अमरनाथ हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये शिरताना मनात तशी थोडी धास्तीच होती. श्रीनगर ते गुलमर्गच्या रस्त्यापर्यंत पावलापावलावर उभं असलेलं लष्कर पाहिल्यावर आपण काश्मीरमध्ये आहोत याची जाणीव व्हायला लागते. पण अमरनाथकडे जाणारा बालाटलचा रस्ता मागे टाकत गाडी जेव्हा जोझिला खिंडीतून कारगिलकडे निघते, तेव्हा क्षणा-क्षणाला चित्र बदलायला लागतं. तणावानं कोंदटलेलं मन हलकं होत जातं आणि एका वेगळ्या काश्मीरचं दर्शन आपल्याला घडतं. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी उत्तुंग पर्वतरांगा, याही दिवसात कुठे कुठे डोकावणारी बर्फाच्छादित शिखरं, आणि आपुलकीचा भाव जपणारी माणसं भेटू लागल्यावर फरक लगेचच जाणवू लागतो.


सध्याच्या स्थितीत काश्मीर म्हटल्यावर सतत धगधगणारं, दगडफेकींच्या घटनांनी धुमसणारं राज्य हीच प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर येऊ शकते. पण कारगीलमधे या सगळ्या तणावाची सावलीही जाणवत नाही.



पुण्याच्या सरहद संस्थेनं आयोजित केलेली पहिली कारगील आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन अगदी उत्साहात पार पडली.  मुळात काश्मीरमधली भौगोलिक परिस्थिती नीट समजून घेतली तर आपल्या लक्षात येईल की अशांततेचं वारं हे जम्मू काश्मीर राज्याच्या चार-पाच जिल्ह्यातच वाहत असतं. काश्मीर खोरं, लडाख आणि जम्मू हे राज्याचे तीन प्रमुख भाग. लडाखमध्ये बौद्ध, काश्मीर खोऱ्यात मुस्लिम, तर जम्मूमधे हिंदू अधिक. कारगील हे लडाख प्रांतात येतं. संख्येनं इथं मुस्लिमच अधिक आहेत. पण इथले मुस्लिम शियापंथीय आहेत, शिवाय त्यांचा भारतासोबतचा बंध हा अधिक बळकट आहे.

कारगील म्हटलं की आपल्याला 1999 चं युद्ध आठवतं. इथल्या महाकाय हिमालायीन पर्वतरांगांच्या साक्षीनंच भारतानं पाकिस्तानच्या चिंधड्या उडवल्या होत्या. शिवाय ज्या ताशी नामग्याल या मेंढपाळानं पाकच्या सीमेवरच्या हालचालींची माहिती भारतीय लष्कराला सर्वात प्रथम कळवली होती, तेही इथलेच. पण कारगीलची ओळख केवळ युद्धभूमीपुरती मर्यादित ठेवणं हे त्यावर अन्याय केल्यासारखं होईल.



इतिहासात भारतीय उपखंडाच्या आर्थिक प्रगतीचा जो रेशीम मार्ग अर्थात सिल्क रुट होता, त्या मार्गावरचं हे महत्वाचं ठिकाण. मुळात कारगीलचं जुनं नाव हे गील कार असं होतं. ज्याचा ऊर्दूतला अर्थ where to stay अर्थात कुठे थांबायचं असा होतो. रेशीम मार्गावरुन जाणाऱ्या अनेक प्राचीन धाडसी यात्रेकरुंना सुरु नदीच्या काठावर वसलेलं, चहुबाजूंनी पर्वतराजीनं वेढलेल्या या ठिकाणानं भुरळ पाडली नसती तरच नवल. तेव्हापासूनच कारगील हे महत्वाचं केंद्र होतं. आजही कारगीलची भौगोलिक रचना लक्षात घेतली तर प्राचीन काळातल्या लोकांनी किती हुशारीनं या ठिकाणाची निवड केली असेल, तेही गुगल मॅप, कंम्प्युटरसारखं आधुनिक तंत्रज्ञान नसताना याचं आश्चर्य वाटतं. कारगील हे त्याच्या आसपासची जी सगळी महत्वाची ठिकाणं आहेत, लेह, श्रीनगर, स्कर्दू, झंस्कार यांच्यापासून अगदी समान अंतरावर वसलेलं आहे. पण दुर्दैवानं आज कारगीलला पर्यटनाच्या क्षेत्रात अजूनही स्वताची ओळख मिळालेली नाहीय. श्रीनगर ते लेह या मार्गावरचा वन नाईट स्टॉप एवढाच कारगीलचा वापर केला जातो. कारगीलची हीच ओळख पुसून त्याला टुरिझम मॅपवर आणण्यासाठी कारगील मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं.



सरहदचे संजय नहार हे काश्मीरसोबत अगदी 90 च्या दशकापासून जोडले गेलेत. काश्मीरमधल्या अनेक अनाथ मुलांना पुण्यात आणून ते सांभाळतायत, त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करतायत. ज्या कारगीलनं देशासाठी इतकं केलंय, त्यांना बदल्यात अधिक काय देता येईल या विचारातून चर्चा सुरु असताना इथं मॅरेथॉनची सुरुवात करण्याची संकल्पना डोक्यात आली.

काश्मीर खोऱ्यातल्या 700 ते 800 आणि बाहेरच्या जवळपास दीडशेजणांनी या मॅरेथॉनमध्ये भाग घेतला. मॅरेथॉनच्या निमित्तानं बाहेरचे अधिकाधिक लोक कारगीलमध्ये यावेत, इथलं निसर्गसौंदर्य त्यांनी पाहावं, नवनवीन ट्रेकिंग स्पाँट धुंडाळावेत, इथल्या सुफी-बुद्धिस्ट संस्कृतीला जवळून पाहावं हा आयोजकांचा उद्देश. आपल्या गावात असा मोठा कार्यक्रम होतोय याचं कुतूहल कारगीलवासियांच्या मनातही दिसत होतं. इथल्या स्थानिकांनी अगदी आपल्या घरचा कार्यक्रम असल्याप्रमाणे आवश्यक गोष्टींची जबाबदारी उचलली. इथल्या स्थानिक हॉटेल असोसिएशनचं तर खास कौतुक करावं लागेल. त्यांनी आपल्या काही खोल्या मोफत उपलब्ध करुन दिल्या, शिवाय पाळीपाळीनं आयोजक आणि स्पर्धकांच्या जेवणाची जबाबदारीही उचलली. त्यामुळे कारगीलसारख्या काहीशा दुर्गम प्रदेशात मॅरेथॉन आयोजित करण्याचं शिवधनुष्य आयोजकांना सहज पेलता आलं.



मॅरेथॉनच्या पूर्वसंध्येला काही मान्यवरांचा कारगील गौरव या पुरस्कारानं सन्मानही करण्यात आला. या कार्यक्रमासाठी देशाचे संरक्षणराज्यमंत्री सुभाष भामरे आवर्जून उपस्थित होते. एखादा केंद्रीय मंत्री कारगीलमध्ये अशा सार्वजनिक सोहळ्याला उपस्थित राहण्याची ही पहिलीच वेळ. कसलीही भीड न बाळगता केंद्रीय मंत्री या सोहळ्याला आले याचं कौतुक कारगीलमधल्या स्थानिक नेत्यांच्या बोलण्यातही जाणवत होतं.

कारगीलनं देशासाठी योगदान देऊनही इथल्या स्थानिकांना लष्कर भरतीत दुजाभाव केला जातो याकडे एका स्थानिक नेत्यानं लक्ष वेधलं. त्यावर भामरेंनी असं काही असल्यास आपण आवर्जून त्यात लक्ष घालू, कारगीलवर असा अन्याय होऊ देणार नाही असं आश्वासन दिलं. कारगील गौरव या पुरस्कारानं ज्यांना सन्मानित करण्यात आलं, त्यात एक मराठी नावही होतं वीणा पाटील यांचं. वीणा वर्ल्डच्या माध्यमातून त्यांनी काश्मीरमधलं पर्यटन वाढवण्यात मोठं योगदान दिलंय.



हिमालयाच्या साक्षीनं, अगदी सीमेवर होणारी ही मॅरेथॉन खरंतर अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण होती. त्यातही या स्पर्धेत भेटलेलं एक अफलातून व्यक्तिमत्व कधीच विसरता न येणारं. मेजर डी पी सिंग असं त्यांचं नाव. 1999 च्या युद्धात मेजर डीपी सिंह हे शत्रूशी लढताना जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांना मृत घोषित करण्यात आलं होतं. पण जगण्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीनं त्यांनी मृत्यूलाही परतावलं. एक पाय गमावल्यानंतरही त्यांची धावण्याची आवड कुणी रोखू शकलं नाही. ब्लेड रनर म्हणून अनेक मॅरेथॉनमध्ये ते अजूनही भाग घेत असतात. शिवाय ज्या दिवशी त्यांना शहीद घोषित केलं होतं, त्या दिवशी ते स्वत:ची पुण्यतिथीही केक कापून साजरी करतात. जगण्याकडे अशा स्पिरीटनं पाहणारा हा लष्करी अधिकारी नकळत तुम्हाला हत्तीचं बळ देऊन जातो.

श्रीनगर ते कारगील हा जवळपास सहा तासांचा प्रवास आहे. जोझिला खिंड हा या मार्गावरचा सगळ्यात आव्हानात्मक टप्पा. मातीच्या अरुंद रस्त्यावर एका बाजूला बर्फाच्या कड्यांमधून डोकावणाऱ्या कपाऱ्या आणि दुसऱ्या बाजूला डोळे विस्फारावेत इतकी खोल दरी... लोकल ड्रायव्हर सोबत असेल तर अशी अवघड वळणंही ती ज्या सफाईपणे पार करतात ते थ्रिल अगदी जरुर अनुभवण्यासारखं. अर्थात अँडव्हेंचर म्हणून या रस्त्याचं आपल्याला कौतुक वाटत असलं तरी ही स्थिती लवकरच बदलायला पाहिजे हेही खरंय. जोझिला ही 9 किमी लांबीची खिंड आहे, 11 हजार फुटांवरची. 1947 ला फाळणीनंतर जे भारत-पाक युद्ध झालं होतं, त्यात पाक सैन्यानं या जोझिला खिंडीवर कब्जा करुन लडाख भारतपासून तोडण्याचा प्रयत्न केलेला होता. अर्थात भारतीय सैन्यानं पाकचे हे मनसुबे फार काळ टिकू दिले नाहीत. पुस्तकाचं एकेक पान उलगडावं अगदी तसं हिमालयीन रांगेतल्या दरीखोऱ्यांचं सौदर्य उलगडून दाखवणारी ही खिंड तुमचा प्रवास अविस्मरणीय करुन टाकते.

कारगीलमधल्या तीन दिवसांच्या वास्तव्यात सगळ्यात भारावून टाकणारी बाब म्हणजे इथल्या स्थानिकांचा पाहुणचार. कारगीलमध्ये केवळ बीएसएनल आणि एअरटेलचीच रेंज मिळते. त्यामुळे आम्हाला मॅरेथॉनचं फीड ऑफिसला पाठवण्यात जी काही सर्कस करावी लागत होती, त्यासाठी इथल्या स्थानिक पत्रकारांनी मोहीमच हाती घेतली होती. जणू स्वताचाच प्राँब्लम आहे असं समजून ते खटपट करत होते. एका मिनिटांचं फीड पाठवायला चांगले तीन-चार तास घालवावे लागत होते. पण तरीही नूर, सज्जाद, बशारत सारखे पत्रकार आपलं काम बाजूला ठेवून आम्हाला मदत करण्यासाठी सरसावले होते. शिया मुस्लिम अधिक असल्यानं कारगीलची इराणशीही थोडी जवळीक आहे. इराण हा सुन्नी पंथीयांना वेढलेला शियाबहुल देश. काही विदयार्थी शिक्षण घेऊन पुढे इराणमधेही काम करतात. शिवाय इराणचा माजिद माजिदी इथल्या लोकांमध्ये किती लोकप्रिय आहे याची झलक अगदी सहज बोलता बोलताही जाणवते.

काश्मीरच्या संस्कृतीचा उल्लेख करण्यासाठी काश्मिरीयत या शब्दाचा उल्लेख अनेकदा केला जातो. ही काश्मीरियत दुसरं तिसरं काही नसून लडाखमधलं बुद्धिझम, कारगीलमधला सुफीझम, आणि काश्मिरी शैविझम यांचा संगम आहे.

या काश्मिरीयतचा प्रेमळ अनुभव प्रत्यक्ष घेण्यासाठी एकदा तरी कारगीलला जायलाच हवं.

‘दिल्लीदूत’ सदरातील याआधीचे ब्लॉग ब्लॉग:
दिल्लीदूत : नितीश, मोदींच्या आडोशातलं रोपटं बनणार की विरोधातला वटवृक्ष?

दिल्लीदूत : मोदींची कुणाशी स्पर्धा सुरु आहे?

दिल्लीदूत: राष्ट्रपती निवडणुकीचा इतिहास काय सांगतो?

दिल्लीदूत : राष्ट्रपतीपदासाठी मोदींचं दलित कार्ड

BLOG: मनमोकळ्या मूडमधले अमित शहा

दिल्लीदूत : कोण असणार मोदींचे कलाम?

दिल्लीदूत : भ्रमाचा भोपळा

दिल्लीदूत : लोकसभेत ‘सेना स्टाईल’ कामगिरीनं गाजलेला दिवस !

दिल्लीदूत : मराठा तितुका झोडपावा..

इलेक्शन डायरी- मोदी वाराणसीत, तसे राहुल अमेठीत का नाही?

इलेक्शन डायरी : गोरखपूरचं समांतर सरकार- योगी आदित्यनाथ

इलेक्शन डायरी : वाराणसीत तळ ठोकून का आहेत मोदी?

दिल्लीदूत : बीएमसी- दिल्लीकरांनी लादलेलं युद्ध

हार्दिक पटेल गुजरातचा बाळासाहेब ठाकरे होऊ शकेल?

दिल्लीदूत : सत्तांतराचा लखनवी एपिसोड

दिल्लीदूत : एक अनुभव राजधानीतल्या बाबूशाहीचा

दिल्लीदूत : गालिब की हवेली

दिल्लीदूत : शांतता, गोंधळ चालू आहे!

दिल्लीदूत : काही ( खरंच) बोलायाचे आहे…

दिल्लीदूत : दीदी बडी ड्रामा क्वीन है..

दिल्लीदूत : जेव्हा मनमोहन सिंह बोलतात…