महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी मनसे आणि अध्यक्ष राज ठाकरे यांना अखेरचा जय महाराष्ट्र केला आणि राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या. सारं जग इकडचं तिकडे होईल, पण आदित्य शिरोडकर मनसे सोडून शिवसेनेत जातील असा विचारही कुणाच्याही डोक्यात आला नसावा. काय आहेत त्याची कारणं? आणि त्यांनी मनसे का सोडली असावी?


आदित्य शिरोडकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण का सोडली?
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आणि मनसेचे सरचिटणीस आदित्य शिरोडकर यांनी पंधरा वर्षांच्या कारकीर्दीत दाखवलेली राजकीय चमक किंवा प्रगल्भता लक्षात घेता त्यांनी मनसे का सोडली, याची दखल घ्यायला पाहिजे का, हा प्रश्न आहे. पण आदित्य शिरोडकर यांच्याऐवजी त्यांचे वडील राजन शिरोडकर यांनी राज ठाकरे आणि त्यांच्या मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र का केला, हा प्रश्न मनसैनिकांच्या डोक्यात नक्कीच भुंगा घालणारा आहे.


वास्तविक एखाद्या जुन्याजाणत्या मनसैनिकानं राज ठाकरे यांना अखेरचा जय महाराष्ट्र करणं आणि शिवसेनेत प्रवेश करणं ही बाब राजकीयदृष्ट्या फार नवी किंवा धक्कादायक अजिबात राहिलेली नाही. किंबहुना ताटातलं वाटीत किंवा वाटीतलं ताटात काढून ठेवावं इतक्या सहजतेनं मनसैनिक शिवसेनेत किंवा राजकीय कारकीर्द उतरणीस लागलेले शिवसैनिक मनसेत जात येत असतात. पण आदित्य शिरोडकर आणि त्यांचे वडील राजन शिरोडकर यांनी मनसे सोडणं मनसैनिकांना (कदाचित राज यांनाही) भावनिकदृष्ट्या धक्का देणारं ठरावं.


त्याचं कारण आहे... राज आणि राजन शिरोडकर यांच्यातलं नातं अभंग होतं. अगदी कालपरवापर्यंत. राज ठाकरे वयाच्या विशीत असताना शिवाजी पार्कचं हॉटेल जिप्सी आणि सेनाभवनात फुललेल्या दोस्तीचं हे नातं आहे. त्या काळात राजन हे भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष होते.  वयानं मोठे होते. पण त्यांनी आणि त्यांच्यासोबतच्या समवयीन सहकाऱ्यांनी काळाची पावलं ओळखून तरुणतुर्क राज यांचं नेतृत्व स्वीकारलं आणि प्रत्येक प्रसंगात त्यांना साथ दिली. भाविसे, शिवसेना आणि मनसे अशा प्रत्येक पावलावर राजन शिरोडकर हे राज यांच्या साथीला होते. त्या दोघांची भागीदारी राज यांना महाराष्ट्राच्या राजकारणात स्वत:ची स्पेस निर्माण करून देणारी आणि मातोश्री रिअॅल्टर्सच्या व्यवसायात दोघांनाही उत्कर्षास नेणारी होती.


राज यांच्या राजकीय प्रवासात राजन यांनी नेहमीच पडद्यामागची, पण कणखर भूमिका बजावली. मनसेच्या सभा आणि प्रचार-प्रसाराचं आर्थिक नियोजन प्रामुख्यानं राजन म्हणजे मनसैनिकांच्या ‘राजनदादा’नं नेमानं सांभाळलं. त्या काळात राजन यांनी मनसेत पद मागितलं असतं तर मनसेत ते नक्कीच नंबर टू झाले असते. पण ते कायमच पडद्यामागे राहिले आणि मनसेच्या स्थापनेच्या वेळी त्यांनी आपल्या लेकाला आघाडीवर धाडलं. आदित्य मनविसेचा अध्यक्ष होता, मनसेचा सरचिटणीस होता. त्यानं 2014 साली दक्षिण मध्य मुंबईतून लोकसभेची निवडणूकही लढवली. तो हरला, पण मनसेच्या नावानं 73 हजार मतं घेऊन.


त्यानंतर गेल्या पाच-सहा वर्षांत असं काय घडलं की राज ठाकरे आणि राजन शिरोडकर यांच्यातली भागीदारी पहिल्यांदा व्यवसायात फुटली आणि मग राजकारणातही. कोहिनूर टॉवर्स प्रकरणात राज ठाकरे यांच्यासह राजन शिरोडकरांचीही ईडीकडून चौकशी झाली होती. पण त्याआधीच दोघांचं व्यावसायिक नातं तुटलं होतं, असं म्हणतात. पण नाराज मनसैनिकांना चुचकारणं किंवा आर्थिकदृष्ट्या कमकुवत झालेल्या कार्यकर्त्यांना एम टॉनिक (मनीपॉवर) पुरवणं ही कामं त्यांचा ‘राजनदादा’ करत होता. मग राज आणि राजन यांच्यातल्या नात्यात इतकी कटुता का आणि कधी आली?


आदित्य शिरोडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला, त्यावेळी राजन शिरोडकर हेही पुन्हा शिवसेनेत दाखल झाले आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांच्या लेकानं माध्यमांशी बोलताना दिली आहे. पण याहीवेळी त्यांनी पडद्यामागे राहून आपल्या लेकाला म्हणजे आदित्य शिरोडकरला फोकसमध्ये ठेवलं आहे. 1980च्या दशकाच्या अखेरीस राज ठाकरे यांचं नेतृत्व स्वीकारताना राजन शिरोडकर यांनी त्यावेळी काळाची पावलं ओळखली होती असं म्हणतात. आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना अखेरचा जय महाराष्ट्र करतानाही त्यांनी काळाची पावलं पुन्हा ओळखली असं म्हणायचं की, मनसैनिकांचे राजनदादा आणि राजसाहेब एकमेकांवर नाराज आहेत?


राज ठाकरे आणि राजन शिरोडकर यांच्यामध्ये नेमकं काय झालंय, याची कदाचित त्यांना निकटवर्तियांनाच कल्पना असू शकेल, पण राजन शिरोडकरांनी उचललेलं हे पाऊल किमान दादर-प्रभादेवी-माहीम परिसरातल्या मनसैनिकांचा हक्काचा आधार काढून घेणारं ठरलं आहे. पण त्याच वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आदित्य शिरोडकरांच्या पक्षप्रवेशाला दिलेलं महत्त्व दादर-प्रभादेवी-माहिममधल्या शिवसेनेच्या प्रस्थापित नेतृत्वाला अस्वस्थ करणारं आहे.


राजकारणात एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाणारे 99 टक्के कार्यकर्ते आणि नेते हे आपमतलबी असतात. मीडिया त्यांना त्या काळात प्रसिद्धी देऊन खूपच मोठं करतो, असा आजवरचा अनुभव आहे. पण मनसे टू शिवसेना किंवा शिवसेना टू मनसे हा प्रवास अनेकदा लहानमोठ्या रुसव्याफुगव्यांचा असतो. कारण या दोन पक्षांच्या बांधणीत फारसा फरकही नाही. त्यामुळं इथून तिथे किंवा तिथून इथं जाणारा नव्या वातावरणात सहज रुळतो. पण राजन शिरोडकरांनी आणि याआधी मनसेचे दिवंगत नेते अतुल सरपोतदारांची पत्नी शिल्पा सरपोतदारांनी शिवसेनेत जाणं यांत त्यांचं वैयक्तिक हित आणि राज यांच्या नेतृत्वाचंही अपयशही आहे का?


राज ठाकरे यांचं शिरोडकर, सरपोतदार किंवा नाशिकच्या अतुल चांडक कुटुंबाशी एका काळात घट्ट मैत्रीचं आणि कमालीचं भावनिक नातं होतं. त्या मंडळींनी मनसे सोडली, त्या घडामोडीची छगन भुजबळ, नारायण राणे आणि दस्तुरखुद्द राज ठाकरे यांनी शिवसेनेत केलेल्या राजकीय बंडांशी अजिबात तुलना करता येणार नाही. कदाचित राज यांच्यासोबत राहताना विविध (स्थानिक आणि दरबारी राजकारण, व्यवसाय, पुढच्या पिढीचं हित वगैरे) स्तरांवर होणारी कोंडी फोडण्याचा तो प्रकार असावा. त्याची उत्तरं अर्थातच मनसेनं शोधायला हवीत? पण राजनदादांचा आदित्य शिरोडकर किंवा अतुल-शिल्पा यांचा लेक यश यांना अमित ठाकरेंच्या मनसेत महत्त्वाचं स्थान मिळालं असतं का? कारण राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांची पहिली पिढी अजूनही राजकीयदृष्ट्या तरुण आहे. त्यामुळं मनसेत आपल्याला भविष्य आहे का किंवा निवडणुकीचं तिकीट मिळालंच तर राज ठाकरे यांचा करिश्मा आता आपल्याला जिंकून आणेल का, याविषयी त्यांच्या मनात शंका पिंगा घालत असावी. अर्थात या साऱ्या जर तरच्या गोष्टी आहेत. कारण प्रवीण आणि प्रकाश दरेकर बंधू, संजय आणि संजना घाडी दाम्पत्य, दिलीप लांडे, शिरीष पारकर अशी मनसे सोडून इतर राजकीय पक्षात घरोबा करणाऱ्या नेत्यांची यादी मोठी आहे. आणि त्या प्रत्येकाचं मनसे सोडण्याचं कारण वेगवेगळं असावं.


टीप- लेखातील मतं लेखकाची व्यक्तिगत मतं आहेत.