नरेंद्र मोदी गुजरातमध्ये जवळपास 13 वर्ष मुख्यमंत्री होते. या काळात त्यांच्या कामाची शैली अशी होती की त्यांनी पक्षातले आणि पक्षाबाहेरचे विरोधक हळुहळू निष्प्रभ करुन टाकले.  या कामात अमित शाहांनी सावलीसारखी त्यांची सोबत केली. तिथला अनुभव आणि कार्यशैली त्यांना देशपातळीवर सुद्धा कामाला आली. 2014 पासून देशपातळीवर मोदी विरोधक भरपूर निर्माण झाले पण मोदीशाहांना तुल्यबळ लढत देऊ शकेल असा मोठा प्रतिस्पर्धी तयार होऊ शकला नाही. जे बाकीचे छोटे मोठे नेते विरोधी पक्षात होते त्यांना सामदाम दंडभेद वापरत आपलंस केलं गेलं, भाजपचा दुपट्टा गळ्यात घ्यावाच लागेल असं वातावरण तयार केलं गेलं. महत्वाच्या राज्यात सत्ता मिळवण्यासाठी ऑपरेशन लोटस राबवलं गेलं. महाराष्ट्रात 2019  साली  उद्धव ठाकरेंनी अचानक फारकत घेत मविआसोबत सत्ता स्थापन केल्यानं भाजपचं गणित चुकलं.. 


खरंतर  2019 ला भाजप शिवसेना युतीला मतदारांनी बहुमताचं दान दिलं, मात्र त्यात बंद खोलीतल्या राजकीय वचनाचा आणि राजकीय अतिमहत्वाकांक्षांचा अडसर आला आणि लोकांनी निवडून दिलेलं स्थिर युती सरकार प्रत्यक्षात बनलंच नाही. उद्धव ठाकरेंनी काही महिन्यांपूर्वी कट्टर राजकीय शत्रूत्व होतं अशा काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणं पसंत केलं. त्यावेळी भाजपने वाट पाहून प्लॅन ए वापरला होता, राष्ट्रवादीलाच सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्याचं नियोजन झालं होतं मात्र ऐनवेळी शरद पवारांनी माघार घेतली आणि अजितदादा नेहेमीप्रमाणे फ्रंटवर लढण्यासाठी एकटेच पोहोचले. सकाळी सकाळी देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांना एकत्र शपथ घेताना पाहून भलेभले गरगरले होते. त्याचं पुढं काय झालं, काय अडथळे आले हे आपल्याला एव्हाना माहिती झालंय.   


नंतरच्या अडीच वर्षात उद्धव ठाकरेंच्या मनधरणीचे सुद्धा भरपूर प्रयत्न केले गेले. गुप्त बैठका झाल्या, मविआमधून बाहेर पडत एकत्र यायचा मुहूर्त ठरल्याच्या बातम्याही एकदोन वेळा आल्या. पण कदाचित संजय राऊत असतील, कदाचित शरद पवार असतील कदाचित आणखी कुणी, उद्धव ठाकरेंच्यासमोर त्यांच्या शक्तीचं योग्य चित्र ठेवलंच गेलं नाही. त्यामुळे स्वत:बद्दलचा आणि मोदीशाहांच्या कार्यपद्धतीबाबतचा..राजकीय रुथलेसनेसबाबतचा त्यांचा अंदाज चुकत गेला. केंद्रातील सत्ता आणि तपास यंत्रणा हातात असलेल्या.. उद्धव ठाकरेंनी खेळवत ठेवल्यामुळे भ्रमनिरास झालेल्या.. इगो दुखावला गेलेल्या भाजपने अखेर प्लॅन बी अॅक्टिवेट केला. महाशक्तीने बळ दिल्याने एकनाथ शिंदेंंनी त्यांच्या आयुष्यातील आणि राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठी जोखीम घेतली. उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा हादरा बसला.  


त्यानंतरही गोष्टी अत्यंत वैयक्तिक घेतल्या गेल्या, त्याने कटुता आणखीनच वाढत गेली. दोन्ही पक्षातील नेत्यांचे संबंध कधी नव्हते तेवढे बिघडले.  आता वेळ अशी आलीय की बाळासाहेबांनी मेहनतीने वाढवलेला, आयता हातात दिलेला पक्ष सुद्धा उद्धव ठाकरेंच्या हातून निसटला आहे... एक एक शिलेदार दुरावला आहे. श्रीधर पाटणकर, सुरज चव्हाण, रविंद्र वायकर, अनिल परब, राजन साळवी, वैभव नाईक अशा जवळच्या माणसांमागे तपास यंत्रणांचा ससेमिरा लागलेला आहे.  हे सगळं टाळायचं असेल तर भाजपसोबत जुळवून घेेण्याचा सल्ला शिवसेनेच्या प्रताप सरनाईक यांनी सर्वात आधी म्हणजे 2021 मध्येच उद्धव ठाकरेंना दिला होता मात्र दृष्ट्या सरनाईकांकडे ठाकरेंनी दुर्लक्ष केलं.


त्याचे परिणाम आता दिसत आहेत. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, ज्यांना जेलमध्ये टाकू अशा वल्गना केल्या, अगदी देशद्रोहाचे सुद्धा आरोप केले गेले, त्यातल्या बहुसंख्य लोकांनी भाजपसोबत वेळीच जुळवून घेतलं, ती सगळी मंडळी आज एकतर भाजपमध्ये आहेत किंवा भाजपसोबत सत्तेत आहेत. अगदी विविध कारणांनी वाद मागे लागलेले शिवसेनेचे प्रताप सरनाईक, यशवंत जाधव, यामिनी जाधव, अब्दुल सत्तार, भावना गवळी, संजय राठोड, अडसूळ असे नेतेही शिंदेसोबत गेल्याने सेफ झोन मध्ये आले आहेत.   आणि सर्वाधिक काळ एकत्र राहिलेल्या.. देशात युतीच्या राजकारणाचा आदर्श निर्माण केेलेल्या भाजपच्या सर्वात जुन्या मित्रपक्षाचे.. उद्धव बाळासाहेब ठाकरे आज भाजपचा, मोदीशाहांचा सगळा रोष ओढवून घेताना दिसत आहेत. 


रोज सकाळी विविध वक्तव्य करुन त्यांच्या अडचणीत संजय राऊत आणखीन भरच टाकत आहेत. मोदी शाहांवर, भाजपवर टीका  करण्याच्या नादात राम मंदिरासारख्या शिवसेनेच्या कोअर मतदाराला भावणाऱ्या विषयांवर सुद्धा टीका केली जातेय अशी सर्वसामान्य जनतेची भावना बनत जात आहे. उद्धव ठाकरेंनी आणि त्यांच्या थिंक टँकने राजकीय मुत्सदेपणा दाखवला असता तर आज महाशक्तीच्या सोबत असण्याचे सगळे फायदे त्यांना मिळाले असते, अगदी २२ तारखेच्या अयोध्यातील राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेसाठी सुद्धा पहिल्या रांगेत मानाचं स्थानही मिळालं असतं. मात्र तेवढी राजकीय लवचिकता म्हणा, संधीसाधूपणा म्हणा, धोरणीपणा म्हणा किंवा प्रगल्भता म्हणा, सध्या तरी कुठे दिसत नाहीय.   


उबाठा शिवसेनेची आणि  राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची वाटचाल पॅरलल सुरु आहे असं म्हणता येईल. सहानुभूती मिळेल असा विश्वास ठाकरे आणि पवारांच्या जवळचे  काही नेते अजुनही दोघांना देत आहेत. त्यासाठी सोशल मीडियावर उभं केलेल्या चित्राचा हवाला दिला जातो. मात्र व्हर्चुअल जगातील पाठिब्यांच्या आभासी चित्रावरुन  मैदानावरची लढाई जिंकता येत नाही हे समजून घ्यायला हवं. कदाचित याच कारणामुळे अतिअनुभवी शरद पवारांनी परतीचे दोर पूर्णपणे कापले नसतील असं जाणकार सांगतात. त्यामुळे सध्या तरी जे काही नुकसान झालंय ते उद्धव ठाकरेंचंच झालंय असं दिसतंय. बाळासाहेबांच्या बाबत मोदींच्या मनात अजुनही प्रेम, कृतज्ञता आहे असं सांगितलं जातं मात्र उद्धव ठाकरेंना पुरेशी संधी देऊन झाल्याची भावनाही भाजप नेते बोलून दाखवतात. मोदीशाहा आणि उद्धव ठाकरे यांच्या संबंधांमध्ये कटूता आली आहे हे तर उघड सत्य आहे, 2024 च्या लोकसभेत भाजपला बहुमत मिळालंच तर त्यात आणखी वाढ होईल हे नक्की.  आत्ता  त्यां 


सुरज चव्हाण, राजन साळवींवरील आत्ताची कारवाई ही पुढील मोठ्या घटनांची वॉर्निंग सुद्धा असू शकते. आणखी काही मोठी नावं स्कॅनर खाली असू शकतात. या सगळ्याचा रियालिटी चेक उद्धव ठाकरे घेतील का असा प्रश्न उबाठा शिवसेनेतील सर्वसामान्य सैनिकाला आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेवर अजुनही मनातून प्रेम असलेल्यांना पडला असेल. भाजपची दबावतंत्र पद्धत चुकीची असेलही किंबहुना ती आहेच, पण सत्तेतील सगळेच पक्ष ती वापरत आले आहेत. मात्र उबाठा शिवसेनेनं ही वेळ आपल्या कर्माने आणली आहे असं जाणकार मानतात. यातून बाहेर पडणं सध्या तरी कठीण दिसंतय पण कुणी सांगावं प्रताप सरनाईक फॉर्मुल्याची एक्स्पायरी डेट गेली नसेल तर तो कधीही  लागू होऊ शकतो.. राजकारणात अशक्य काही नाही असं म्हणतात. सगळा खेळ गरज, उपयुक्तता, उपद्रवमूल्य आणि टायमिंगचा आहे.