वेश्या हा शब्द ऐकला तरी अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो, काहींच्या भुवया उंचावतात, काहींच्या तोंडात त्यांच्याबद्दल सर्रास वापरली जाणारी शिवी येते तर काहीजण त्या विषयाकडे दुर्लक्ष करुन बोलणं टाळतात. जिथे स्त्रियांच्या मासिक पाळीबद्दल आज अजूनही जनजागृती करावी लागते. तिथे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या आमच्या पुराणांनी सांगितलेल्या चार पुरुषार्थांपैकी ‘काम’ या विषयावर आम्ही उघडपणे बोलणं म्हणजे आमची अक्कल दिवाळखोरीत निघाली आहे असं ठाम मत होतं. मुळात आपल्याकडे सेक्स ही गोष्ट इतकी टॅबू आहे, की सेक्स ही जरी चारचौघात करायची गोष्ट नसली तरी त्यावर चारचौघात बोललं गेलं पाहिजे हेच आम्ही विसरुन गेलोय. आणि मग अशा वातावरणात ज्या महिला उघडपणे सेक्स ही गोष्ट प्रोफेशन म्हणून निवडतात, त्या या सूचिर्भूत समाजाच्या दृष्टीने केवळ गुन्हेगारचं नाही तर महापापी ठरतात.


तर वेश्या या समाजातल्या घटकाला मी पहिल्यांदा पाहिलं ते मुंबईच्या कामाठीपुरा या परिसरात. लहान होते त्यामुळे त्यातलं काहीही मला कळत नव्हतं. पण अत्यंत भडक रंगाच्या साड्या, गॉडी मेकअप करुन त्यांचे ठरलेले अंगविक्षेप करत त्या रस्त्यावर उभ्या होत्या. ‘या बायका अशा का उभ्या आहेत, यांचा मेकअप कोणी केला आई?’ या माझ्या प्रश्नाला आईने टाळलं अर्थात ते कोणतेही पालक टाळतील. त्यानंतर माझा समाजातला या घटकाशी संपर्क आला तो संतसाहित्यातून... आता तुमच्या भुवया उंचावतील की इतक्या पवित्र विषयातून इतक्या अपवित्र (समाजाच्या मानसिकतेनुसार) विषयाची माहिती. साधारण पाचवी सहावीत असताना संत कान्होपात्रांच्या रचना अभ्यासाला होत्या, त्या समजावून सांगताना समाजातल्या या घटकाशी आईने माझी गाठ घालून दिली. एका गणिकेच्या पोटी जन्मलेली स्री जेव्हा ‘घेई कान्होपात्रेस ह्रदयास’ अशी आर्त हाक घालते तेव्हा मनाशी खात्री पटली की जर तुमचं मन, भाव पवित्र असेल तर समाजाने तुम्हाला कितीही अपवित्र ठरवलं तरी त्याला काडीचीही किंमत नसते. कारण देह मलिन झाला तरी आत्मा शुद्ध असेल तर समाजाने नाकारलं तरी देव जवळ घेतो हे त्याच संत रचनांमधून शिकायलं मिळतं.


वेश्या व्यवसाय हे सगळ्यात ओल्डेस्ट प्रोफेशन मानलं जातं. राजशाही होती तेव्हा गणिका होत्या नायकिणी होत्या. तेव्हाही कुंटणखाने चालवले जायचे. अकबराच्या काळात मीनाबाजार भरवले जात असायचे. सध्याच्या जमान्यात त्याला सेक्स वर्कर्स असा सोफिस्टिकेटेड शब्द आलाय. शब्द बदलले, जागा बदलल्या, वेश्यांचं रहाणीमान बदललं पण समाजाची त्यांच्याकडे बघण्याची ‘नजर’ काही बदलली नाही. ‘सुहास कुलकर्णी’ यांच्या ‘अर्धी मुंबई’ या पुस्तकात त्यांनी वेश्यांच्या यातनांचं अतिशय विदारक सत्य समोर मांडलंय. त्या वेश्यांनी असे काही अनुभव घेतलेत, अशा काही प्रसंगांना त्यांना सामोरं जावं सागलंय की सर्वसामान्य आयुष्य जगणारी आपण माणसं त्याचा विचारही करु शकत नाही. कधी मनाविरुद्ध, कधी इच्छा नसताना, कधी मासिक पाळी सुरु असताना आणि कधी कधी गरोदर असाताना सुद्धा त्यांच्या नशीबी आलेले हे मैथूनचक्र मात्र कधीही थांबत नाही. दरवेळी नव्या उत्साहाने आलेल्या गिऱ्हाईका सामोरं जायचं. प्रसंगी शिव्या खायच्या, विकृती सहन करायची, आणि हे सगळं केल्यानंतर येणारा पैसा मात्र ठेकेदाराच्या हातात. जसजसं शरीर म्हातारं होत जाणार तसतसा दर ही कमी होत जाणार. भूतकाळाचं माहित नाही, भविष्याचा पत्ता नाही, फक्त वर्तमान ढकलत रहायचं. या सगळ्यामध्ये आरोग्य, मानसिक स्वास्थ्य, स्वच्छता, या सगळ्या गोष्टींशी यांचा संबंधचं नसतो. कारण त्या मुलभूत गोष्टी कधी त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाहीत. या सगळ्यातून जन्माला येणारी मुलं, त्यांचं काय? त्यांचं भविष्य तर आणखी अंधारात असतं. एका वेश्येचं मूल म्हणून आपला सो कॉल्ड ‘समाज’ त्याचा कधी स्वीकार करेल? महाराष्ट्रात जातीच्या भिंती इतक्या पक्क्या असूनही आज एखादा बाप आपल्या मुलाचं लग्न परजातीतल्या एखाद्या मुलीशी लावून देउ शकतो, पण तो माणूस एखाद्या वेश्येच्या मुलीशी आपल्या मुलीची लगीनगाठ बांधणार नाही, भलेही ती त्या सगळ्या विश्वापासून कितीही लांब असेल तरीसुद्धा.


कसंय की हिंदी मराठी चित्रपटांमध्ये वेबसिरिजमध्ये दाखवलं जाणारं वेश्यांचं विश्व आपण खूप सहज स्वीकारतो. बेगम जान आपल्याला जाम भारी वाटते, चंद्रमुखीवर आपण फिदा असतो, पण जेव्हा आपल्याला कळतं की आपल्याच सोसायटीत अमुक एका फ्लॅटमध्ये रहाणारी मुलगी कॉल गर्ल आहे तेव्हा मात्र आपल्या सो कॉल्ड ‘सोसायटी’ मधून तिला वाळीत टाकलं जातं. या वेश्याचं आयुष्य म्हणजे स्वतःची गरज भागवण्यासाठी टेहळणी करणारी माणसं आणि देहविक्रय करणारी म्हणून हेटाळणी करणारी माणसं यांच्या द्वंद्वात अडकलंय...वर्षानुवर्ष


मुलीचं चारित्र्य म्हणजे काच वगैरे या भ्रामक समजुतींनी वेश्यांच्या तिरस्काराला सदैव खतपाणी घातलंय आणि म्हणूनच जेव्हा एखाद्या स्त्रिच्या चारित्र्यावर घाव घालायचा असतो तेव्हा तिला आपण सरळ ‘बाजारु औरत’ नावाचा शिक्का मारुन मोकळे होतो.


मला समाजात रुजलेल्या तथाकथित पुरुषी मानसिकतेवर बोलायचं नाहीये. पण सर्वसामान्य घरातल्या स्त्रियांकडे सुद्धा ऑब्जेक्ट म्हणून बघितलं जातं. एक माणूस म्हणून असलेली सब्जेक्टीव्हिटी तिला प्रदान केली जात नाही तिथे एखाद्या वेश्येची काय कथा? जशा सर्वसामान्य स्री ला भावभावना असतात, तिचं स्वतःचं भावविश्व असतं. तसचं एखाद्या वेश्येचंही असू शकतं हे आपण का स्वीकारु शकत नाही? तिच्या शरिरापलिकडे जात तिचं माणूसपण आपण का स्वीकारु शकत नाही? एखाद्या मुलीची जशी स्वप्न असतात तशी तिचीही असूच शकतात न? पण दुर्दैवाने ती स्वप्न फुलण्याआधीच चुरगळली जातात, तुडवली जातात. तिच्या नशीबी आलेली ही व्यथा म्हणजे अश्वत्थाम्याची भळभळती जखम आहे... आता काही जण म्हणतील की मग इतकं आहे तर पडावं बाहेर त्यांनी या चक्रातून, पण ते इतकं सोपं नाही...या चक्रातून बाहेर पडणारे सुली आणि तायप्पा खूप अपवादाने सापडतील...कारण या लोकांचे ठेकेदार आणि यांची माणसं यांचं जाळं इतकं दाट आणि दूरवर पसरलेलं आहे की कोणी पळून जाण्याचा प्रयत्न केला तर पुढच्या काही तासात त्यांना पकडून आणलं जातं. आणि मग त्यानंतर होणाऱ्या छळाला पारावार नसतो...अंत नसतो. एक साधा प्रश्न या सगळ्या कचाट्यातून सुटून आलेल्या मुलीला एखादी घरातली स्त्री कामवाली बाई म्हणून तरी ठेऊन घेईल का? या प्रश्नाचं जे उत्तर तुमचं मन तुम्हाला देईल त्यावरुन चित्र तुम्हाला स्पष्ट होईल. एका विख्यात मानसोपचार तज्ज्ञांनी प्रसिद्ध केलेला एक पेपर आहे, त्यात ते असं म्हणतात की या वेश्यांचं सामाजिक पुनर्वसन करणं कदाचित सोपं आहे पण त्यांचं मानसिक पुनर्वसन ही सध्या त्यांच्यासंदर्भातली सगळ्यात मोठी समस्या आहे. या एका वाक्यावरुन त्यांना काय काय गोष्टींना सामोरं जावं लागतं असेल हे लक्षात येतं.


एका स्त्री मुक्ती चळवळीसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांशी जेव्हा संवाद साधला तेव्हा ते म्हणाले की आज हा घटक समाजात अस्तित्त्वात आहे त्यामुळे इतर कुटुंबातल्या स्त्रिया काही प्रमाणात तरी सुरक्षित आहेत..नाहीतर गिधाडांची भूक अमर्याद आहे.


आता हे सगळं लिहिण्यामागचं कारण हे की काल हायकोर्टाने असं सांगितलं की वेश्या व्यवसाय करणं हा गुन्हा नाही पण अनैतिक देहव्यापार प्रतिबंध कायद्यान्वये तुम्ही देहव्यापार करणाऱ्या महिलांना शिक्षा करु शकत नाही, तर एखाद्या व्यक्तीला व्यावसायिक हेतूने किंवा जबरस्तीने देहविक्रय करायला लावणे हा गुन्हा आहे.


वेश्यांचं पुनर्वसन करणं, विविधं गोष्टींबाबत त्यांच्याच जागृती निर्माण करणं, त्यांना शिक्षित करणं हे जरी गरजेचं असलं, तरी त्या जे करतात तो गुन्हा नाही... त्याला गुन्हेगारीचं स्वरुप आपल्यासारख्या लोकांनी दिलंय हे सत्य आहे आणि त्यासाठी सगळ्यात पहिले आपण आपली आणि परिणामी समाजाची मानसिकता आणि दृष्टीकोन बदलणं ही काळाची गरज आहे.