी परफॉर्मन्सचं कौतुक करावं लागेल. खास करुन दोन बाद 39 वरुन मिचेल-विल्यमसन जोडीने गाडी ट्रॅकवर आणत भारताला टेन्शन दिलं होतं. 32.1 ओव्हर्समध्ये दोन बाद 220. त्यात शमीने विल्यमसनचा एक कॅच सोडल्याने ब्लडप्रेशर आणखी वाढलेलं. पण, त्याच शमीने नंतर विल्यमसन आणि लॅथमची विकेट एकाच ओव्हरमध्ये काढत 140-80 ची नॉर्मल ब्लडप्रेशर रेंज आपल्याला गाठून दिली. सेमी फायनलचा हा सामना खरोखरच विश्वचषक स्पर्धेच्या सेमी फायनलसारखा झाला. अटीतटीचा..थरारक. न्यूझीलंड टीम चिवट, झुंजार आहे, ते मॅच कधी सोडत नाहीत. याबाबतीत ते ऑसी टीमसारख्याच लढाऊ बाण्याने खेळतात. आज 398 चं टार्गेट त्यात नॉक आऊट सेमी फायनल असतानाही त्यांनी जो खेळ केला त्याला तोड नाही. डॅरिल मिचेलने पुन्हा एकदा आपण किती धोकादायक फलंदाज आहोत ते दाखवून दिलं. तो प्रत्येक ओव्हरच्या बरोबर चौथ्या किंवा पाचव्या चेंडूवर अटॅक करुन रनरेट दहाच्या घरात जाऊ देत नव्हता. त्यात भारत पाचच गोलंदाज घेऊन खेळत असल्याने रोहितसाठी ती तारेवरची कसरत होती. ती त्याने शिताफीने पार पाडली. मोहम्मद शमी पुन्हा एकदा भारताच्या विजयाचा प्रमुख नायक ठरला. पहिल्या चार सामन्यात प्लेईंग इलेव्हनमध्ये नसलेल्या शमीने नंतर संघातील स्थान हे फेव्हिकोलच्या मजबूत जोडपेक्षा पक्क केलं. प्रत्येक मॅचमध्ये देखणा परफॉर्मन्स देत त्याने संघाच्या विजयाच्या मुकुटात एकेक तुरा खोवला. सहा सामन्यात 5,4,5,2,7 अशा सातत्यपूर्ण विकेट्स त्याने काढत प्रतिस्पर्धी संघाची फलंदाजी कापून काढलीय. मैदान कुठलंही असो, खेळपट्टी कुठलीही असो, शमीचा वेग, टप्पा आणि वैविध्याने भल्या भल्या फलंदाजांना सळो की पळो करुन सोडलंय. वानखेडेची खेळपट्टी पाटा असल्याने इथे आपल्या गोलंदाजांवरदेखील किवींनी मोठ्या धावा वसूल केल्यात. म्हणूनच सपाट खेळपट्टीवर शमीने घेतलेलं विकेट्सचं पीक म्हणून त्याची कामगिरी आणखी उजवी ठरवतं. तीच बाब बुमराची. बुमराने दबावाच्या क्षणी फिलिप्सची विकेट घेत बहरत जाणाऱ्या मिचेलसोबतच्या पार्टनरशिपला सुरुंग लावला. दुसरीकडे जडेजाची विकेट्सची पाटी कोरी राहिली. तर त्याने  ती कसर बाऊंड्रीवर प्रेशर सिच्युएशनमध्ये तीन कॅचेस घेत भरुन काढली.


एकूणात फलंदाजे रचिला पाया, गोलंदाजांनी चढवला कळस असंच म्हणावं लागेल. एक तर आपण टॉस जिंकलो आणि बॅटिंग घेतली.  रोहित शर्माची रन फेरारी वानखेडेवर आली आणि त्याच वेगात धावा करुन नव्हे लुटून गेली. 29 चेंडूंत चार चौकार, चार षटकार 47 धावा. धावांच्या पावसाचा हा ट्रेलर होता. कारण, पुढे शुभमन गिल 66 चेंडूंत 80, कोहली 113 चेंडूंमध्ये 117, श्रेयस अय्यर 70 चेंडूंत 105 आणि राहुल 20 चेंडूंत 39 अशी सुनामी आली.  सेमी फायनलच्या मंचावर 397 चं लक्ष्य गाठणं सोपी गोष्ट नाही. म्हणूनच ते गाठणाऱ्या भारताला आणि त्याचा झुंजार पाठलाग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या किवींनाही मार्क्स द्यायला हवेत. भारतीय फलंदाजांबद्दल खास करुन कोहलीबद्दल लिहायला आता शब्द नाहीयेत. हा माणूस पॅव्हेलियनमध्ये सेट होऊन येतो आणि मैदानात उतरुन शतकाचे सोपस्कार पूर्ण करतो, असंच म्हणावं लागेल. रोहितच्या रनवेवर कोहलीचं विमान  आकाशात इतक्या उंच घिरट्या घालतंय की, प्रतिस्पर्धी संघाची नजर तिथे पोहोचतच नाहीये. 10 सामन्यात 5 अर्धशतकं आणि तीन शतकं. धावा त्याच्या बॅटमधून झऱ्यासारख्या नव्हे धबधब्यासारख्या वाहतायत. पण, हा धबधबा कोसळणारा नाहीये, संथ तरीही आश्वासक प्रवाहासारखा आहे. त्याच्या खेळींमध्ये चौकार, षटकारांची संख्या अन्य फलंदाजांच्या तुलनेत कमी असली तरी स्ट्राईक रेट 100 च्या जवळचा आहे. एकेरी-दुहेरी धावाही तो जिवाच्या आकांताने धावतोय. अगदी मुंबईसारख्या घामटा काढणाऱ्या वातावरणातही त्याने नऊ चौकार, दोन षटकार ठोकले. म्हणजे 48 धावा फटक्यांमधून काढल्या तर, 69 धावा पळून काढल्या. तरीही स्ट्राईक रेट होता 103.53 चा. कोहलीची महानता इथे दिसते. या मैदानात आज विक्रमांमागून विक्रम त्याने काबीज केले. त्याने 49 वनडे शतकांचं सचिन शिखर मागे टाकलं.  विश्वचषकातल्या सर्वाधिक वैयक्तिक धावांचा विक्रमही आपल्या नावावर केला. रोहित, कोहलीचं कौतुक करत असताना गिल आणि श्रेयसच्या तडाखेबाज बॅटिंगवरही लिहावं लागेल. रोहित आऊट झाल्यावर फेरारीचा फक्त ड्रायव्हर बदलला. तिथे शुभमन आला आणि त्यानेही त्याच गियरमध्ये बॅटिंग केली. क्रॅम्प्समुळे तो पॅव्हेलियनमध्ये गेला नसता तर चौकार, षटकारांचे आणखी स्फोट पाहायला मिळाले असते. तीच गोष्ट श्रेयस अय्यरची. पहिल्या काही सामन्यात सेट झाल्यावर श्रेयस बाद होत होता. त्याच श्रेयसने गेल्या चार सामन्यात 82, 77, नाबाद 128 आणि 105 अशी मोठ्या इनिंगची माळ लावलीय. शतक काढणं ही सवय असते. कोहली, रोहितला ती आहे. आता श्रेयसही लावून घेतोय, हे भारतीय क्रिकेटसाठी सुचिन्ह आहे.


मॅच जिंकल्यावर वानखेडेबाहेर निळ्या टीशर्टमधल्या चाहत्यांचा समुद्र अवतरलेला, जो आधी आतमध्येही होता. त्याच वेळी हाकेच्या अंतरावर असलेल्या मरिन ड्राईव्हच्या किनाऱ्यापलीकडच्या जलसागराला या फॅन्सच्या महासागराने नक्कीच कॉम्प्लेक्स दिला असेल. वानखेडेची खेळपट्टी ही गोलंदाजांसाठी परीक्षा घेणारी होती. तर, इथलं वातावरण सर्वच खेळाडूंसाठी फिटनेस टेस्ट घेणारं होतं. अशा सगळ्या आव्हानात्मक स्थितीत आपण सलग दहावा सामना जिंकला आणि दिमाखात फायनल गाठलीय. येत्या रविवारी होणाऱ्या फायनलमध्ये समोर दक्षिण आफ्रिका किंवा ऑसी टीम असेल. मैदान अहमदाबादचं असेल. जीवाचे डोळे करुन मॅच पाहणारे एक लाख चाहते मैदानात आणि कोट्यवधी चाहते देशभरात नव्हे जगभरात.  दिवाळी एक्सटेंड झालीय. विजयी फटाक्यांची माळ लागलीय. नऊ बॉम्ब फोडून झालेत. तेव्हा रोहितसेनेला आता सांगूया,  फायनलमध्ये विजेतेपदाचा महाबॉम्ब फोडूनच या. तोपर्यंत बढते रहो, लडते रहो, जीतते रहो...