Rashid Khan : सकाळपासून कुंद हवा होती. निव्वळ काळेसावळे आभाळ होते, वारा नावालाच होता नि उन्हे गायब होती. उगाच उदास वाटत होतं. काही वेळापूर्वी या उदासीनतेचे कारण आकळले. 
उस्ताद राशीद खान (Rashid Khan) गेले. वास्तवात शास्त्रीय संगीताशी माझा दूरचाही संबंध नाही, तरीही राशीद खान गेल्याचे दुःख झाले. त्याचे एकमेव कारण  म्हणजे 'आओगे जब तुम साजना..' हे गीत होय. 


2007 साली 'जब वी मेट' हा सिनेमा आला होता. करीना कपूर आणि शाहिद कपूर यांच्या प्रेमाची केमिस्ट्री त्यात जबर जमली होती. सिनेमा हिट झाला होता आणि गाणीही गाजली होती. बाकी गाण्यांच्या तुलनेत हे गाणं जास्त गाजले नव्हते पण माझे मात्र आवडते गीत होते. हे गाणं फर्माईश म्हणून अनेक प्रेमभंग झालेल्या तरुण पोरांनी गायला सांगितलेले अजूनही पक्के स्मरणात आहे. 


त्याहीआधी 1991 साली नाना पाटेकर, डिम्पल, माधुरी यांच्या 'प्रहार'मध्ये शुभा गुर्टू यांनी गायलेले 'याद पिया की आये..' ही ठुमरी खूप जीव लावून ऐकलेली. तिच्याशी जसे एकरूप होता येत होतं तसेच 'आओगे जब तुम साजना'बाबतीत व्हायचे. या दोन्ही गाण्यांची वीण वेगळी असली तरी ही एकमेकाशी गुंफलेली वाटत. यांच्या आठवणी मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूरमधील मुजरा गायिकांच्या आठवणींशी निगडीत आहेत. 


बुऱ्हाणपूरच्या मुजऱ्याचा इतिहास औरंगजेब कालीन नसून जहांगीरच्या काळातला आहे. त्याआधी इथे मुजरा मैफली होत नव्हत्या. मुघल बादशहा जहांगीर याने जयपूरमधील डेरेदार समाजातील दोन तवायफ इथे आणल्या आणि त्यांचे कोठे वसवले. त्यानंतर इथे परंपरागत मुजरा अदा होऊ लागला. सध्या भारतात शालीन कुलीन परंपरेचा मुजरा बुऱ्हाणपूर आणि आग्रा इथेच साजरा होतो. डेरेदार समाजात साठ प्रकारची घराणी आहेत. त्यातील तब्बल बावीस घराणी अजूनही गाणं बजावणंच करतात. बुऱ्हाणपूरच्या बायकांचं एक वैशिष्ठय आहे. यांचा धंदा कितीही कमी होवो जी काही कमाई होईल त्यातील एक तृतीयांश हिस्सा दानधर्मासाठी दिला जातो. 


इथे बोरवाडी नावाचा इलाखा आहे, इथल्या बायकांनी मात्र मुजरा सोडून गझल कव्वालीचा आसरा शोधलाय त्याला कारण कदरदान मंडळींची बिघडत चाललेली नियत. नाचणारी बाई अंगाखाली झोपणारी नसते याचा विसर लोकांना पडत चालल्याने मुजरा करणाऱ्या स्त्रियांत घट होऊन त्या निव्वळ गायकीकडे वळत आहेत.


बुऱ्हाणपुरच्या मूळ डेरेदार समाजाच्या नर्तिका अत्यंत देखण्या आणि विनम्र आहेत. आपल्या ग्राहकांशी त्यांचा व्यवहार आदरयुक्त आणि प्रेमपूर्वक आस्थेचा असतो. राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश या तिन्ही राज्यातून लोक इथे येतात. या बायकांपाशी आल्यावर आपलं काळीज रितं करताना काहीजण कोलमडून पडत, त्यांची फर्माइश या दोन्ही गाण्यांची असे. आपल्या मयखान्यात विग्ध होऊन पडलेल्या या पुरुषांना यातीलच काही बायका आधार देत असत. 


राशीद खान यांनी अंतःकरणाच्या ओढीने हे गाणं गायलेले असल्याने कुठल्याही गायिकेने हे गायले तरी समोरच्याचे मन भरत नसे. तो पुन्हा पुन्हा काही कडवी गायला सांगे. या बायकाही गझलवेड्या असल्याने त्यांना याचे विशेष वाटत नसे, त्या खुबीने गात असत, मात्र त्यांची मालकीण वैतागून जात असे. 


इथेच एक बिहारी बुजुर्ग भेटलेला. त्याचे नावही राशीद खान असेच होते. त्याचा त्याच्या पत्नीवर अफाट जीव. घरच्यांचा विरोध पत्करून निकाह केलेला असल्याने जवळीक अगदी जास्तीची  होती. मुले मोठी झाल्यावर तिला कॅन्सरने ग्रासले. तिने कडवी झुंज दिली, मात्र यश आले नाही.  ती गेली, तो पुरता खचला. कशीबशी पोरे मोठी केली, मुलीचे लग्न लावून दिले. पोरगा नोकरीला लागला आणि हा आत्मीय सुखाच्या शोधात घराबाहेर पडला. त्याच्या बुऱ्हाणपूरच्या भटकंतीत मला भेटलेला. अवलिया होता अगदी.


कॅन्सरच्या उपचारासाठी इस्पितळात दाखल केलेल्या पत्नीचे कलेवर हॉस्पिटलमधून घरी आणले तेव्हा त्याने जगजितची गझल म्युझिक सिस्टिमवर लावली होती - तेरे आने की जब खबर महके सारा घर महके.. !


त्याच्या प्रिय पत्नीची आवडती गझल होती ती. तिचे कलेवर घरी आणलं तेव्हा त्याने ती गझल लावली होती आणि तिच्या आठवणींच्या परीमळाने घर दरवळून गेलं होतं नि तो ओक्साबोक्शी रडत होता. ही आठवण सांगतानाही त्याच्या डोळ्यात काठोकाठ पाणी होतं. इथे त्याने झुबेदाबाईला फर्माइश केली होती - आओगे जब तुम ओ साजना, अंगना फूल खिलेंगे बरसेगा सावन! त्याला राशीद खानचे हे गाणे अत्यंत प्रिय होते, त्याचा विश्वास होता की हे गाणं ऐकताना ती त्याच्या पुढ्यात अवतरते नि काही क्षण का होईना तो तिच्यात अंतर्धान पावतो.


ती फिरून येईल की नाही हे याचे उत्तर कुणीच देऊ शकत नाही, त्याला मात्र खात्री आहे. ती येईल आणि आपलं जीवन सुखांत होईल असे त्याला वाटते. वरवर हा वेडेपणाच वाटेल मात्र हा भ्रमच त्याच्या जगण्याचा सहारा होता त्यामुळे त्याच्या विश्वासाला मीही बळ दिले. 


सच्चे प्रेम जीवघेणे असते!


'आओगे जब तुम साजना'साठी राशीद खान यांचे ऋण मानले पाहिजेत!