Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी २०१८ पासून भाजप विशेषतः नरेंद्र मोदी यांचा पराभव करण्यासाठी विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न करतायत. आताही ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपती निवडणुकीच्या निमित्ताने विरोधी पक्षांना एकत्र आणले. दिल्लीत विरोधी पक्ष नेत्यांची बैठक झाली. एमआयएमचे ओवैसी, आपचे अरविंद केजरीवाल, शिरोमणी अकाली दल, बसपा आणि टीडीपी नेते मात्र या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. ज्या राज्यांमध्ये गैरभाजप सरकार आहे अशा राज्यातील नेते या बैठकीला उपस्थित होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी गळ घालण्यात आली. पण त्यांनी नकार दिल्याने आता पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल आणि महात्मा गांधींचे नातू गोपालकृष्ण गांधी, फारुख अब्दुल्ला यांच्या नावाचा विचार सुरु असल्याचे सांगितले जात आहे. 


ममतांचा विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न पहिल्यांदाच होतोय असे नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीही भाजपविरोधातील सर्व पक्ष एकत्र आले होते. ममता बॅनर्जींपासून चंद्राबाबू नायडू, सीताराम येचूरी, शरद पवार, एमके स्टॅलिन, अजित सिंह, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल, सीताराम येचूरी असे जवळपास ११ मोठे आणि काही छोट्या पक्षांचे नेते एकत्र आले होते. या नेत्यांनी एका मंचावर येत एकमेकांचे हात हातात घेऊन ऊंचावून दाखवले होते. आम्ही सगळे एकत्र असून  भाजप आता हरणार असा विश्वास या नेत्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. पण ऐन निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांच्या एकीत बेकी झाली आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भलतेच घडले. भाजपने २०१४ पेक्षा जास्त जागा जिंकल्या आणि काँग्रेस तर २०१४ पेक्षा आणखी कमी जागा जिंकू शकली.


तेलंगणा राष्ट्र समितीचे के. चंद्रशेखर राव आणि बंगालमध्ये भाजपला हरवल्याने आत्मविश्वास वाढलेल्या ममता बॅनर्जी यांनीही पुन्हा एकदा विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरु केले. के. चंद्रशेखर राव यांनी विविध पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या. ममता बॅनर्जी यांनीही नेत्यांच्या भेटी घेतल्या, मात्र त्याच वेळेस ममतांनी काँग्रेसवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. त्यावरून बराच गदारोळही माजला होता. काँग्रेस नेत्यांनीही ममतांना चांगलेच सुनावले होते.


खरे तर काँग्रेसने भाजपविरोधातील पक्षांना एकत्र आणण्याच प्रयत्न केला पाहिजे, पण काँग्रेस तसे का करीत नाही ते समजत नाही? सर्व विरोधी पक्षांकडे जेवढी मते आहेत त्यातील ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते एकट्या काँग्रेसकडे आहेत. तसेच फक्त काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे जो संपूर्ण देशभरात पसरलेला आहे. पण केवळ नेतृत्वामुळे काँग्रेस उभारी घेऊ शकत नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. काँग्रेस नेतृत्व नाराज नेत्यांकडेही लक्ष देत नसल्याने काँग्रेसचे दिवसेंदिवस नुकसानच होत आहे. असे असले तरी ममतांनी बोलावलेल्या बैठकीला मात्र काँग्रेस नेते उपस्थित राहिले. या बैठकीत सर्व पक्षांनी एकमताने उमेदवार द्यावा असे ठरले असून ते नाव ठरल्यानंतर पुन्हा एकदा या सगळ्यांची बैठक होणार आहे.


२०१७ मध्येही राष्ट्रपती निवडणुकीबाबत असाच प्रकार घडला होता. वायएसआर काँग्रेस, बीजद, टीआपएस, एआयएडीएमके, लोकदलाने भाजपचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा दिल्याने त्यांचा विजय झाला होता. एवढेच नव्हे तर कांग्रेससोबत असलेल्या नीतिशकुमार यांनीही भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या उमेदवार मीरा कुमार यांचा पराभव झाला होता. त्यामुळे भाजप उमेदवाराचा पराभव करण्याचे विरोधी पक्षांचे स्वप्न स्वप्नच राहिले होते.


आता पुन्हा एकदा मोदींविरोधात विरोधी पक्ष एकत्र आले खरे, पण ते शेवटपर्यंत एकत्र राहतील का हा प्रश्न आहे. याचे कारण म्हणजे उमेदवार नक्की झाला की, प्रत्येक पक्ष आपापली नखे बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी स्पष्ट केलेलेच आहे की, काँग्रेसच्या पसंतीचा उमेदवार असेल तरच आम्ही पाठिंबा देऊ. बाकीचे पक्षही आपल्या अपेक्षा नक्कीच व्यक्त करतील. दुसरी गोष्ट अशी की, भाजपकडे राष्ट्रपती निवडून आणण्याएवढे पुरेसे बळ आहे आणि भाजप नेत्यांनी काँग्रेससह अन्य विरोधी पक्षाच्या नेत्यांशी उमेदवाराच्या नावाबाबत चर्चा करण्याचे सूतोवाच केलेलेच आहे.


विरोधकांमध्येही चंद्रशेखर राव, ममता बॅनर्जी यांना राष्ट्रीय पातळीवर पुढे यायचे आहे. पंतप्रधानपदाकडे त्यांचे लक्ष असल्याने हे दोघेही वेगवेगळे प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे राष्ट्रपती निवडणुकीच्या निमित्ताने ममतांची विरोधकांना एकत्र आणण्याची खेळी कितपत यशस्वी ठरेल असा प्रश्न मनात आल्याशिवाय राहात नाही.