लाही लाही करणाऱ्या उन्हाचा सामना करत तुडूंब पावसात अदृश्य झालेलं कच्छचं वाळवंट हिवाळ्यात मिठानं उजळून निघतं. 200 वर्षांपूर्वी झालेल्या भीषण भूकंपानं कच्छचा उत्तर पूर्वेचा भाग समुद्रसपाटीपासून वर गेला. आणि तयार झालं मिठाचं वाळवंट.


गारठा वाढल्यावर परदेशी पक्षांनी तलाव नदी नाले समुद्रावर गर्दी करावी तसंच नोव्हेंबर ते फेब्रुवारी या विस्तीर्ण खारट वाळवंटाला अनुभवण्यासाठी देश-विदेशातून लोकांची रीघ लागते. गुजरात टुरिझमकडून इथे रण उत्सव रंगतो आणि कच्छी हस्तकला, हस्तशिल्पाला जागतिक व्यासपीठ खुलं होतं.

पण सुरूवातीलाच तुम्हाला थोडं निराश करतो, इथे यायचं असेल तर खिसा थोडासा गरम ठेवा. कारण भूजपासून 80 किमीपर्यंत धोरडो गावाजवळच्या रण उत्सवला येण्यासाठी गुजरात सरकारची एकही बस उपलब्ध नाही. त्यामुळे प्रायव्हेट गाडीवाले तुमच्याकडे अगदी 2 हजाराची मागणी करू शकतात. बार्गेनिंग करत करत तुम्ही त्यांना फार तर हजार बाराशेपर्यंत आणू शकता. पण फक्त तिथे जाण्यासाठी 1200 रुपये देणं सर्वसामान्य माणसाला शक्य नाही. शिवाय ओला उबेर किंवा तत्सम वाहतुकीचं कुठलंही अॅप इथे निकामी आहे. मोदींनी करोडो रुपये नुसता अमिताभ बच्चनला घेऊन रणच्या जाहिरातीवर खर्च केलाय. दोन बस सोडायला काही अवघड नव्हतं. एकही बस न सोडण्यामागे मोदींचा गुजराती दिमाग असू शकतो. पण सर्वसामान्य लोकांना रणला जाणं तसं अवघडंच आहे.

असो, तरीही तुम्ही हजार बाराशेची गाडी करून गेलात. किंवा रेन्टवर मिळणाऱ्या बाईक घेऊन गेलात तर भूज ते कच्छचं रण हा रस्ता तुम्ही दीड दोन तासात सहज पूर्ण करता. 100 रुपयांचा गेटपास घेऊन आत प्रवेश मिळतो. गेटपाससाठी तुम्हाला कुठलाही फोटो आयडी सोबत ठेवावा लागतो. हा सगळा परिसर सैन्यदलाच्या अखत्यारित येतो. आतमध्ये प्रवेश केल्यावर अथांग शुभ्रदलदलीचा प्रदेश आपल्या नजरेस पडतो. हेच कच्छचं रण. एका टोकावर हा पांढरा शुभ्र वाळवंट आणि आकाशातली ढग शेजारी बसून गप्पा मारतात की काय असा भास होतो.

कच्छचं हे रण फक्त पर्यटकांचंच आकर्षण आहे असं नाही. गेल्या 200 वर्षात मिठाची शेती हा एक मोठा उद्योग इथे उभा राहिलाय. नोव्हेंबरपासून इथल्या आदिवासींकडून मिठाची शेती पावसाळा सुरू होईपर्यंत सुरू राहते. इथूनच भारताला एकूण मिठाच्या 75 टक्के मिठ मिळतं. देशाविदेशातून येणाऱ्या विविध प्राण्यांसाठी कच्छचं रण हे आपलं माहेरासारखं आहे. विविध पक्षांचे थवे ऑक्टोबर ते मार्चच्या दरम्यान कच्छच्या किनाऱ्यावर आपली घरं बनवतात.

रणच्या वाळवंटात संध्याकाळ आणखीच शूभ्रधवल होते. सोनेरी किरणांनी निरोप घेणारा सूर्य इथल्या मिठाची गळाभेट घेत असतो. कुठल्यातरी कोपऱ्यात कच्छी संस्कृतीचे स्वर कानी पडत असतात. तर दुसरीकडे रास गरबा खेळणारी मंडळी. जगात आनंद खूप स्वस्त आहे. तो फक्त घेता आला पाहिजे. हा अनुभव कितीही पैसे देऊन जगात कुठेच विकत घेतला जाऊ शकत नाही. तो गोड अनुभव घेण्यासाठी तुम्हाला या खारट वाळवंटावरच यावं लागतं.

अंधार पडल्यावर घोडागाडी, उंटगाड्यांची लगबग वाढते. उदास खिन्न मन तिथून बाहेर पडायला तयार नसतं. पण जड पावलांनी आपल्याला तिथून बाहेर पडावंच लागतं. असं म्हणतात की पौर्णिमेच्या रात्री चंद्राचा मंद शीतल प्रकाशामुळे इथले मिठाचे कण लखलखतात. पण दुर्दैवानं तो अनुभव घेता आला नाही. तसंही अपूर्णता हवीच, पुन्हा येण्यासाठीचं ते निमंत्रण असतं.

काला डुंगर. आपण त्याला डोंगर म्हणूयात. पण हा डोंगर रहस्यमयी आहे. एकतर इथून तुम्हाला समुद्र दिसतो, मिठाचं वाळवंट दिसतं, घनदाट वनराईचं जंगल दिसतं आणि त्यावर सुवर्णलेप म्हणजे तुम्ही कच्छच्या सर्वात उंच डोंगरावर उभे असता. हाच काला डुंगर. भारत आणि पाकिस्तानची बॉर्डर इथून फक्त 70 किमी आहे. दुर्बिणीतून तुम्ही थेट बॉर्डरची सैर करून येता. इथूनच तुम्हाला जगातला शेवटचा पूलही दिसतो. असं म्हणतात की दत्तात्रेयांचं काही काळ इथे वास्तव्य होतं. इथल्या मंदिरात दोन वेळा लांडग्यांना खिचडीचा प्रसाद दिला जातो. मघाशी मी रहस्यमयी हा शब्द का वापरला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर त्याचं कारणही ऐका. हा डोंगर सर करताना एका ठिकाणी मॅग्नेटिक पॉईन्ट लागतो. या पॉईन्टवर गाडी आली की ती बंद करायची तरीही तुमची गाडी किमान 20 च्या स्पीडनं उंच डोंगर चढू लागते. आहे की नाही कमाल!

भूज शहर हे ऐतिहासिक आणि सुखी संपन्न आणि समाधानी लोकांचं शहर आहे. इथे कुणालाही घाई नाही. खासकरून मुंबईसारख्या शहरातून आलेल्या लोकांना इथलं आयुष्य संथ वाटू शकतं. पण तसंही धावपळ करून आपण तरी काय मिळवलं? असा प्रश्न आपसूक पडतो. हा शांतपणा सुखावणारा आहे. भूजमधला आईना महल आणि प्राग महल इथल्या राजेशाहीचा इतिहास जिवंत ठेऊन आहेत. स्वातंत्र्यानंतर राजेशाही संपुष्टात आली पण आजही इथल्या लोकांच्या मनात राजाविषयीचा आदर कायम आहे. इथलं स्वामीनारायण मंदिर सुंदरतेचा, कलेचा आणि भावभक्तीचा अनोखा मिलाफ आहे. भूजमधलं म्युझियम तर देखणं आहे. भूकंपाचे असंख्य हादरे सोसणारं भूज कसं बदलत गेलं ते म्युझियममध्ये बघायला मिळतं. भूज शहरावर भूकंपाच्या त्या जखमा आजही दिसतात.

भूजपासून 10 किमीवरच्या भुजोडी गावात हॅन्डलूमच्या वस्तू बनतात. अख्खं गाव त्यासाठीच प्रसिद्ध आहे इथल्या चादरी, बॅग्ज आणि खासकरून बांधणी वस्त्राची वीण अधिक घट्ट आहे. थोड पुढे गेलात तर अजरखपूर लागतं. इथल्या नैसर्गिक रंगांच्या साड्या, दुपट्टे जगात प्रसिद्ध आहे. इथल्या आदरातिथ्य आणि प्रेमाचा स्वाद कच्छच्या खाण्यात उतरलाय. भरपूर तेल्यातल्या मसालेदार भाज्या, जाडजूड तळलेल्या मिरच्या, मुगाची सात्विक खिचडी कढी आणि ताक. मन तृप्त होतं! मी पुन्हा भूजला जाईन तर ते खाण्यासाठीच.

या संपूर्ण प्रवासात मला अनेक नवीन मित्र भेटले. खरंतर मी बाहेर पडतो तेच मुळात नवीन लोकांचा शोध घेण्यासाठी. हे अनपेक्षित भेटलेले मित्र परत कदाचित आपल्याला कधीच भेटत नसतात पण त्यांच्या आठवणी छान असतात. देशी परदेशी लोकांसोबत बोलून आपल्याला आपला आवाका कळतो. लिफ्ट मागून मागून प्रवास करण्यात वेगळीच मजा आहे. ती अशा प्रवासांमधून मिळत जाते. कच्छनंही मला दोन दिवसात बरंच काही दिलं.