सध्या दिवसेंदिवस बहरत चाललेल्या मालिकेतील कलाकाराचा सकाळीच फोन आला होता. जाम वैतागला होता बिचारा! साले सहा-सहा महिने होऊनही काम केलेले पैसे देत नाहीत. आपल्याच कष्टाचे पैसे मिळवायला एवढी वाट बघत बसायची. काम करताना वेळ, काळ पाहिला नाही. जमेल तेवढं काम काढून घेतलं. त्याला आमची ‘ना’ कधीच नव्हती. पण आमच्या कामाचे पैसे द्यायची वेळ आली की लगेच यांची ‘ना’ सुरु झाली.


एका दमात सगळं बोलून गेला होता तो. पुढे बोलता बोलता त्याने सांगितलेली भीषणता ऐकून तळपायाची आग मस्तकात गेली माझ्या. तो सांगत होता. नुकतंच बायकोचं बाळंतपण झालं. घरात आनंदी-आनंद झाला. दवाखाण्याचं बिल देण्यासाठी निर्मात्याला कामाचे पैसे मागितले तर म्हणतो आता देता येणार नाही. नुकतंच स्पॉट बॉयचं पेमंट केलंय. आता तुम्हांला कुठून पैसे देऊ. साला एवढं काम करुन सुद्धा आमची स्पॉट बॉय एवढी किंमत? दुःखद बाब अशी की, आज मालिका आमच्या जीवावर टीआरपीच्या बाबतीत आघाडीवर आहे. लोकं आवडीने बघतायेत. मालिका प्राईम टाईमला आल्यामुळे त्यांच्या जाहिरातींचे दर गगनाला भिडलेत. चॅनेलला याचा जबरदस्त फायदा देखील होतोय. एवढा पैसा मिळवून यांना कलाकारांचं मानधन द्यायला पैसा नाही. किती वाईट हे.... बरं यात साला निर्माता खर कधीच बोलत नाय. एवढी मालिका आघाडीवर येऊनही पैसा नाहीच म्हणतो... मी काय म्हणतो अरे आमचे जे काम केलेले पैसे आहेत ते तरी द्या आम्हाला वेळेवर...

साधा हिशोब सांगतो तुला... हल्ली मालिकांचं शूटिंग सर्रास गावाकडं सुरु केलंय यांनी. कथा गावाकडंची शोधायची, गावातील काही भाग भाडे करारावर नोटरी करुन लिहून घ्यायचा. जिथं दिवसाला कमीत कमी वीस-पंचवीस हजार भाडं देणं अपेक्षित आहे. तिथं चार ते पाच हजार रुपये ठरवून करार करुन घ्यायचा. एकदा करार झाला की यांचा धागडधिंगा सुरुच झाला म्हणून समजा. सध्याचंच उदाहरण घे ना.. जिथं आमच्या मालिकेचं शूटिंग सुरुय तिथं अक्षरशा लोक वैतागलेत. त्यांना आत्ता कळायला लागलंय की यांनी आपल्याला फसवलंय... जरा नेमक्या भाषेत सांगांयचं तर * बनवलं यांनी. त्यांची अशी अवस्था आहे की, आता बोलता ही काही येतं नाही आणि पैसे वाढवून मागायची सोय नाही. गप्प आपल्या डोळ्यासमोर आपलं वैभव नष्ट होताना खराब होताना पाहयचं. पुढं जाऊन कलाकार ग्रामीण भागातीलेच बघायचे. मग हिरो-हिरोईनपासून ज्युनिअर कलाकारापर्यंत. याला त्यांच उत्तर काय तर कथा ग्रामीण भागातली आहे. परंतु दुसरी बाजू अशी की एका प्रसिद्ध अभिनेत्याला घ्यायचं तर दिवसाला पंधरा-वीस हजारांचा फटका, परंतु नवीन कलाकार घेतले तर तेवढ्या पैशात कमीत कमी दहा-पंधरा कलाकार कसे ही भागून जातात. सध्या ना गावाकडे एक फॅशन आलीय. मालिकेत छोटा रोल करायचा आणि फेसबुकवर फोटो टाकायचा. चार-दोन लोकांनी वाहवा केली आणि पंचवीसेक कमेंट आल्या की झालं. पोरा सकट बापाची कॉलर टाईट. काय तर म्हणे पोरगा हिरो झालाय. मी हे सध्या अनुभवतोय. उदाहरणचं द्यायचं झालं तर सांगतो. मला एका माण तालुक्यातील मुलाचा चार-दोन दिवसांनी फोन येतो. सर मालिकेत काम हवंय. बघा तुमच्या साहेबासनी विचारुन. या बदल्यात मला काही बी नको. उलट मला तुम्ही काम मिळवून दिलं म्हणून तुम्ही सांगाल तेवढं पैशे मी तुम्हांला देतो. आणि जर डिरेक्टरनी मागितल तर त्याला पण देऊ.... सांगांयचं इतकचं आहे की, सध्याची अवस्था अशीय, निर्मात्यांचे बंगले झालेत आणि कलाकार मात्र भिकारी..... बघ यावर तुला काय करता आलं तर. एवढं बोलून फोन कट....

संबंधित पोस्ट सोशल माध्यमातून व्हायरलं झाल्यानंतर मालिकांशी संबंधित अनेक कलाकारांचे फोन येऊ लागले. अनेक कलाकारांनी सध्याची अशीच परिस्थिती असल्याचं सांगितलं. परंतु पुढं येऊन बोलायची हिंमत नसल्याचं देखील प्रामाणिकपणे कबूल केलं. त्यातील एक प्रतिक्रिया खुपच बोलकी होती. कवी नामदेव ढसाळांच्या कवितेच्या ओळींचा वापर करत तो म्हणाला...जीवाचे नाव*** ठेवून जगणाऱ्यांची संख्या खुपय. परंतु मला तसं जगता येतं नाही. कारण माझ्या मागे कुटुंब आहे. परंतु जे घडतंय ते देखील खूप चुकीचंय. काही चॅनेलकडून मालिका निर्मात्याला ४५ ते ६० दिवसात मिळतात, मात्र पुढे कलाकारांना का पैसे मिळत नाहीत, हे अनाकलनीय आहे

मित्रहो... मालिकेतील बऱ्याचशा कलाकारांनी चाळीशी पार केलीय. ‘उतणार नाही मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही’ याची प्रचिती त्यांच्या कामाकडे पाहताना आल्याशिवाय राहत नाही. 17-18 वर्षापुर्वी उचललेला विडा प्रामाणिकपणे पार पाडतायेत ते. बारकाव्याने पाहिलं तर खरंच निर्मात्यांचे बंगले झाले, परंतु कलाकार मात्र भिकारीचं आहेत....परिस्थिती भीषण आहे.