2014 विधान सभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यानंतर राष्ट्रवादी पक्ष विरोधी पक्षात बसला. विरोधी पक्ष झाला तरी राष्ट्रवादी अजूनही सत्ताधारी असल्याच्या मनस्थितीतच होती.  अधिवेशनात अजित पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे, सुनील तटकरे आक्रमक होत असले तरी रस्त्यावरच्या लढाईत विशेष कोणी दिसत नव्हतं. 2016 मध्ये राष्ट्रवादी प्रदेश महिला आघाडीच्या अध्यक्ष म्हणून चित्रा वाघ यांची नियुक्ती झाली. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष राहिलेल्या चित्रा वाघ यांनी राज्यातील महिलांच्या अत्याचारांच्या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेतली.  इंधन दरवाढ ,खड्डे, महिला अत्याचार, महागाई ,महिला बचतगट अशा विविध विषयांवर चित्रा वाघ यांनी आंदोलनं केली.


प्रसार माध्यमांवर चर्चांच्या कार्यक्रमात चित्रा वाघ यांनी पक्षाची ठाम भूमिका मांडली. कर्जतला राष्ट्रवादी पक्षाच्या अधिवेशनात शरद पवार यांनी चित्रा वाघ यांचे भरभरुन कौतुकही केले होते.

एक आक्रमक चेहरा असलेल्या चित्रा वाघ वादातही अडकल्या, त्यांचे पती लाच प्रकरणात अडकले. त्यानंतर चित्राताईची आक्रमकता कमी झाली. तरी पक्षासाठी मात्र काम सुरूच होतं.  2018 ला जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष झाल्यावर मात्र चित्रा वाघ यांचा वावर पक्षात हळूहळू कमी होत गेला. राष्ट्रवादी मधील गटातटाचे राजकारण ठळक जाणवायला लागले. फौजिया खान या महिलांच्या कार्यक्रमात जास्त दिसू लागल्या, त्या कार्यक्रमांमध्ये चित्रा वाघ नव्हत्या. फौजिया खान यांनी काही नियुक्त्या केल्या, त्यावरून चर्चा सुरू झाली.

सुप्रिया सुळे बरोबर सावलीसारख्या असणाऱ्या चित्रा वाघ आता ताईबरोबर दिसत नव्हत्या. एकीकडे पक्षात डावलल्याची भावना, निर्णय प्रक्रियेत स्थान न मिळणे यामुळे चित्रा वाघ नाराज होत होत्या. त्यात जयंत पाटील यांचे समर्थक असलेल्या एका पदाधिकाऱ्याने यांनी चित्रा वाघ यांच्याबाबत अश्लील शेरेबाजी केली आणि ते चित्रा वाघ यांना कळलं. त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे याबाबत तक्रार केली. पण त्या कार्यकर्त्याला जयंत पाटील यांनी पाठीशी घातल्याने चित्रा वाघ दुखवल्याची चर्चा पक्षाच्या वर्तुळात होती.

चित्रा वाघ यांचे एका इंग्रजी वृत्तवाहिनीने स्टिंग ऑपरेशन केले होते. शरद पवार यांच्याबाबत त्यांनी वक्तव्य केलं होतं. पण पक्षाने या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले. यानंतर सुप्रिया ताईंशी असलेला संपर्क चित्रा वाघ यांचा तुटला. इतर पक्षातील नेत्यांकडून न्याय मिळेल अपेक्षा होती. त्यांनीही दाद न दिल्याने चित्रा वाघ पक्ष सोडण्याच्या मनस्थिती असल्याची चर्चा लोकसभा निवडणुकीपासून राजकीय वर्तुळात होती.

अखेरीस चित्रा वाघ यांनी शरद पवार यांना भेटून पक्षाचा आणि पदाचा राजीनामा दिला आणि सोशल मीडियावर ही ते स्पष्ट केलं. लवकरच त्यांचा भाजप पक्षप्रवेश ही होईल. सचिन अहिर यांनी पक्ष सोडला त्या दिवशी पक्ष कार्यालयात बैठक झाली तेव्हा चित्रा वाघ उपस्थित होत्या. राजीनामा देण्याआधी देखील चित्रा वाघ पक्ष कार्यालयात आल्या होत्या. नंतर पवारांच्या घरी जाऊन राजीनामा दिला. सचिन अहिरांनी केलेली चूक त्यांनी टाळली.

त्यांच्या राजीनाम्यानंतर 24 तासात  जयंत पाटील यांनी पुणे महिला अध्यक्ष पदावरून काढलेल्या रुपाली चाकणकर यांची महिला प्रदेशाध्यपदी तात्काळ नियुक्ती केली. फौजिया खान यांनी देखील चित्रा वाघ यांच्यावर पक्षच कारवाई करणार होता, त्यांच्या विरोधात तक्रारी असल्याचे विधान केले. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष जणू काही चित्रा वाघ जाण्याची वाट पाहत होते की काय अशीच चर्चा सुरु झाली.

चित्रा वाघ यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी समर्थकांच्या तीव्र प्रतिक्रिया आल्या. पण चित्रा वाघ यांनी इतकंच म्हंटल मी गद्दार नाही, पळून जाणार नाही.  गेल्या रक्षाबंधनाला चित्रा वाघ यांनी सचिन अहिर यांना राखी बांधली होती. भाऊंच्या मागे आता ताई पण पक्षातून बाहेर पडली अशी चर्चा आहे.