समोर तुम्ही अनेक वर्षांपासून पाहत असलेलं स्वप्न साकार करायची संधी दिसतेय. त्यासाठी तुम्ही गेले पाच दिवस प्रचंड मेहनत घेताय. जीव ओतून खेळताय. प्रतिस्पर्ध्यासमोर डोंगराएवढं आव्हान उभं केलंय. पण समोरचा संघही तितक्याच ताकदीचा आहे. तुमच्या आव्हानाला त्यानं प्रतिआव्हान दिलंय. शेवटी तो तुमच्या टार्गेटच्या अगदी जवळ येऊन उभा ठाकलाय. त्याला दूर ठेवण्याची एक संधी तुम्ही शोधताय. आणि अखेर... त्या शेवटच्या फलंदाजाचा एक जोराचा फटका तुमच्या नशीबानं झेलात परावर्तित होतो आणि ती चुरशीची लढाई तुम्ही आपल्या नावावर करता... हा सगळा थरार घडला तो शनिवारी अहमदाबादच्या मैदानात. यंदाची रणजी फायनल गाठणारा यातला नशीबवान संघ होता सचिन बेबीचा केरळ. तर जिंवळपास जिंकलेली लढाई अखेरच्या क्षणी गमावला तो माजी विजेत्या गुजरातनं.
रणजी करंडकाच्या उपांत्य फेरीत यंदा केरळ आणि गुजरात हे दोन तुल्यबळ संघ आमनेसामने आले. चिंतन गजाच्या नेतृत्वात खेळणाऱ्या गुजरातचं पारडं त्यामानाने या लढतीत जड मानलं जात होतं. कारण या लढतीआधी केरळचा कर्णधार आणि टीम इंडियाचा विकेटकीपर संजू सॅमसन दुखापतीमुळे बाहेर पडला. मात्र अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना सुरु झाला आणि मोहम्मद अझरुद्दीनच्या खणखणीत शतकाच्या जोरावर केरळनं दोन दिवसात ४५७ धावांचा डोंगर उभारला. खरं तर केरळनं याआधी कधीही रणजी करंडकाची फायनल गाठली नव्हती. ही मोठी संधी पाहता केरळच्या फलंदाजांनी दमदार खेळ करत स्कोअरबोर्डवर एक मोठी धावसंख्या उभी केली.
पण समोरची गुजरातही काही लेचीपेची टीम नव्हती. फर्स्ट क्लास क्रिकेटमधला अनुभी आणि खोऱ्यानं धावा ओढणारा प्रियांक पांचाळ मैदानात घट्ट पाय रोवून उभा राहिला. आर्य देसाईसोबत १३१ धावांची दणदणीत सलामी दिली. आर्य बाद झाला आणि मनन हिंगराजीया मैदानात आला. त्याच्याही सोबत दुसऱ्या विकेटसाठी प्रियांकनं शतकी भागीदारी साकारली. २३८ धावा १ विकेट अशी स्थिती होती. पण त्याचवेळी मनन बाद झाला आणि मग १४८ धावांवर तिसऱ्या विकेटच्या रुपात प्रियांकही तंबूत परतला. तेव्हा गुजरात पहिल्या डावाच्या आघाडीपासून १८० धावा दूर होता. प्रियांक बाद होताच केरळच्या जलज सक्सेना आणि आदित्य सरवटे या फिरकी जोडगोळीनं दोन्ही बाजूंनी फिरकी आक्रमण सुरु ठेवलं. जलजनं या इनिंगमध्ये तब्बल ७१ ओव्हर टाकल्या. तर सरवटेनं ४५.४. मात्र गुजरातच्या जयमीत पटेलनं छोट्या छोट्या भागीदारी रचून धावांचा पाठलाग सुरु ठेवला.
पाचव्या दिवशीच्या पहिल्या सत्रात ७ बाद ४३६ अशी गुजरातची अवस्था होती. तीन विकेट हाताशी होत्या. आणि विजयी आघाडीसाठी २१ धावांजी गरज. पण याच मोक्याच्या क्षणी आदित्य सरवटेनं सेट झालेल्या जयमीतला चकवलं आणि विकेटकीपर अझरुद्दीननं विजेच्या चपळाईनं स्टम्पिंग केलं. निर्णय थर्ड अंपायरकडे गेला आणि मैदानातल्या स्क्रीनवर जयमीतची झुंजार खेळी संपल्याचा इशारा देण्यात आला, आऊट!
८ बाद ४३६. मग ४४६ धावांवर ९व्या नंबरवर येऊन तब्बल १६४ चेंडूंचा सामना करणाऱ्या सिद्धार्थ देसाईलाही सरवटेनं बाद केलं. अहमदाबादच्या स्टेडियमवर जे घडत होतं तो क्रिकेटमधला खरा रोमांच होता. इथे काहीही शक्य होतं. अरझान नागवासवाला आणि प्रियजीतसिंग जडेजानं तब्बल १० ओव्हर खिंड लढवली. या पाऊण तासात त्या दोघांनी फक्त ९ धावा केल्या. पण प्रचंड संयमानं त्यांनी प्रत्येक बॉलचा सामना केला. बरोबरीसाठी २ धावा आणि आणि आघाडीसाठी तीन धावांचं समीकरण. दोन्ही ड्रेसिंगरुममध्ये कमालीचा तणाव. याच तणावाच्या परिस्थितीत अरझानचा संयम सुटला आणि सरवटेच्या गोलंदाजीवर एक मोठा फटका खेळून तणाव दूर सारण्याचा प्रयत्न केला. पण अरझान आणि गुजरातचं दुर्दैव हे की तो फटका शॉर्ट लेगवर उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या थेट हेल्मेटवर आदळला आणि बॉल हवेत उंच उडाला. स्लीपमध्ये उभ्या असलेल्या कॅप्टन सचिन बेबीनं झेल टिपला आणि केरळनं रणजी करंडकात एक नवा इतिहास लिहिला.
खरंतर २०१७ साली नियम बदलले नसते तर अरझानला एक चान्स नक्की मिळाला असता. याआधी क्षेत्ररक्षक किंवा विकेटकीपरच्या हेल्मेटला लागून जर झेल घेतला तर अशा परिस्थितीत फलंदाजाला नाबाद ठरवलं जायचं. पण आता नव्या नियमानुसार क्षेत्ररक्षकाच्या हेल्मेटला लागून घेलतेला झेल किंवा बॉल हेल्मेटच्या ग्रीलमध्ये जरी अडकला तरी फलंदाज बाद ठरतो. अरझानच्या त्या एका फटक्यानं गुजरातची आणखी एका रणजी विजेतेपदाची संधी हुकली आणि केरळला फायनलची दारं खुली झाली. १९५७ पासून प्रत्येक रणजी स्पर्धेत केरळचा संघ खेळतोय. पण कधीही फायनल खेळण्याची संधी या टीमला मिळाली नव्हती. या सामन्यानंतर सोशल मीडियात एक पोस्ट वाचनात आली. ’५० वर्षांपूर्वी ३३ धावात ऑल होणारी केरळची टीम आज कुठे पोहोचली बघा!’
आता प्रतीक्षा आहे ती २६ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या फायनलची. विदर्भानं पुन्हा एकदा विजेतेपदासाठी दावेदारी सिद्ध केली आहे. गतउपविजेत्यांना तिसऱ्यांदा विजेतेपदाची संधी आहे. तर गेल्या ६८ वर्षात केरळचा संघ पहिल्यांदा विजेतेपदाच्या इतक्या जवळ पोहोचलाय. पाहूयात रणजीच्या यंदाच्या सीझनच्या शेवटी नेमकं काय होतंय?