Blog : आधी जयंत सावरकर (Jayant Sawarkar) आणि नंतर शिरीष कणेकर (Shirish Kanekar). सरलेल्या आठवड्यात दोन दिवसात हे दोन दिग्गज आपल्याला सोडून गेलेत. या दोघांशीही माझं असं एक नातं जडल्याने दोघांचंही जाणं जास्त चटका लावून गेलंय.


जयंत सावरकर आमचे पक्के गिरगावकर. अण्णा नावाने खास परिचित. त्यांच्याशी घट्ट नाळ जुळण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे ते गिरगावातल्या आमच्या आर्यन शाळेचे माजी विद्यार्थी. नुकताच म्हणजे 19 फेब्रुवारीला शाळेचा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्धापन दिन साहित्य संघ मंदिरमध्ये साजरा झाला, त्या कार्यक्रमात ज्या माजी विद्यार्थ्यांनी आपापल्या क्षेत्रात कर्तृत्वाची मोहोर उमटवलीय. त्यांचा प्रातिनिधीक सन्मान सोहळा झाला होता. ज्यात अण्णाही एक सन्मानमूर्ती होते. आपलं मनोगत व्यक्त करताना शाळेबद्दल, आपल्या प्रवासाबद्दल बोललेही भरभरुन. शाळेबद्दलची त्यांची ओढ, ओलावा शब्दाशब्दात जाणवत होता. त्या कार्यक्रमात त्यांना देण्यात आलेल्या सन्मानचिन्हाबाबत खास सतर्क होते. सन्मानचिन्ह शाळेकडून मिळाल्यानं त्याचं मोल त्यांच्यासाठी आणखी खास होतं. ते खरं तर स्वत:च अभिनयाची शाळा होते. स्वत:च्या फिटनेसबद्दल कमाल जागरुक होते. शिस्त नसानसात भिनलेले. त्यांच्याकडून एका पत्रकार पुरस्कार सोहळ्यात माझाही सन्मान झाला होता, हे माझं भाग्य.


शाळेच्या त्या कार्यक्रमातली भेट अण्णांसोबत झालेली शेवटची भेट ठरली. अरुण पुराणिक आणि दिलीप ठाकूर या दोन ज्येष्ठांसोबत मी गिरगाव या विषयाला वाहिलेल्या कॅलेंडरची निर्मिती केली होती. तेव्हा अण्णांची प्रतिक्रिया त्यात प्रकाशित केली होती, त्यात अण्णा गिरगाव आणि शाळेबद्दल दिलखुलास बोलले होते. या प्रतिक्रियेमध्ये अण्णा म्हणतात, साने गुरुजी, समतानंद अनंत हरी गद्रे अशा दिग्गजांची व्याख्यानं मला इथे ऐकायला मिळाली. मॅजेस्टिक थिएटरमध्ये उत्तमोत्तम सिनेमे मी पाहिले. दाजी भाटवडेकरांसोबतची माझी मैत्रीही इथलीच, साहित्य संघामुळे विजया मेहता, सुधा करमरकरांशीही स्नेह निर्माण झाला. इति – अण्णा सावरकर.


आपल्याला सोडून गेलेले दुसरे दिग्गज ख्यातनाम लेखक शिरीष कणेकर. त्यांच्या जुन्या पुस्तकांच्या पुढच्या आवृत्तीचं प्रकाशन झाल्याची बातमी अलिकडेच मला ज्येष्ठ सिने लेखक दिलीप ठाकूरांनी पाठवली होती. धबधब्यालाही लाजवेल इतकं प्रवाही लिखाण कणेकर सरांनी केलंय. शिवाय 'फिल्लमबाजी', 'फटकेबाजी'सारखा मराठीत तुलनेने विरळ असलेला टॉक शोसारखा प्रकार त्यांनी लोकप्रिय केला. लोकांच्या मनात रुजवला. त्यांच्या लेखणीबद्दल मी काय लिहिणार? आणि बोलणार? उपरोध, तिरकसपणा, टोले, अलंकारिक, टपली मारणे, खुसखुशीत, चुरचुरीत, त्याच वेळी एखादा मेसेज देणे अशी अनेक सौंदर्य स्थळं मिरवणारी त्यांची लेखणी.


कधी गुदगुल्या करणारी, कधी हसवणारी तर कधी आतमध्ये खोलवर भिडणारी. त्याला सॅल्यूट आहे. त्यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्ताने 'एबीपी माझा'वर त्यांची मुलाखत घेण्याचा योग आला होता. तेव्हा त्यांच्या लेखनाचा प्रवास त्यांनी या मुलाखतीत उलगडला होता. 1964 मध्ये त्यांनी लिहिलेल्या पहिल्या क्रिकेटविषयक लेखापासून गप्पा रंगत गेल्या. स्वत:वरही अलगद विनोद करत बोलण्याची त्यांची शैली मनापासून भावली.


क्रिकेट, सिनेमा ही आपणा जनसामान्यांच्या आयुष्यातली दोन अशी क्षेत्र ज्यांनी आपलं जगणं सुसह्य केलंय. अशाच दोन क्षेत्रांचे पदर कणेकर सरांनी उलगडून दाखवले. लतादीदी तर त्यांच्या मनाचा हळवा कोपरा. व्यक्तिगत नातं जपताना त्यांनी दीदींवर लिहिलेले लेख आपल्याला नॉस्तॅल्जिक करतात. आठवणींच्या पडद्याने लपेटून टाकतात. त्यांच्या अंत्यदर्शनाला गेलो तेव्हा त्यांचे शिवाजी पार्क कट्ट्यावरचे मित्र संजय मोने, अतुल परचुरे, विनय येडेकर, अजित भुरे ही मंडळी त्यांना निरोप द्यायला आली होती. अतुल परचुरेंच्या भावना सारं काही सांगून जाणाऱ्या होत्या. ते म्हणाले, आमचा शिवाजी पार्क कट्टा जर ऑर्क्रेस्टा असेल तर कणेकर त्याचे कंडक्टर होते.


कणेकर सरांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना सहा जूनला फोनही केला होता. तेव्हाही त्यांनी नेहमीप्रमाणेच आपुलकीने सांगितलं होतं, अरे नुसता फोनवर काय बोलतोस, घरी गप्पा मारायला ये एकदा. त्यांच्याकडे जाणं राहिलंच. तेच निघून गेले... आता असा फोनही होणार नाही आणि असं प्रेमाचं निमंत्रणही मिळणार नाही. त्या गप्पांची माझी भूक तशीच राहणार कायम. तरी कणेकर सरांच्या लेखणीतून आणि त्यांच्या कार्यक्रमांच्या व्हिडीओजमधून ती भागवण्याचा प्रयत्न करेन.


अण्णा सावरकर काय किंवा कणेकर सर काय, ही दोन्ही माणसं 80 च्या घरातही किती पॉझिटिव्ह आणि एनर्जिटिकली कार्यरत होती. हे मला काही प्रमाणात तरी व्यक्तिगत अनुभवता आलं. आजच्या धकाधकीच्या जगात आम्ही जेव्हा घड्याळाच्या काट्यावर जगतो, तेव्हा दमछाक होत असल्याची तक्रार करत राहतो, तेव्हा ही मंडळी 80 च्या घरात असतानाही विशीच्या तरुणाचा उत्साह घेऊन, झपाटलेपण घेऊन कमाल काम करताना पाहिली. त्यांच्यासाठीही 24 तास आहेत आणि आमच्यासाठीही. क्रिएटिव्हिटी अन् मेहनतीला शिस्तीची जोड दिली तर माणूस किती उंची गाठू शकतो, याचा उत्तम वस्तुपाठ म्हणजे हे दोघेही दिग्गज. या दोघांच्याही जाण्याने आपण बरंच काही गमावलंय. पण, या दोघांच्याही जगण्यातून त्यांनी आपल्याला खूप काही दिलंय. या दोघांच्याही योगदानाला विनम्र अभिवादन आणि दोघांनाही आदरांजली.