नोट- या लेखाद्वारे कोणत्याही हॉस्पिटल, वैद्यकीय सेवेचा अवमान करण्याचा हेतू नाही. 


अत्यावश्यक सेवेत येत असल्यानं दररोज घराबाहेर पडणं होतंच, त्यामुळे कोरोना आपल्याला कधी ना कधी तरी होणार, हे मी गृहित धरुनच होते. 3 जुलैला रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. मला किंचितही भीती वाटली नाही, कारण माझ्या मनाची तयारी आधीच झालेली. अंधेरीतील एका हॉस्पिटलमध्ये भरती झाले. स्पेशल वॉर्ड असूनही एका रुममध्ये 3 जण होते. माझ्या बाजूलाच अस्थमाचा पेशंट होता, बाजूला म्हणजे अगदी हाताच्या अंतरावरच त्याचा बेड होता. कोरोना आणि अस्थमा असल्याने या पेशंटसाठी सतत नर्सेसचं ये-जाणं असायचं. त्यामुळे धड रात्रीची झोपही मिळत नव्हती. सकाळी 5 वाजताच ब्लड टेस्ट घेतली जात, त्यामुळे झोपेचं अगदी खोबरंच व्हायचं. मी धडधाकट असूनही त्या पेशंटला पाहून मात्र आपल्यालाही काहीतरी होईल, अशी मनात सतत भीती होती.


बेड्सच्या तुटवड्यामुळे त्यांनी एक दिवस अख्खा कोरोना वॉर्ड दुसरीकडे शिफ्ट केला आणि मला जनरल वॉर्डमध्ये टाकलं, जिकडे 6 कोरोना रुग्ण होते. ते पाहूनच माझ्या मनात धस्स झालं. कारण सगळेच सीरियस पेशंट्स. तातडीने मी त्यांना मला स्पेशल वॉर्डमध्येच ठेवण्याची विनंती केली आणि जनरल वॉर्डमध्येच ठेवणार असाल, तर स्पेशल वॉर्डचे पैसे आकारायचे नाहीत, असं ठणकावलं. संध्याकाळी आठच्या सुमारास त्यांनी मला परत स्पेशल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं. मला तिथे शिफ्ट करताना त्यांनी तो बेड सॅनिटाईज करण्याचीही तसदी घेतली नव्हती. एका रुग्णाला डिस्चार्ज मिळाला आणि त्या बेडची फक्त बेडशिट बदलून मला तिथे ठेवलं. ही बाब त्यांच्या लक्षात आणून दिल्यावर मग त्यांनी सॅनिटाईज करण्याचे सोपस्कार केले. तिथे मला पाणीही तासाभरानंतर दिलं. या वॉर्डमध्ये एक रुग्ण 24 तास ऑक्सिजनवर होता, त्या बाई उठल्या तरी माझ्याच बेडचा आणि टेबलचा आधार घेत, याने माझ्या आरोग्याचा धोका वाढणारा होता. दुसरा पेशंट 24 तास खोकत होता, तो मास्क काढूनच खोकत असल्याने तिथे राहणं माझ्यासाठी कठीण झालेलं. मी ठणठणीत असतानाही सतत असे गंभीर रुग्ण पाहून माझी मानसिक स्थिती ढासळली.



मध्यरात्री दीड वाजता मी पुन्हा नर्सेसना विनंती केली की मला इतक्या गंभीर रुग्णांसोबत ठेऊ नका, अन्यथा माझ्या रिकव्हरीत अडचणी येतील. माझ्यातली सगळी लक्षणं गेलेली, पण या गंभीर रुग्णांसोबत राहून मला पुन्हा काही तरी होईल, अशी भीती सतत मनात होती. एवढ्या रात्री काहीच होऊ शकत नाही असं एका वाक्यात मला नर्सेसनी उत्तर दिलं. रात्री पावणे दोन वाजता मी ज्युनियर डॉक्टरशी बोलले. मला झोपेची गोळी देण्यावाचून तिला बहुधा दुसरा पर्याय सुचला नसावा. गोळीमुळे मी झोपले, पण दुसऱ्या दिवशी मला ते वॉशरुम वापरण्याची काही एक हिंमत होईना. कारण वॉर्डमधील रुग्ण वॉशरुममध्ये जाऊनही भयंकर खोकला काढत असे. मी पुन्हा नर्सेसचे हात-पाय जोडले. संध्याकाळपर्यंत वॉर्ड बदलू असंच उत्तर मिळालं. पण तो पर्यंत वॉशरुमला जाण्यापासनं कसं थांबणार? दुपारी बाराच्या ठोक्याला हाऊस कीपिंगवाले वॉशरुम स्वच्छ करुन गेले. त्यानंतर मी ब्रश केला आणि जवळ असलेलं एक मोसंबी खाल्लं. रात्री नऊला जेवलेले आणि सकाळी सातला उठलेले मी, दुपारी 12 पर्यंत उपाशीच होते. कसाबसा मी दिवस ढकलला. अखेर संध्याकाळी मला एक रुम मिळाली, जिथे सुदैवाने एकही पेशंट नव्हता. समोरील रुममध्येही तिन्ही रुग्णं सलाईनवर जरी असले, तरी धडधाकट होते.


माझ्या हॉस्पिटलमधील पाचव्या दिवसाची ही संध्याकाळ होती. म्हणजेच शुक्रवारी भरती झालेले मी, मंगळवारपर्यंत प्रचंड मानसिक त्रासातून जात होते. या रुममध्ये माझ्या बेडवरुन पॅसेज दिसत होता. सहाव्या दिवशी अचानक एक पेशंट पॅसेजमध्ये माझ्या रुमसमोरच भोवळ येऊन कोसळला. ही घटना खरोखरच धडकी भरवणारी होती. काय करायचं काहीच सुचेना, तेवढ्यात नर्सेस आल्याच. तातडीने त्यांनी व्हीलचेअर आणली आणि त्याला वॉर्डमध्ये नेलं. प्रत्येक रुममध्ये स्पीकर होते. दहा मिनिटांतच त्यावरुन आम्हाला घोषणा ऐकायला आली. इमर्जन्सी असल्याचं डॉक्टरांना सांगण्यासाठी ही घोषणा होती.



आजूबाजूचे गंभीर रुग्ण, हॉस्पिटलचं वातावरण, गोळ्यांव्यतिरिक्त कोणतीही ट्रीटमेंट होत नसल्याने सतत कॉन्शिअस असणारी मी, मानसिकरित्या खचले. इतक्या निगेटिव्हिटीमुळे मला तिथे अजिबात राहावत नव्हतं. या सगळ्यात एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली, ती म्हणजे कोरोना रुग्णाच्या मानसोपचाराकडे पूर्णपणे होणारं दुर्लक्ष. हॉस्पिटलकडे मागणी करुनही सायकोलॉजिस्ट उपलब्ध झाला नाही. माणूस जितका शरीरानं आजारी असतो, तितकाच मनानंदेखील. मुंबईतल्या काही कोविड सेंटरमध्ये दिवसातनं एकदा तरी योगा सेशन केलं जातं. पण हॉस्पिटलमध्ये ही थेरपी वापरली जात नाही. मानसोपचार वैद्यकीय टर्म असूनही कोरोनासारख्या गंभीर आजारात या उपचारांना का स्थान नाही, हा प्रश्न सतावतो. ज्या आजारात माणसाला मरणाचा धोका आहे, त्या रुग्णाची मन:स्थिती काय असेल, याचा विचार का नाही केला जात?


कोविड रुग्ण असल्यानं तुम्हाला कुणीही भेटायला येऊ शकत नाही, तुमच्या रुमबाहेर पडण्याची तुम्हाला परवानगी मुळीच नसते. एरवी ज्या व्यक्तीला झोपायचे सात तास सोडून बेडवर बसायलाही वेळ नसतो, असा मुंबईकर दिवसभर कसा-काय बेडवर पडून राहिल? ज्या हॉस्पिटलमध्ये मी होते, तिथल्या झाडूनपुसून सर्व नर्सेस या दाक्षिणात्य होत्या. त्यामुळे बहुतांश जणींना हिंदी कळतच नसे. क्वचितच एखादी तुमच्याशी मनमोकळेपणाने बोलत असे, पण तेही जेवढ्यास तेवढं, वायफळ बडबडीला वाव नव्हता. त्या आपापसात त्यांच्याच भाषेत बोलत असल्यानं त्यांचं बोलणं ऐकूनही कशाचाच मेळ लागत नसे. अशा वेळी दिवसभर करायचं काय? कुटुंबियांना माझ्या या त्रासाचं टेंशन येईल, म्हणून त्यांच्याशी मी या गोष्टी बोलणं टाळलं.



मी कोविडची गंभीर रुग्ण नव्हते, त्यामुळे हॉस्पिटलमध्ये एकाच खोलीत राहून मला फक्त गोळ्या घेऊनच कोरोनावर मात करायची होती. सकाळी 10 ते 12 दरम्यान डॉक्टर राऊंडवर असायचे, त्यानंतर मात्र दिवसभर कुणी फिरकायचंही नाही. तो एकटेपणा आणि रुग्णालयातील निगेटिव्हिटीमुळे माझं मानसिक स्वास्थ्य बिघडलं, त्यावेळी त्याला मानसोपचाराची जोड मिळाली असती, तर कदाचित रिकव्हर व्हायला मला सात दिवस लागलेच नसते. हा मानसोपचार केवळ रुग्णांनाच नाही तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही तितकाच महत्वाचा आहे. चार महिने एकाच पठडीतलं काम आणि उकाड्यात पीपीई किट घालून काम करणं सोपी गोष्ट नाही. या सगळ्यामुळे त्यांनाही मानसिक थकवा होता, परिणामी रुग्णांसोबत बोलताना त्याच्यात कटुता असायची.

एरवी एखाद्या गोष्टीची भीती वाटली, तर आपण त्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करतो, पण कोविड वॉर्डमध्ये ते शक्यच नाही. सकारात्मक विचार करुनही इथे काहीही होत नाही, आणि त्यानं प्रश्न सुटतही नाहीत. तेव्हा कोरोनासारख्या आजारात प्रत्येक रुग्णाला एकदा तरी मानसोपचार मिळायला हवे.