गेला आठवडाभर राज्यात नकारात्मक घटनांनी धुमाकूळ घातलाय. कितीही त्या गोष्टीकडे कानाडोळा करायचा म्हटलं तरी दुर्लक्षित न केल्या जाणाऱ्या घटना सातत्याने आजूबाजूला घडत आहेत. कारण ह्या सर्व घटनेशी आपण स्वतः जोडलो गेलेलो आहोत. ह्या जिवंत माणसाच्या वेदनादायी गोष्टी आहेत, त्या टाळून चालणार नाही. त्यावर तुम्ही किती नाही म्हटलं तरी प्रतिक्रिया ही द्यावीच लागते. माणसाचं जगणं अवघड करणाऱ्या या रोगट वातावरणात संपूर्ण मानवी समुदाय अडकून जावा तशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य सरकार, प्रशासन जमेल त्या पद्धतीने ह्या भयाण काळातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहे हे वास्तव असले तरी यंत्रणा आणि मदत अपुरीच पडत आहे. दिवसाला 50 हजारांपेक्षा नवीन निर्माण होणाऱ्या या रुग्णांना उपचार देताना आरोग्य व्यवस्था अडचणीत आली आहे. संपूर्ण राज्यातील जिल्ह्यात रुग्णांच्या भीषण वास्तवाच्या कहाण्या हादरवून टाकणाऱ्या आहेत. ऑक्सिजन नसल्यामुळे होणारी रुग्णांची तरफड, वेळेवर  बेड्स मिळत नसल्यामुळे होणारी रुग्णांची हेळसांड, औषधांची मारामार प्रत्येक जिल्ह्यातील हे भीषण वास्तव. सरकारी आणि खासगी आरोग्य यंत्रणा कुठे कुठे पुरी पडणार हाच प्रश्न आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे अनेक वर्ष सबलीकरण न झाल्यामुळे त्याचे पडसाद या महामारीच्या काळात उमटत आहे. 


राजकर्त्यांसाठी कायम दुर्लक्षित ठरलेला 'सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभाग' आज संपूर्ण राज्यातील आजारी जनतेला जमेल त्या पद्धतीने सेवा देतोय. या आरोग्य व्यवस्थेत वर्षोनुवर्षे कोणतेही क्रांतिकारक महत्त्वपूर्ण बदल झालेच नाही. खरं ह्या विभागांना सर्वोच्च प्राधान्य देऊन मोठा निधी देऊन राज्यातील आरोग्य व्यवस्था सक्षम करायला हवी. आज ग्रामीण भागातील बहुतांश गरीब मंडळी या व्यवस्थेवरच अवलंबून आहे. अनेक वर्ष या विभागातील पदे रिक्तच आहे. कोरोनाच्या या आजराने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला चांगलेच उघडे पाडले आहे. सध्याच्या काळात संपूर्ण राज्यात आरोग्य व्यवस्थेच्या अनुषंगाने तक्रारींचा नुसता पाऊस पडत आहे. तक्रारी ऐकायला माणसं नाहीत अशी या व्यवस्थेची दयनीय अवस्था झाली आहे. काही ठिकाणी तर रुग्ण ऑक्सिजनचे नळकांडे नाकाला लावून जीव वाचविण्यासाठी धडपड करत आहे. कुणी जमिनीवर झोपून तर कुणी एका बेडवर तीन रुग्ण पडून आज राज्यात उपचार घेत आहे. तोकडी पडणाऱ्या आरोग्य यंत्रणेत वाढ करण्यासाठी आरोग्य विभाग युद्धपातळीवर काम करीत आहे. फक्त टीका म्हणून नाही तर या विभागाला राज्यात फार मोठे काम उभे करता आले असते मात्र ते झालेले दिसत नाही.


कुणाला साधा सण साजरा करू न देणारा आजार इतके भयाण रूप घेईल हे माहित असताना नागरिक मात्र कायम बेफिकिरीने वागत आले. त्याचा परिणाम म्हणजे आज दिसणारी रुग्णसंख्या. त्यामुळे आता आहे ते वास्तव स्वीकारून या संकटातून कसे बाहेर पडत येईल त्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे. अवसान गळून चालणार नाही. धीराने आणि हिम्मतीने उभी राहून दुर्लक्षित घटकांना शक्य ती मदत करायची हीच ती वेळ. सरकार कधीही लॉकडाऊनची घोषणा करू शकते. तो लॉकडाऊन किती कडक असेल याबद्दल शंकाच आहे. कारण संपूर्ण कडकडीत लॉकडाऊन राज्याला परवडणारा नाही. या लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सूट असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करून चालणार नाही. नेहमी प्रमाणे अत्यावश्यक सेवा चालू राहतील. नागरिकांच्या सोयीसाठी काही ठिकाणी सूट दिली तरी नागरिकांनी गैरफायदा घेऊ नये. सरकार सूट देत असतात ती नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून मात्र आपल्याकडे सूट दिली की लोक सुटतातच. सर्व नियम धाब्यावर बसवून 'लॉकडाऊन' कसा आहे हे बघणारे नागरिकपण आहेत. एखादा नियम लावला कि तो कसा तोडता येईल ही एक विशिष्ट जमात आहे, राज्यातील विविध भागात आहे. त्यांना कायदा मोडायला आवडतो. मग कारवाईचा बडगा उगारला की त्याच्याविरोधात बोंबा ठोकायच्या. सरकार जो काही लॉकडाऊन करणार आहे, त्यावेळी सर्व नियमांचा आदर करत हा लॉकडाऊन यशस्वी करता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे. मानवी साखळी तोडण्यासाठी त्या काळात शक्य तेवढे घरात बसूनच आपला सुरक्षित वावर ठेवला पाहिजे. विनाकारण बाहेर पडणार नाही आणि ओळखीच्या लोकांना पडून देणार यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजे.                 


आयुष्यात काहीच चांगलं घडत नाही असंच सध्याचं वातावरण आहे. या अशा कोरोनामय काळात नव्या उमेदीने आलेल्या संकटावर मात करण्यासाठी सगळ्यांनी एकजुटीने लढा दिला पाहिजे हे वास्तव सगळेच मान्य करतात. मात्र, कृतीतून हे काय दिसत नाही. राजकारण्यांची एकमेकांवर शेरेबाजी सुरूच आहे. राजकरण करायचे नाही म्हणत आरोपाच्या फैरी झडतच आहे. सध्याचा हा भयाण काळ पाहता राज्यकर्त्यांनी नागरिकांना आधार दिला पाहिजे. सुरक्षित आशादायी वातावरण तयार केले पाहिजे. आजवरचा सामना तेव्हाच करता येईल जेव्हा नागरिकांचे मानसिक संतुलन योग्य राहील. अनेक पुढाऱ्यांना तरुण वर्ग हा त्यांनी केलेल्या कृतीचे अनुकरण करत असतो. त्यामुळे राजकारणात असणाऱ्या सर्वांनी आपला वावर कोरोनाच्या अनुषंगाने कसा सुरक्षित ठेवता येईल याचा विचार केला पाहिजे. अजूनही सगळं काही वाईटच चित्र आहे असे नाही. या परिस्थितीतून आपण सहीसलामत बाहेर  पडू शकतो. याकरिता सहकार्याची भावना ठेवून वागा. ज्या गोष्टी अयोग्य आहे, त्यावर टीका केलीच पाहिजे आणि व्यवस्थेत बदल घडविले पाहिजे. ज्यावेळी आरोग्याची आणीबाणी सारखे संकट देशावर आहे. मात्र, त्याची दाहकता महाराष्ट्रात अधिक आहे. त्यावेळी येथील सर्व राज्यकर्त्यांनी एकत्र येऊन जनतेशी सवांद साधला पाहिजे, त्यांना धीर कसा देता यासाठी प्रयत्न केला पाहिजे.


आकाशच फाटलंय तर ठिगळं कुठं कुठं लावणार अशी केविलवाणी परिस्थितीत राज्याच्या आरोग्य व्यवस्थेची झाली आहे. अनेक गोष्टींचा तुटवडा जाणवत आहे. मात्र, त्या परिस्थितीतही नागरिकांचे जगणे सुसह्य करण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करीत आहे. अचानकपणे मोठ्या संख्येने झालेल्या रुग्णवाढीमुळे आरोग्य विभाग रुग्णांना सेवा कशा पुरविता येतील यासाठी प्रयत्नशील आहे. साथीच्या काळात अशा समस्या निर्माण होत असतात. मात्र, त्याचा योग्य राजकीय इच्छाशक्तीमुळे ह्या समस्यांचा निपटारा करता येऊ शकतो. ह्या सगळ्या परिस्थितीकडे पाहून संगीता जोशी यांची एक सुंदर गझल आहे, त्यातील काही ओळीची आठवण येते.


सुंदर गझल आहे, त्यातील काही ओळीची आठवण येते.


आयुष्य तेच आहे
अन् हाच पेच आहे…


आता म्हणू उन्हाला
हे चांदणेच आहे…


सुख पांघरू कसे मी
ते तोकडेच आहे…


ह्या सगळ्या बिकट परिस्थितीतून महाराष्ट्राला पुन्हा एकदा उभारी मिळू दे आणि शासनाने येत्या काळात आरोग्य व्यवस्थेचे सक्षमीकरण करण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न केले जातील आणि जनतेला आरोग्यदायी वातावरण निर्माण होईल ह्याच नागरिकांसाठी खऱ्या अर्थाने गुढीपाडव्याच्या शुभेच्छा ठरतील.