बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता...
बिना कुछ किए जय जयकार नहीं होता...


भारताचे माजी कसोटीवीर आणि मध्य प्रदेशचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडितांचं २३ वर्षांपूर्वी अधुरं राहिलेलं एक स्वप्न रविवारी साकार झालं. आणि त्यानंतर बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर मध्य प्रदेशच्या खेळाडूंनी पंडितांना खांद्यावर उचलून एकच जयजयकार केला.


मध्य प्रदेश... यंदाचा रणजी करंडक विजेता संघ. पण आजवरच्या रणजी इतिहासात या संघानं एकदाच कमाल केली होती. तीही १९९८-९९ च्या मोसमात. तेव्हाही चंद्रकांत पंडितांनीच कर्णधार या नात्यानं संघाला फायनलपर्यंत पोहोचवलं होतं. पण कर्नाटकसमोर त्यांचे प्रयत्न अपुरे पडले आणि मध्य प्रदेशचं रणजी करंडक विजेतेपद थोडक्यात हुकलं. काळ पुढे गेला. २०२० मध्ये चंद्रकांत पंडितांना मध्य प्रदेशच्या प्रशिक्षकपदाची ऑफर आली. आणि त्यांनी ती स्वीकारली. पंडित गुरुजींचं लक्ष्य एकच होतं, मध्य प्रदेशला रणजी करंडकाचा मान मिळवून देण्याचं. २३ वर्षांपूर्वीचं अधुरं स्वप्न साकार करण्याचं.


रणजीचा गेला मोसम कोरोनामुळे रद्द झाला. याच काळात मध्य प्रदेशचे शिलेदार चंदू सरांच्या तालमीत तयार होत होते. यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात रणजी करंडक स्पर्धा एका वर्षाच्या ब्रेकनंतर सुुरु झाली. साखळी फेरीत अ गटात मध्य प्रदेश अव्वल ठरला. दरम्यान स्पर्धेला आयपीएलमुळे पुन्हा ब्रेक लागला. आणि बाद फेरीच्या तयारीसाठी मध्य प्रदेशला दोन महिने मिळाले. आयपीएल खेळणारे कुलदीप सेन आणि रजत पाटीदार, कुमार कार्तिकेय असे मोजके खेळाडू वगळता मध्य प्रदेशचे इतर शिलेदार सरावात व्यस्त राहिले. आयपीएल संपताच बाद फेरी सुरु झाली. आणि पंजाब, बंगाल आणि ४१ वेळच्या रणजी विजेत्या मुंबईला हरवून मध्य प्रदेशचा संघ विजेता ठरला.


कर्णधार आदित्य श्रीवास्तव, अंतिम सामन्यातले शतकवीर यश दुबे, शुभम शर्मा आणि रजत पाटीदार, हिमांशू मंत्री, कुमार कार्तिकेय यांसारखे भारतीय क्रिकेटच्या पटलावर फारसे प्रकाशझोतात न आलेले हे शिलेदार मध्य प्रदेशच्या विजयाचे नायक ठरले. या नवख्या शिलेदारांना त्या उंचीपर्यंत नेऊन ठेवलं ते चंद्रकांत पंडितांनी. आणि यात कोणतंही दुमत नसावं.


आचरेकर सरांच्या तालमीत घडलेल्या चंदू पंडितांची प्रशिक्षक म्हणून एक खासियत आहे. एरव्ही दिलखुलास वागणारे चंदू सर मैदानावर मात्र कडक शिस्तीचे म्हणून ओळखले जातात. तिथे कोणत्याही खेळाडूला सूट नसते. इतकच नाही तर त्यांच्या संघात सिनियर ज्युनियर असा कोणताही भेदभाव नसतो. स्पर्धेची तयारी करताना चंदू सर खेळाडूंमध्ये एक वेगळीच मानसिकता तयार करतात. उदाहरणादाखल, यंदाच्या रणजी करंडकाआधी एमपीसीएच्या प्रत्येक कागदपत्रावर त्यांनी रणजी करंडकाचं चित्र छापण्याचा सल्ला दिला होता. जेणेकरुन संघातला प्रत्येक सदस्याला प्रोत्साहन मिळेल, प्रत्येक खेळाडू खेळताना आपलं १०० टक्के योगदान देईल. आणि या सगळ्याचा रिझल्ट आपल्या समोर आहे.


चंदू सरांची आणखी एक खासियत म्हणजे तळागाळातल्या युवा गुणवत्तेकडे त्यांचं खास लक्ष्य असतं. त्यासाठी ते छोट्या छोट्या शहरांमध्ये सराव शिबीरं घेतात. त्यातून गुणवान खेळाडूंची निवड करतात.


चंद्रकांत पंडित भारताकडून ३६ वन डे आणि पाच कसोटी सामने खेळले आहेत. पण चंद्रकांत पंडितांचं प्रशिक्षक म्हणून असलेलं योगदान डोंगराएवढं आहे. २००१ साली पंडितांनी क्रिकेट कारकीर्दीला विराम दिला आणि पुढे प्रशिक्षक म्हणून नवी इनिंग सुरु केली. रणजी करंडकात पंडित गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली मुंबईनं तीन वेळा, विदर्भानं दोनदा तर मध्य प्रदेशनं एकदा विजेतेपद मिळवलंय. त्यात गेल्या सहापैकी चार मोसमात चंदू सरांचा संघ रणजीचा चॅम्पियन ठरलाय.


मुंबईचा अपवाद सोडला तर विदर्भ आणि मध्य प्रदेशनं चंद्रकांत पंडितांच्या मार्गदर्शनाखाली मिळवलेलं यश खास आहे. कारण या दोन्ही संघांना रणजी करंडकात कधीच फारशी चमक दाखवता आली नव्हती. पण चंदू सरांचं मार्गदर्शनानं २०१७ साली फैझ फझलच्या विदर्भानं आणि यंदा आदित्य श्रीवास्तवच्या मध्य प्रदेशनं इतिहास घडवलाय. आणि त्याचं क्रेडिट सर्वस्वी चंदू सरांचंच.