Blog : काँग्रेसच्या गेल्या 75 वर्षांचा इतिहास पाहिला तर नेहरू आणि गांधी घराण्याचेच पक्षावर कायम वर्चस्व राहिलेले आहे. या घराण्याला अनेकांनी अडवण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी पक्षही सोडला, वेगळे पक्ष स्थापन केले, सत्ताही मिळवली पण काँग्रेसच्या डीएनएमध्ये असलेला गांधी कुटुंबांचा वरचष्मा हे नेते कमी करु शकले नाहीत. अर्थात गांधी घराण्याची चाकरी न करण्याची इच्छा असलेले असे नेते फार कमी प्रमाणात आहेत. काँग्रेसमध्ये सगळ्यात जास्त नेते अंगात कर्तृत्व आणि धमक असतानाही गांधी कुटुंबांच्या चरणी आपली निष्ठा ठेऊन आहेत. अर्थात यातही ते स्वतःचा फायदाच बघतात.


यश मिळाले की ते त्याचा फायदा उचलायला तयार असतात आणि अपयश आले की गांधी कुटुंबावर टाकून मोकळे होतात आणि याच गोष्टीमुळे पक्षाची धुरा गांधी कुटुंबाकडेच असावी असे त्यांना वाटत असते. म्हणूनच सोनिया आणि राहुल यांच्यानंतर प्रियांका गांधी निवडणुकीच्या मैदानात उतरणार म्हटल्यानंतर अशा नेत्यांना खूपच आनंद झाला आहे. जोमात आलेल्या काँग्रेस पक्षाला प्रियांका गांधी संजीवनीची आणखी एक बूस्टर डोस प्रदान करून 2019 मध्ये सत्तेवर आणतील असा विश्वास आता काँग्रेस नेत्यांना वाटू लागला आहे.


राजकारणात नेत्यांच्या वक्तव्यांना कधीही गंभीरतेने घेण्याची गरज नसते. आज ते एक बोलतात आणि काही दिवसांनी त्या वक्तव्यापासून फारकत घेत अगदी तसेच केल्याचे आपण अनेक वेळा पाहिले आहे. सोनिया गांधी यांनी आपली मुले रस्त्यावर भीक मागतील पण, कधीही राजकारणात येणार नाहीत असे म्हटले होते. प्रख्यात लेखिका तवलीन सिंह यांच्या ‘दरबार’ पुस्तकात ही माहिती दिलेली आहे. पण काही काळानंतर सोनिया गांधी स्वतः तर राजकारणात आल्याच राहुल आणि प्रियांका यांनाही घेऊन आल्या. राहुल गांधींना तर काँग्रेस पक्षाचे अध्यक्षही बनवले.


लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रियांका गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार असे म्हटले जात होते तेव्हा आपण निवडणूक लढवणारच नाही असे प्रियांका गांधींनी स्पष्ट केले होते. प्रियांकाचे पति रॉबर्ट वड्रा निवडणूक लढवणार असेही म्हटले जात होते. पण रॉबर्ट वड्रांना तिकीट दिले तर जनता काँग्रेसवर आणखी नाराज होईल असा अहवाल आल्यानंतर रॉबर्ट वड्रांचेही नाव मागे करण्यात आले. राहुल गांधींनी वायनाड आणि रायबरेलीची जागा जिंकली. त्यानंतर आता रायबरेलीची जागा कायम ठेवत त्यांनी वायनाडमघून राजीनामा दिला. 


आता वायनाडमधून प्रियांका गांधी पोटनिवडणूक लढवणार असल्याचे सांगितले जात आहे. 2019 पासून राजकारणात सक्रिय असलेल्या प्रियांका गांधी या कांग्रेस पक्षाच्या महासचिव आहेत. निवडणुकीच्या मेदानात उतरणाऱ्या प्रियांका या गांधी कुटुंबातील दहाव्या सदस्य आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, फिरोज गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी, संजय गांधी, मनेका गांधी आणि वरुण गांधी यांनी यापूर्वी निवडणुका लढवलेल्या आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचा जोरदार प्रचार केला होता. भाजप आणि मोदींना सडेतोड उत्तर प्रियांका देत होत्या.


स्वतःला अटक करवून घेण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. प्रियांकांमध्ये काँग्रेसजनांना इंदिरा गांधींचा भास होत होता. उत्तर भारतातच जास्त सक्रिय असलेल्या प्रियांकांनी हिमाचलमध्येही काँग्रेसला चांगले यश मिळवून दिले. 2024 च्या निवडणुकीदरम्यान प्रियांका गांधींनी 16 राज्यांमध्ये प्रवास करीत 108 सभा घेतल्या होत्या, लोकप्रियता वाढलेली असल्यानेच  प्रियांका गांधींना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला.


खरे पाहिले तर राहुल गांधींनी वायनाडची जागा स्वतःकडे ठेऊन रायबरेलीची जागा प्रियांकांसाठी सोडायला पाहिजे होती. वायनाडमुळेच राहुल गांधी 2019 मध्ये संसदेत पोहोचले होते आणि यावेळीही वायनाडने त्यांना साथ दिली, मात्र असे असताना त्यांनी वायनाडच्या मतदारांचा अपेक्षाभंग केला आहे.


प्रियांका गांधींना वाडनायडमधून लढवण्याचा निर्णय कोणत्या सल्लागारांनी सोनिया आणि राहुल गांधी यांना दिला ठाऊक नाही. कारण वायनाड हा काँग्रेसचा गड नाही. काँग्रेसने दगड जरी उभा केला तरी तो वायनाडमधून निवडून येईल अशी स्थिती नाही. मुस्लिम, ख्रिश्चन धर्माचे बाहुल्य असलेल्या या मतदारसंघात सोनिया गांधींच्या ख्रिश्चनपणामुळे आणि मोदींच्या तथाकथित मुस्लिम विरोधी भूमिकेमुळे 2019 आणि 2024 मध्ये राहुल गांधींना मते मिळाली.


आताही प्रियांकांना तिकीट देण्यामागे पती वड्रा म्हणजेच ख्रिश्चन आणि पुन्हा एकदा मुस्लिम मतांच्या विश्वासावर प्रियांका निवडून येतील असा मानस सोनिया आणि राहुल गांधींचा आहे. या मतदारसंघात 40 टक्के मतदार हे मुस्लिम, 40 टक्के हिंदू आणि 20 टक्के ख्रिश्चन मतदार आहेत.


गेल्या दहा वर्षांपासून पाहिले तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दक्षिण भारतावर जास्त लक्ष केंद्रित केले आहे. प्रियांका गांधींनी उत्तर प्रदेशमध्ये ज्याप्रकारे मोदींना मात दिली त्याचपद्धतीने दक्षिण भारतातही त्या मोदींवर मात करतील असा विश्वास काँग्रेस नेत्यांना वाटू लागला आहे. प्रियांका वायनाडमधून जिंकल्या तर केरळमध्ये काँग्रेसला नवसंजीवनी मिळेल आणि सत्ताही मिळेल असे वाटते आहे.


खरे तर प्रियांकांना दक्षिण भारतातील राजकारणाचा तसा काही अनुभव नाही. उत्तर प्रदेशचे राजकारण आणि दक्षिण भारतातील राजकारण वेगळे आहे. तेथील परिस्थिती वेगळी आहे. गांधी कुटुंब वायनाडला फक्त गरजेपुरते वापरून घेते असाही एक मेसेज सध्या वायनाडमध्ये मोठ्या प्रमाणावर फिरवला जाऊ लागला आहे. त्यातच भारतीय कम्युनिस्ट पार्टीने पोटनिवडणुकीत उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल गांधींना वायनाडची जागा सोडायचीच होती तर त्यांनी येथून निवडणुकीच्या मैदानात उतरायचेच नव्हते. असेही भाकपाचे म्हणणे आहे.


भाजपही यावेळी येथे आपला उमेदवार उभा करणार असून तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. त्यातच प्रियांकांचे पति रॉबर्ट वड्रा यांचे घोटाळे भाजप बाहेर काढून प्रियांकांना घेरण्याचा प्रयत्न करणार हे निश्चित. त्याचाही निवडणुकीत परिणाम दिसून येईलच. प्रियांका गांधींना या सगळ्या गोष्टींना तोंड द्यायचे आहे.


याशिवाय भाजपकडून परिवारवादाचा आरोप मोठ्या प्रमाणावर केला जाण्याची शक्यता असून त्यालाही त्यांना तोंड द्यावे लागणार आहे. स्वतः प्रियांका गांधींना याची जाणीव झाली असेलच, तरीही त्या निवडणुकीच्या मैदानात उतरत असतील तर त्यामागे नक्कीच मोठे काही तरी कारण असावे असे वाटते.


वायनाडमधून प्रियांका जिंकून येतील आणि संसदेत सोनिया, राहुस, प्रियांकांचे त्रिकुट मोदी सरकारवर तुटून पडेल आणि काँग्रेस २०२९ मध्ये मोठ्या प्रमाणावर यश मिळवेल अशी आशा काँग्रेसजनांना वाटू लागली आहे. ती कितपत खरी ठरते हे काळच ठरवेल.