अनेक प्रकारच्या अभ्यास शाखा आहेत तशी हेरगिरी ही देखील एक शाखा आहे. राष्ट्रपरत्वे याची व्याख्या आणि परिभाषा वेगळी असली तरी यातील कामाचे स्वरुप सर्वत्र सारखेच असते. हे काम जे लोक करतात ते ‘एजंट’ किंवा ‘अ‍ॅसेट’ म्हणजे गुप्तहेर होत. हे गुप्तहेर कधी संबंधित देशाच्या वकिलातीचे नोकर म्हणून कामाला येतात, तर कधी एखाद्या सांस्कृतिक मंडळाचे अधिकारी म्हणून तर कधी कुणा प्रतिनिधी मंडळातून त्यांचा चंचूप्रवेश होतो. त्यांना दिलेलं वरवरचे काम चोख पार पाडत ते ज्या देशात वास्तव्यास आलेले असतात त्या देशातील असंतुष्ट गट किंवा महत्त्वाच्या व्यक्ती शोधून जास्तीत जास्त माहिती गोळा करणे, एखाद्या व्यक्ती वा कार्यालयावर पाळत ठेवणे, सांगितली गेलेली गोपनीय कागदपत्रे मिळवणे यासारखी कामे ते करत असतात. ही माहिती मिळवण्याचे प्रकार कामगिरीसापेक्ष बदलत राहतात. शिवाय त्याचे रिसोर्सेस देखील सतत नवे शोधावे लागतात. अशी माहिती कधी अनवधानाने मिळते, तर कधी पडेल त्या मोबदल्यात खरेदी केली जाते. कधी कधी यासाठी स्थानिक व्यक्तींची मदत घेतली जाते. अशा स्थानिक व्यक्तींना ‘मोल’ म्हणून संबोधले जाते. डबल एजंट जसे घातक असतात तसेच हे मोलदेखील आत्मघातकी ठरतात. सेम्युएर हर्श नावाच्या एका लेखकाने काही वर्षापूर्वी भूतपूर्व पंतप्रधान मोरारजी देसाई हे ‘सीआयए’चे मोल असल्याचा आरोप ‘प्राईस ऑफ पॉवर’ या पुस्तकात केला होता. त्यावरुन संसदेत खळबळ माजली होती. या लेखकावर मोरारजी देसाईंनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. पण पुढे दोघेही निवर्तले. हे जगभरात चालतं. कोण हेर आहे आणि कोण नाही व कोण कोणासाठी काम करते आहे याचे प्रतल निश्चित करणे हे खूपच कठीण काम आहे. तरीदेखील हेरगिरी असं उच्चारलं तरी सर्वांच्या मनात ठराविक नावे आणि साचेबद्ध ठाशीव प्रतिमाच उभ्या राहतात. याला आपणही अपवाद नाही.


आपल्या लोकांना तर सीआयए, मोसाद, आयएसआय, केजीबी या गुप्तहेर संघटनांचेच भारी वेड आहे, हे आभाळातून पडलेले लोक असावेत इथपर्यंतही काहींची बौद्धिक मजल! जगातील सर्वश्रेष्ठ गुप्तहेर हेच आणि खऱ्या यंत्रणा याच, बाकीचे आपले सगळे कुचकामी!! स्वतःला हीन लेखून इतरांचा डंका वाजवायची आपली परंपरा तशी आपल्यात परंपरागत भिनलेली असल्याने त्यात आपला काय दोष? आणि आपण हा दोष निवारण करण्यासाठी काही करत नाही हीसुद्धा एक खंतच!! बहुतांश देशांची विदेशनीती आणि परराष्ट्र कारवाया यास अनुसरुन एक स्वतंत्र गुप्तचर यंत्रणा असते, जी देशांतर्गत गुप्तचर यंत्रणेपासून अलिप्त वा स्वतंत्र असते. फ्रान्सची परराष्ट्र धोरणांशी सुसंगत काम करणारी SDECE (सर्व्हिस फॉर एक्सटर्नल डॉक्युमेंटेशन अँड काऊंटर इन्टेलिजन्स) ही गुप्तचर यंत्रणा आहे. या संस्थेचे प्रमुख असणारे काऊट अलेक्झांडर मेरेंशेस लिहितात की, "रामेश्वर कावो हे १९७० च्या काळातल्या पाच प्रमुख बुद्धिमान गुप्तचर प्रमुखांपैकी एक होते!" - "What a fascinating mix of physical and mental elegance! What accomplishments! What friendships! And, yet so shy of talking about himself, his accomplishments and his friends." - Count Alexandre de Marenches, Head, SDECE, France.

आधुनिक भारताचे बहिर्जी नाईक असा ज्यांचा उल्लेख करता येईल त्या रामेश्वर नाथ कावो (एन. कावो) यांच्याप्रती "कोण हे कावो ?" इथपर्यंत अज्ञान अपेक्षित आहे, पण ज्यांना बहिर्जी नाईकच माहित नसतील त्यांचे मात्र कठीण आहे. त्यांनी शालेय इतिहासाची क्रमिक पुस्तके पुन्हा वाचावीत. बांगलादेशची निर्मिती असो वा श्रीलंकेतील राजपक्षे सरकारचा पराभव असो की दलाई लामांच्या माध्यमातून व्हाया तिबेट चीनच्या नाकदुऱ्या काढणे असो की झिया-उल हकचा मृत्यू असो किंवा ‘केजीबी’च्या उतरत्या काळात त्याना अफगाणात केलेली मदत अशी अनेक उदाहरणे देता येतील जेथे 'रॉ' (RAW) चा उल्लेख येतोच. मुघल सैन्याला जसे धनाजी संताजी पाण्यातदेखील दिसायचे तसे पाकिस्तानला तर आजही जळी स्थळी काष्टी पाषाणी 'रॉ'चे एजंट दिसतात! (आपल्याकडे जसा पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयचा उद्धार होतो तसा हा तिकडचा आपला उद्धार) यावरुन रॉचे महत्व लक्षात येऊ शकते.

आपल्या देशासाठी बाह्य घडामोडीवर लक्ष ठेवून त्यानुसार भारत सरकारच्या आदेशधोरणांनुसार कारवाया करण्याचे गुप्तचर यंत्रणेचे काम ‘रिसर्च अँड अॅनालिसिस विंग’- रॉ या संस्थेचे आहे. रामेश्वरनाथ कावो हे या रिसर्च अँड अॅनालिसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष होते. कावो यांना भारतीय गुप्तचर यंत्रणेचे अर्ध्वयू मानण्यात येते. १० मे १९१८ रोजी वाराणसीत एक विस्थापित काश्मिरी पंडिताच्या घरी त्यांचा जन्म झाला होता. आपल्या मित्रांमध्ये रामजी या नावाने परिचित असणाऱ्या कावोंनी त्यांच्या सरत्या काळात काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनासाठी खूप मोठे योगदान दिले. आधी एका सिगारेट कंपनीत कायदेविषयक सल्लागाराचे काम करुन आणि नंतर अलाहाबाद विद्यापीठात (तत्कालीन) कायदे विषयक वर्ग घेऊन कंटाळलेले कावो ब्रिटीश काळातील इंडियन इम्पिरियल पोलिसात भरती झाले होते. त्यांची पहिली पोस्टिंग कानपूरला एएसपी या हुद्द्यावर झाली होती. भारतीय स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येस त्यांना बी.एन.मलिक यांच्या नेतृत्वाखाली पुनर्गठीत केलेल्या आयबीमध्ये (इन्टेलिजन्स ब्युरो) त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांच्याकडे अतिमहत्वाच्या व्यक्तींची सुरक्षेची कामगिरी सोपवण्यात आली. १९५० च्या सुमारास स्वतःची जागतिक प्रतिमा उभारण्याच्या प्रयत्नात असलेल्या पंडित नेहरुंनी त्यांना घाना या देशात तेथील सुरक्षा यंत्रणेची निर्मिती आणि सेटअपसाठी पाठवले, हे काम त्यांनी चोख बजावले.

११ एप्रिल १९५५ मध्ये काश्मीर प्रिन्सेस नावाच्या एल७४९ए या लॉकहिड जातीच्या विमानाचा स्फोटामुळे प्रशांत महासागरात कोसळून नाश झाला होता. मुंबईवरुन हॉंगकॉंगमार्गे जकार्ताला जाणाऱ्या या विमानातील १६ प्रवासी यात मृत्यूमुखी पडले होते. यामध्ये अलिप्त राष्ट्र चळवळीच्या बांडुंग येथील परिषदेस जाणारे शिष्टमंडळातील अधिकाऱ्यांचा समावेश होता. या विमानात क्योमिंगटंग ह्या तैवानमधील सत्ताधारी पक्षाच्या गुप्त आदेशान्वये बॉम्ब ठेवल्याचा संशय होता. चीनी नेते चाऊएन लाय यांच्यावर हल्ला करण्याच्या तयारीत असणाऱ्या एका सिक्रेट एजंटचे यातील प्रवाशात नाव होते, पण त्याने ऐन क्षणी आपला या विमानातील प्रवास रद्द केल्याने संशयाचे धुके गडद झाले होते. ब्रिटीश आणि चीनी गुप्तचरांनी या तपासात रामेश्वर नाथ कावोंची मदत घेतली आणि त्यातून पूर्ण कारस्थान उजेडात आले. त्यामुळे नंतर खुश झालेल्या चाऊएन लाय यांनी कावोंचे पत्राद्वारे कौतुक केले होते.

इंदिराजींना त्यांनी आणीबाणी न लादण्याचा सल्ला दिला होता म्हणून त्याना निवृत्तीनंतर मोठी मुदतवाढ दिली आणि त्यांनी त्या काळाचे सोने केले. मोरारजी देसाईंचे सरकार सत्तेत आल्यावर कावोंनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन टाकला होता. ज्या लोकांनी आपल्यावर टीकेचा भडीमार केला आणि संशय घेतला त्यांच्यासोबत आपण कसे काम करु शकणार आणि आपले काम त्यांना कसे पटणार असा विचार करुन बाजूला झालेले कावो इंदिरा गांधींनी सत्तेत पुनरागमन करताच पुन्हा पद्नियुक्त केले गेले. ते पुढे राजीव गांधी असेपर्यंत 'रॉ'चे सर्वेसर्वा होते. शीख दहशतवाद्यांविरुद्ध लढलेल्या एनएसजी (राष्ट्रीय सुरक्षा रक्षक-नॅशनल सिक्युरिटी गार्ड) कमांडोची स्थापना करण्यात देखील त्यांचे मोठा हात होता. अलिकडील काळात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमुळे एनएसजीच्या कमांडोंची खरी किंमत आपल्याला कळली आहे.

१९६२च्या भारत-चीन युद्धाचे आडाखे आपल्या सुरक्षा यंत्रणेला बांधता आले नाहीत आणि पाकिस्तानने १९६५ ला ऑपरेशन जिब्राल्टरद्वारे जम्मू काश्मीरवर ताबा मिळवण्यासाठी केलेले एक प्रकारचे युद्ध (यात पाकने माती खाल्ली होती हा भाग निराळा) या दोन घटनांमुळे आपल्या राजकीय नेतृत्वाने विदेशनीती आणि परराष्ट्र कारवाईसाठी स्वतंत्र गुप्तचर यंत्रणा उभी करण्याचे ठरवले आणि त्यातून 'रॉ'चा जन्म झाला. या कामासाठी नेहरुंनी स्वतः कावोंची निवड केली होती. ‘रॉ’च्या स्थापनेपासून ते उभारणीपर्यंत कावोंचा सहभाग मोठा होता. १९६८ मध्ये इंदिरा गांधींनी ‘आयबी’ आणि ‘रॉ’ ह्यांना एकमेकापासून विभक्त केले. आयबीला देशांतर्गत गुप्त माहिती गोळा करण्याचे काम दिले आणि 'रॉ'ला परदेशीय गुप्तचर यंत्रणेचे काम दिले. कावोंचा इंदिरा गांधींशी थेट संपर्क असायचा, इंदिराजींनी कावोंना संशोधन सचिव पदाचे नवे पद देऊन केंद्रीय केबिनेट सचिवांच्या रांगेत नेऊन बसवले होते. आजही हा दर्जा ‘रॉ’ प्रमुखांना दिला जातो.

कावो हे काश्मिरी पंडित असल्याने त्यांची नियुक्ती इंदिराजींनी या पदावर झाल्यानंतर अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या. मात्र कावोंनी आपले काम चोख पार पाडले. त्यामुळेच त्यांच्या काळात आपल्यावर एकही परकीय आक्रमण व घुसखोरी होऊ शकली नाही. मात्र आपण विदेश नीतीत जागतिक पटलावर उठून दिसलो. इंदिराजींनी राबवलेल्या कणखर विदेशनीतींमध्ये कावोंच्या कामगिरीचे आणि सल्ल्याचे मोल नक्कीच मोठे आहे. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे पूर्व पाकिस्तानवर हल्ला करुन, मुक्तिवाहिनीला पाठिंबा देऊन कावोंनी केलेली बांगलादेशनिर्मिती मूल्यांची कहाणी! ही कावोंची सर्वाच्च यशोगाथा होय. प्रभाकरनच्या खात्म्यातदेखील त्यांचा सहभाग असल्याचे श्रीलंकन मीडियाने उद्धृत केले होते आणि आता भारताला नकोसे झालेले राजपक्षेच्या पराभवात ‘रॉ’चा हात असल्याचे बोलले गेले. नेपाळमध्ये नुकत्याच घडलेल्या घटनात चीनी हस्तक्षेप वाढल्यावर तेथील मधेशी लोकांना हाताशी धरुन 'रॉ'च्या लोकांनी नव्या लोकनियुक्त नेपाळी सरकारला चार पावले मागे जायला भाग पाडले, असा आरोप नेपाळी सरकारच्या प्रवक्त्याने केला होता.

बांगलादेश निर्मितीच्या संदर्भात कावोंचे घनिष्ट सहकारी व्हिक्टर लॉंगर कावोंच्या या काळातील इंदिराजींसोबतच्या जवळीकीबद्दल लिहितात की, "Recalls long-time Kao associate Victor Longer: "Intelligence is the only government business that depends upon the spoken word. Sometimes you can understand signs and body language. Kao had that rapport with Mrs Gandhi." विशेष म्हणजे या कालखंडात इंदिरा गांधींच्या पीएमओत डी.पी.धार, टी.एन.कौल, पी.एन.हक्सर हे तीन काश्मिरी पंडित होते आणि चोथे कावो होते! चार पंडितांनी मिळून इंदिराजींच्या मनातली ही कल्पना रोवून ती प्रत्यक्षात अमलात आणली होती. या मोहिमेचे दोन टप्पे बनवले होते, पहिला टप्पा पाकिस्तानी यंत्रणांना चकवा देऊन मुक्ती वाहिनीला हाताशी धरुन बंडाची बीजे बांगलादेशी जनतेत रुजवणे हा होता. हे काम कावोंनी केले. तर दुसरा टप्पा फिल्ड मार्शल जनरल मॉनेकशॉ यांच्या लष्करी कारवाईचा होता, तो त्यांनी अगदी चोख पार पाडला! १९७५ मध्ये सिक्कीमचे भारताचे २२वे राज्य म्हणून विलीनीकरण करुन घेताना कावोंनी चीनी गुप्तचर यंत्रणेस पार अंधारात ठेवून जी कामगिरी पार पाडली त्याबद्दल पीएमओने व इंदिराजींनी कावोंच्याबद्दल जाहीर गौरवोद्गार काढले होते.

अशा अनेक सुरस कथांनी 'रॉ'ची कार्यशैली आणि कावोंचे आयुष्य भरलेले आहे, आपल्या देशात/सीमेवर झालेल्या बहुसंख्य सैनिकी कारवाया, कारगिल ते २६/११ अशा बहुसंख्य घटनात 'रॉ'ने इशारे देऊनसुद्धा अंतर्गत ढिलाई आणि सरकारी बेपर्वाई व राजकीय इच्छाशक्तीचा अभाव यामुळे 'रॉ'ला अनेक वेळा तोंडघशी पडावे लागले. याउलट देशांतर्गत सुरक्षा यंत्रणा असणाऱ्या सीबीआयने नेहमीच माती खाल्ली पण 'रॉ' आपल्या स्थानी अतुल्य आणि अढळ आहे. नुकतेच सीबीआयचे संचालक रंजित सिन्हा यांना त्यांच्या कुटील कारवायामध्ये रंगेहाथ पकडून ‘रॉ’ने जी मदत केली त्यावरुन काहींनी वादंग उठवले पण ते होणे गरजेचे होते. त्याशिवाय सीबीआयची अंतर्गत पाळेमुळे देशापुढे आली नसती. कावोंनी ओरिसातील चरबतिया येथील हवाई उड्डयन संशोधन केंद्र (Aviation Research Centre) ही ‘रॉ’ची शाखा स्थापन करण्यातही प्रमुख भूमिका बजावली होती.

अशा या बहुआयामी व्यक्तीमत्वाच्या आणि भोवती गूढवलय असूनही दरारा ठेवून आपला कार्यभाग उरकणाऱ्या संस्थेच्या प्रमुखांबद्दल आपल्या देशात कोठेही गौरवाचा एक शब्द छापून येत नाही हे कशाचे द्योतक आहे? 'एक था टायगर'च्या निमित्ताने आपल्या प्रसिद्धी माध्यमांनी 'रॉ'वर कमी पण सलमानवर जास्त फोकस टाकणारे कव्हरेज दिले होते हीच काय ती प्रसिद्धी!! जीव धोक्यात घालून देशासाठी आयुष्य वेचणाऱ्या या वीरांसाठी कोणत्याही वृत्तपत्रात दोन इंची कॉलमचीदेखील माहिती येत नाही ही त्यांची शोकांतिका आहे आणि एक प्रकारचा हा करंटेपणा आहे. रामेश्वर नाथ कावोंचे एक सहकारी बी.रामन यांनी ' द कावोबॉईज ऑफ रॉ ' हे कावोंच्या काळात घडलेल्या काही महत्वपूर्ण घटनांचा आढावा घेणारे एक दमदार पुस्तक लिहिले आहे, जिज्ञासुंनी ते अवश्य वाचावे. त्यामुळे केजीबी, मोसाद, एफबीआय, सीआयए, आयएसआय यांचे आकर्षण कमी होऊन ‘रॉ’ बद्दलचा आपला अभिमान नक्कीच वाढीस लागेल.

- समीर गायकवाड

संदर्भ -
'द कावोबॉईज ऑफ रॉ’ - बी.रामन.
‘मिशन रॉ’ - आर.के.यादव.
(भारतीय हेरगिरीवर लिहिलेल्या ब्लॉग मालिकेतील हा अखेरचा लेख आहे)

संबंधित ब्लॉग:

हेरगिरी : टायगर जिंदा रहेगा !

सरबजीत- भारतीय हेरगिरीची भळभळती जखम...


हेरगिरी - 'हेरा'फेरी !