सध्या रोज सकाळी टीव्ही ऑन करुन राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे अपडेट्स पाहण्याचा मोह आवरत नाही!


आजवर फक्त क्रिकेट मॅच असल्या की टीव्हीसमोर सरसावून बसणारा मी आयपीएल सुरु असताना तिकडे ढुंकूनही पाहिलं नाही!
महत्त्वाचे सामने पाहिल्यानंतर भारताच्या पदक तालिकेवरही आपसूक नजर जाते! पण तिथे नजर गेल्यावर मात्र अस्वस्थ व्हायला होतं!
भारत सध्या तिसऱ्या स्थानावर आहे ही जमेची बाजू असली तरी समाधान मात्र होत नाही!

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा म्हणजे ज्या देशांवर ब्रिटिशांनी राज्य केले त्या देशांमधल्या स्पर्धा! त्यामुळे ब्रिटिशांनी सत्ता गाजवलेल्या प्रत्येक छोट्यामोठ्या देशांची त्यात वर्णी लागते!

अस्वस्थता वाढण्याचे कारण म्हणजे नकाशावर ठिपक्याच्या आकारांचे देशही या स्पर्धांमध्ये सहभागी होतात! त्यांची लोकसंख्या महाराष्ट्रातल्या कोणत्याही एका जिल्ह्याइतकीही नाही! आकारमान तर एका दिवसात संपूर्ण देश फिरुन होईल इतके लहान!

गुगल मॅप्सवर जाऊन फाल्कन आयलंड्स, ग्रेनेडा, बर्म्युडा, समोआ अशा देशांचे नकाशे पाहिले तर मुंबईतल्या पार्ल्यापेक्षाही लहान दिसतील! पण त्यातल्या प्रत्येकाने पदकतालिकेत स्थान मिळवले आहे! पदक कमी असतीलही पण देशाच्या आकारमानाचे आणि लोकसंख्येचे गुणोत्तर पाहिले तर भारताच्या खात्यात आतापर्यंत किमान २०० पदके तरी यायला हवी होती!

फाल्कन आयलंड्सची लोकसंख्या तर अवघ्या ३ हजारांमध्ये आहे! आपल्याकडे एखाद्या सोसायटीतही अधिक लोकसंख्या असते!

आता सायप्रस या देशाचं उदाहरण घ्या! या देशाची लोकसंख्या फक्त ११ लाख... क्षेत्रफळ आपल्या अहमदनगर जिल्ह्यापेक्षाही कमी! पण पदकतालिकेत हा देश सध्या नवव्या क्रमांकावर आहे! त्या खालोखाल असलेला वेल्सही आकारमानाने तितकाच!

आता आकारमान आणि लोकसंख्या यांचे गुणोत्तर पाहिले तर आपण तिसऱ्या क्रमांकावर असण्याचा आनंद मानायचा की खेद?

समोआने वेटलिफ्टिंगमध्ये चमकदार कामगिरी केली. सायप्रसच्या खेळाडूंनी शूटिंगमध्ये कमाल केली! असा प्रत्येक देशाचा विशिष्ट खेळांमध्ये डॉमिनन्स आहे! या न्यायाने, आपल्या देशातल्या प्रत्येक जिल्ह्याने एकेका खेळात जरी मास्टरी मिळवली तर भारत पदकतालिकेत अव्वल स्थानी का येणार नाही?

आपल्यात फक्त एखादीच मेरी कोम का तयार होते? कारण आपण फक्त प्रतिकांमध्ये अडकले जातो! पीटी ऊषाचे मिलिसेकंदाने हुकलेल्या पदकाचेच आपण कौतुक करत बसलो म्हणा किंवा दु:ख कुरवाळत बसलो म्हणा! पण त्यानंतर दुसरी पीटी ऊषा तयार व्हाव्यात यासाठी ज्या ताकदीचे प्रयत्न व्हायला हवेत, ते होतात का? याबद्दल माझ्या मनात शंका आहे!

या अनास्थेचे मूळ आपल्या शिक्षण पध्दतीत आहे असं मला वाटतं... मुलांना पुस्तकांच्या ढिगाऱ्याखाली गाडणाऱ्या शाळा पाहिल्या की ती शाळा म्हणजे मुलांच्या प्रतिभांची दफनभूमी असल्यासारखं वाटतं!

शाळेत खेळण्याचा तास हा शेवटचा का असतो? शारीरिक शिक्षणाचे कोणतेही प्रशिक्षण नसलेल्या गुरुजींना पीटीची जबाबदारी का दिली जाते? मुलांना रस असलेल्या खेळापासून परावृत्त कसे केले जाईल याचच प्लॅनिंग जणू शाळेत सुरु असतं!
खरं तर मैदानात, मंचावर, वर्गाबाहेर ॲक्टिव्ह असलेली मुले व्यावहारिक आयुष्यातही ॲक्टिव्ह आणि यशस्वी होतात असे निरीक्षण आहे!
पण ज्याला जितकी निरुपयोगी माहिती तो हुशार असे काही तरी विचित्र समीकरण झाले आहे! लसावी-मसावी, पायथागोरस, प्रकाशसंश्लेषण, समास, परीक्षानळी, लिटमस पेपर, चंचूपात्र, इतिहासाच्या सनावळ्या... हे दानव पुढच्या आयुष्यात कधीच कामी आले नाहीत, पण शाळेत मात्र पुरते छ्ळून गेले!
पण त्याच वायात जर मुलांचा कल पाहून त्यांची दिशा ठरवली, तर पायाभरणी पक्की होणार नाही का?
फक्त शाळाच नाही, तर घरातही तीच अनास्था! लागेल, पडेल, दुखेल, कशाला? अभ्यास कर, नंतर खेळायचेच आहे, असं म्हणत म्हणत त्या पोरांची उमेदीची वर्षे वाया घालवली जातात! जेमतेम एकच लेकरु असल्याने त्याला रेषमाच्या कोषात जपले जाते! पण भविष्यात हाच कोष त्याला घुसमटून टाकतो, हे वास्तव आहे.
प्रगत देशांमध्ये आपल्याला भविष्यात काय करायचे आहे, हे ध्येय निश्चित करण्याचे सरासरी वय हे आपल्यातुलनेत किती तरी कमी आहे! आपल्याकडे आधी ग्रॅज्युएशन तरी करु, या डिफेन्सिव्ह ॲटीट्यूडमुळे सोन्यासारखी २० वर्षे निरुपयोगी पुस्तकी घोकमपट्टीत वाया घालवली जातात! बरं इतकं करुनही आपल्या सो कॉल्ड ग्रॅज्युएट मुलांना साध्या बॅंकेतल्या भरणा पावत्याही भरता येत नाहीत ही शोकांतिका आहे! आणि आता तर दिवसला मिळणारा दीड जीबीचा त्यांच्यातल्या क्युरियॉसिटीलाच संपवत आहे! थोडे विषयांतर असले, तरी हे नमुद करणे गरजेचे आहे! कारण हाच दीड जीबी डेटा आता लहान मुलांच्या हातातही आला आहे! त्यामुळे मैदानात घाम गाळणारी मुले आता व्हर्च्युअल जगात आपलं डोकं गमावून बसत आहेत!

दोन महिन्यापूर्वी खेलो इंडियाचा नारा देत स्टार स्पोर्ट्सने स्कूल गेम्सला जगासमोर आणलं! राज्याराज्यातल्या मैदानावरच्या टॅलेंटला पहिल्यांदा अख्ख्या देशाने पाहिलं!
महाराष्ट्राने या स्पर्धेत पदकतालिकेत दुसरा क्रमांक पटकावला!
गावखेड्यातल्या मैदानावर धावणारी अवघ्या साडेतीन फुटांची ताई बम्हाणे जीव तोडून पळताना दिसली, फिनिश लाईनंतर सेलिब्रेट करणारी अवंतिका नराळे दिसली! खो खोमध्ये वर्चस्व गाजवणारा महाराष्ट्राचा संघ दिसला! उसेन बोल्टच्या अकॅडमीत प्रशिक्षण घेणारा निसार अहमद दिसला! आणि किमान असे खेळ घराघरात पोहोचल्याचं समाधान वाटलं! क्रिकेट हा जितका अनिश्चिततेचा खेळ आहे तितकेच पोटेन्शियल ट्रॅक ॲन्ड फील्डमध्येही आहे! आतापर्यंत मंडळांपर्यंत मर्यादित असलेल्या कबड्डीला प्रो कबड्डीने ग्लॅमर मिळवून दिले! तसंच आता ऑलिंपिकमधल्या खेळांमध्ये झाले पाहिजे!

पण त्याआधी आपण बदलायला हवं! आजपर्यंत आपल्या घरात सचिन जन्मावा अशी स्वप्ने पाहणारे पालक जेव्हा आपल्या घरी तेजस्विनी सावंत जन्मावी, पी व्ही सिंधू जन्मावी, जितू राय जन्मावा अशी इच्छा व्यक्त करतील, तेव्हा आपला १२५ कोटी लोकसंख्येचा देश पदकतालिकेत कुठे असेल, हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही!

राहुलची खिचडी सदरातील ब्लॉग :

राहुलची खिचडी : मुख्यमंत्र्यांची भाषणबाजी आक्रस्ताळी का झालीय?