National Handloom Day 2023 : हातमागावर तयार होणाऱ्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळावी तसेच या वस्तूंची मागणी वाढावी, यासाठी 7 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून साजरा केला जातो. 2015 साली चेन्नईमध्ये 'इंडिया हँडलूम' या ब्रँडचे अनावरण करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7 ऑगस्ट हा दिवस हातमाग दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली.  


हातमाग म्हणजे काय? 


ज्या यंत्रावर किंवा मशीनवर कापड विणले जातं, त्याला 'माग' म्हणतात. यावर हाताच्या सहाय्याने वस्त्र विणले जाते म्हणून त्याला 'हातमाग' म्हटले जाते. हातमागावर सुती किंवा रेशमी कापड उभ्या आणि आडव्या धाग्यांनी विणले जाते. 


7 ऑगस्टला हातमाग दिवस का साजरा केला जातो? 


स्वातंत्र्य चळवळीत स्वदेशी वस्तू वापराचा नारा देण्यात आला. या स्वदेशीच्या ठिणगीने देशातल्या हातमाग उद्योगाला नव्याने चालना मिळाली. विदेशी वस्तूंची होळी करुन 7 ऑगस्ट 1905 रोजी ‘स्वदेशी’चा नारा देण्यात आला. याच स्वदेशी आंदोलनाची आठवण म्हणून आणि या क्षेत्रात काम करणाऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 'राष्ट्रीय हातमाग दिवस' साजरा करण्यात येतो.


हातमागाच्या वस्तूंचा वापर का करावा?


भारत वैविध्यपूर्ण देश आहे. भारतात अनेक भाषाचे, संस्कृतीचे लोक एकत्र गुण्यागोविंदाने राहतात. तशाच विविध कला या भारत भूमीत आहेत. त्यातलीच एक कला म्हणजे हातमाग. हातमाग व्यवसाय हा देशातील सर्वात जुन्या उद्योगांपैकी एक उद्योग आहे. देशातील ग्रामीण भागातील लोक मोठ्या प्रमाणावर या व्यवसायाशी जोडले गेले आहेत. आपल्या देशात शेतीनंतर हातमाग व्यवसाय हा दुसऱ्या नंबरचा सर्वात मोठा रोजगाराचा पर्याय आहे. हातमागावर कापड विणण्याची कला पारंपरिक आहे. आपल्या देशातल्या विविध राज्यांमध्ये विविध कला आहेत. त्यामुळे आपल्या या व्यवसायातून देशातील विविध कलेंचे आणि संस्कृतींचे नमुने जपता येतात. त्यासोबत पर्यावरणपूरक आणि पारंपरिक वस्तूंचा ठेवा जपला जाऊन, त्या तयार करणाऱ्या कारागिरांना प्रोत्साहन मिळतं. जवळपास देशभरातील 45 लाखांहून अधिक लोक या उद्योगावर अवलंबून आहेत. 


परंतु वाढत्या कारखानदारीमुळे आणि स्पर्धेमुळे भारतातील हातमाग व्यवसाय सध्या अडचणीच्या गर्तेत सापडला आहे. त्यामुळे अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. मशीनवर तयार होणारं वस्त्र तुलनेने कमी किंमतीत बाजारात उपलब्ध असल्याने त्याकडे अनेकांचा कल पाहायला मिळतो.


हातमागावरचं वस्त्र उंची किंमतीला असलं तरी त्यामुळे अनेकांना रोजगार मिळून अर्थव्यवस्थेला चालना देणारं आहे. प्रत्येकवेळी हे खरेदी करणं शक्य नसलं तरी प्रत्येकाकडे एखादं तरी हे असणं अभिमानाचं आहे. याच उदाहरण द्यायचं झालं तर एका साडीमुळे १५ कारागिरांना रोजगार प्राप्त होतो. हे कापड टिकाऊ असल्याने रिसायकल पद्धतीने देखील पुन्हा वापरता येते. त्यामुळे हातमागाच्या कापडाचं महत्व आणि सुंदरता वापरल्यानंतरच लक्षात येणारं आहे. 


हातमागाच्या वस्तूंना त्या तयार करणाऱ्या कारागिरांना बळ मिळावं म्हणून देशभरात प्रदर्शनं आणि बाजारपेठा भरवल्या जातात. मिनिस्टरी ऑफ टेक्स्टाईलनेही वेगवेगळे प्रकल्प राबवून हातमाग व्यवसायाला उभारी देण्याचे प्रयत्न करत आहे. यामुळे छोट्या व्यावसायिकांना विणकरांशी थेट संपर्क करणं शक्य होत आहे. 


भारतातल्या वस्त्रउद्योगाला प्रचंड मोठा इतिहास आहे. आपल्या या पारंपरिक कलेची, बदलत्या काळानुरुप गुंफण घालली तर ही कला जगभरात दिमाखात पोहचण्यास मदत होईल. मात्र या सगळ्यासाठी सर्वात आधी आपण ही परंपरा टिकवणं, रुजवणं आणि वाढवण्याची गरज आहे. जगाच्या पाठीवर भारताची कलात्मक ओळख टिकवून ठेवणाऱ्या असंख्य हातमाग कारागिरांना 'राष्ट्रीय हातमाग दिवशी सलाम!