खासदार रवी गायकवाडांच्या प्रकरणात शिवसेना गेल्या दोन आठवडयांपासून निवदेनं, बैठका याच मार्गानं चाललेली होती. मात्र पंधरा दिवस उलटल्यानंतरही हाती काही लागत नाहीये म्हटल्यावर सेनेनं पवित्रा बदलत आपल्या जुन्या स्टाईलनं लोकसभा दणाणून सोडली. गायकवाडांनी मारहाणीचं कृत्य केलं असल्याचं त्याचं समर्थन नाही, पण यात खरं खोटं कोण हे सिद्ध व्हायच्या आधीच हवाई कंपन्यांनी ज्या पद्धतीनं सामूहिक प्रवेशबंदी घातलीय ती चुकीची आहे, कुठल्या कायद्यानुसार तुम्ही एखाद्या खासदाराला असं प्रवास करण्यापासून रोखताय हा सेनेचा सवाल होता. शिवाय चप्पलीनं मारल्यावर त्यावर 308 सारखं जीवे मारण्याच्या प्रयत्नाचं कलम पोलीस कसं काय टाकू शकतात हा सेनेचा सवाल आहे.


दिवसाची सुरुवात झाली तीच मुळी खासदार रवी गायकवाडांच्या गनिमी काव्यानं संसदेत झालेल्या प्रवेशानं. चार्टर्ड प्लेननं गायकवाड दिल्लीत आल्याच्या केवळ अफवाच होत्या. प्रत्यक्षात गायकवाड आले ते राजधानी एक्सप्रेसनंच. सकाळी शिवाजी ब्रिज स्टेशनवरच ते उतरले. तिथून त्यांना गुपचूपपणे खासदार बंडू जाधव यांच्या निवासस्थानी नेण्यात आलं. मीडियाचा ससेमिरा चुकवत त्यांना संसदेत पोहचवण्याची जबाबदारी दोन खासदारांवर सोपवण्यात आली होती. त्यांनी चोखपणे ते काम बजावलं. बरोबर दहा वाजता मुख्य प्रवेशद्वारातून हे खासदार गायकवाडांना घेऊन आतमध्ये प्रवेशले. शिवसेनेचे बरेचसे खासदार हे संसदेच्या दोन नंबर गेटमधून ये जा करत असतात, त्यामुळे माध्यमांचा गराडा तिकडे असणार हे ओळखून मेन गेटनंच ते आत आले. संसदेतल्या शिवसेनेच्या कार्यालयात गायकवाड आणि बाकीचे सगळे खासदार अशी बराच वेळ बंद दाराआड चर्चा झाली. गायकवाडांनी सभागृहात नेमकं काय बोलायचं याचा थोडक्यात सराव यावेळी चालू होता. थोड्या वेळानं संजय राऊत हे गायकवाडांना खांद्याला धरुनच बाहेर घेऊन आले. आम्ही दोघे तिघेच मीडियाचे प्रतिनिधी तिथे हजर. पण तरीही कुठल्या मीडियाला ते सापडू नयेत यासाठी जवळपास कडंच करुन त्यांना लोकसभा सभागृहात पोहचवण्यात आलं. शिवसेना कसा आवाज उठवतेय हे लोकसभेच्या गॅलरीत बसून बघणार आहे असं जाताना संजय राऊत सांगून गेले.

ठरल्याप्रमाणे अकरा वाजता शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांनी या मुद्द्यावर स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली. लोकसभा अध्यक्षा हा प्रस्ताव मान्य करणार नव्हत्याच. पण तो फेटाळताना त्यांना झिरो अवरमध्ये बोलू दिलं जाईल अशी रणनीती ठरली होती. त्यानुसार बारा वाजता रवी गायकवाड या प्रकरणात आपली बाजू मांडायला उठले. हातात लिहून दिलेलं दोन पानांचं निवेदन होतं. पण तरीही त्यांनी मधूनमधून स्वयंफूर्तीनं बोलत आपली बाजू मांडली. माझ्या पक्षप्रमुखांनी मला सांगितलंय, की माझ्याकडून सभागृहाचं अवमान करणारं वर्तन झालेलं असेल तर मी सदनाची माफी मागतो. मात्र एअर इंडियाच्या कर्मचा-याची माफी नाही मागणार. माझ्याविरोधात मीडिया ट्रायल सुरु आहे असे मुद्दे मांडत त्यांनी आपलं निवेदन दिलं. गंमत म्हणजे या सगळ्यात गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना अमेरिकेनं केलेली व्हिसाबंदी आणि हवाई कंपन्यांनी आपल्यावर घातलेली सामूहिक बंदी ही सारखीच असल्याचाही दावा केला. गायकवाडांना सभागृहात बोलताना पहिल्यांदाच पाहायला मिळालं. तसे ते शिक्षक असल्यामुळे हिंदीतुसद्धा बरेच बोलले. फक्त मतदारसंघातले प्रश्न मांडतानाही त्यांचं हे कसब दिसत राहावं एवढीच सदिच्छा. असो. पण खरा ड्रामा अजून पुढेच आहे.

गायकवाडांच्या नंतर केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी सेनेच्या बाजूनं किल्ला लढवला. खरंतर सभागृहातल्या चर्चेत मंत्री हे केवळ प्रश्नांची उत्तरं देण्यासाठीच असतात. पण आज थेट मंत्र्यांनीच खासदाराच्या बाजूनं आवाज उठवत हे प्रकरण आपण किती गंभीरपणे घेतोय हे सांगायचा प्रयत्न केला. मारहाण केली असेल तर त्यावर काय कारवाई करायची ती करा. त्याला आमचा विरोध नाही. पण सामूहिक बंदी कशी काय घालू शकता असा थेट सवाल गीतेंनी हवाई वाहतूकमंत्र्यांना विचारला. पण विमान हे एक मशीन आहे. त्यात सुरक्षेशी कुठलीही तडजोड करणार नाही. जे काय व्हायचं ते कायद्यानुसारच होईल असं गुळमुळीत उत्तर देऊन हवाई वाहतूक मंत्री गजपती राजू हे खाली बसले. या सपक उत्तरानं शिवसेनेचा पारा चढला. त्यांनी सभागृह डोक्यावर घ्यायला सुरुवात केली. मध्येच टीएमसीचे खासदारही सेनेच्या मदतीला धावले. मुळात सामूहिक बंदी कुठल्या कायद्यानुसार घातली ते सांगा असा सवाल हे खासदार विचारत होते. या सगळ्या गदारोळात लोकसभेचं कामकाज पंधरा मिनिटासाठी तहकूब झालं.

कामकाज तहकूब झाल्यानंतर सभागृहात जे पाहायला मिळालं ते तर आणखी अद्भुत होतं. सगळ्या शिवसेना खासदारांनी हवाई वाहतूक मंत्री गजपती राजूंना घेराव घातला. गीतेंचा पारा तर सगळ्यात जास्त चढलेला होता. गजपती राजूंच्या जवळपास अंगावर जाऊन धाऊन जातायत असं वाटावं इतक्या तावातावानं ते बोलत होते. निर्णय लवकर घेतला नाही तर मुंबईतून एकही विमान उडू देणार नाही हे त्या गदारोळात हलकं ऐकू आलेलं वाक्य तर दिल्लीत दिवसभर चर्चेचा विषय राहिलं. गीतेंचा आवेश पाहून संसदीय कामकाज राज्यमंत्री अहलुवालिया, स्मृती इराणी या मध्यस्थीसाठी धावल्या. शेजारी असलेल्या सुप्रिया सुळेंनीही गृहमंत्री राजनाथ सिंह यांना विनंतीवजा इशारा केला. राजनाथ सिंह त्यानंतर तिथे आले, त्यांनी गीतेंना धरुन शेजारच्या बाकावर बसवलं. थोडं पाणी प्यायला दिलं. त्यानंतर कुठे गीते शांत झाले.

त्यानंतर सुरु झाला बॅकडोअर बैठकांचा सिलसिला. सुमित्राताई महाजनांच्या दालनात सेना खासदार पोहचले. तिथे बराच वेळ खलबतं चालू होती. ही बैठक लांबल्यानं सुमित्राताई सदनातही आल्या नाहीत. त्यामुळे कामकाज दोनवेळा तहकूब झालं. शेवटी सव्वा एक वाजता गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या निवेदनानं वातावरण काहीसं निवळलं. दोन्ही मंत्र्यांशी चर्चा झाली असून या प्रकरणावर लवकरच तोडगा काढू असं आश्वासन यावेळी राजनाथ सिंहांनी दिलं.
त्यानंतर हा तोडगा नेमका काय असणार याबद्दल शिवसेना खासदार, हवाई वाहतूक मंत्री गजपती राजू असे सगळे गीतेंच्या संसदेतल्या कार्यालयात चर्चा करायला जमले. सकाळी गीतेंनी ज्या पद्धतीनं त्यांना जवळपास धमकावलं होतं ते बघता, गीते आणि इतर शिवसेना खासदारांसोबत केबिनमध्ये एकटे गजपती राजू आहेत हे ऐकूनच बाहेर पत्रकारांमध्ये एकापाठोपाठ हास्याचे फवारे फुटत होते. दरम्यान या बैठकीत तोडग्याविषयी चर्चा झाली. गायकवाडांनी दिलगिरीचं पत्र द्यायचं, त्यानंतर त्यांच्यावरची हवाई वाहतूक बंदी मागे घेतली जाईल अशी रणनीती ठरली.

सेनेचा दुसरा मुद्दा होता तो 308 कलमाचा. त्यावरही राजनाथ सिंहांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय. पण तो वगळण्याची प्रक्रिया अजून काही वेळ घेईल.

तर गायकवाडांचं नेमकं काय करायचं यावर शिवसेनेत जो एक संभ्रम दिसत होता, तो आज अखेर संपला. लोकसभेचं कामकाज ज्या शिस्तीत, चौकटीत चालतं त्याच्या पलीकडचं सेना स्टाईल कामकाज आज दिवसभरात पाहायला मिळालं. गॅलरीत बसलेले खासदार संजय राऊत हे कोचच्या भूमिकेत होते. संजय राऊत गॅलरीत आल्याचं भाजप खासदारांनाही कळलं होतं. त्यामुळेच कामकाज तहकूब झाल्यावर भाजपचे युवा खासदार अनुराग ठाकूर हे त्यांच्याकडे बघून हसत अरे आप जाईए, हम संभाल लेंगे अशा पद्धतीचे हावभाव करत होते. आज सगळ्यात आश्चर्याचा धक्का दिला तो अनंत गीतेंनी. गीतेंना एवढा राग येतो, आणि एवढ्या तावातावानं ते बोलतात याचं दर्शन पहिल्यांदाच झालं. हे कशामुळे झालं माहिती नाही, मातोश्रीवरुन नेमकं काय इंजेक्शन मिळालं होतं याचा तपास करायला हवा. पण एक नक्की म्हणता येईल गीतेंमधला शिवसैनिक अजून जागा आहे हे आज स्पष्ट झालं.

गायकवाड प्रकरणानं शिवसेनेची आधीच खूप बदनामी झालीय. ती आणखी होऊ नये यासाठी शिवसेनेकडे दोन पर्याय होते. जे होतंय ते सहन करत राहायचं किंवा बस्स झालं असं म्हणत इंगा दाखवायचा. सेनेनं दुसरा पर्याय निवडल्याचं दिसतंय.