उत्तर केरळच्या हिरव्यागार निसर्गाच्या कोंदणात वसलेलं कोळिकोड शहर विविध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संदर्भात महत्त्वाचं मानलं जातं. इथं परशुरामानं तपश्चर्या केली, इथेच राजा झामोरिनची राजवट भरभराटीला आली, इथेच केरळची मल्ल्याळम भाषाही विकसित झाली, इथूनच व्यापार उदीमाचे नवे मार्ग विकसित झाले, आणि इथेच पंडीत दीनदयाळ उपाध्याय भारतीय जनसंघाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले! भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेचं दोन दिवसांचं अधिवेशन इथेच सुरु होत असून, पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हे अधिवेशन कोळिकोडमध्ये भरवण्यात येत आहे.


पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या भारतीय राजकारणातल्या योगदानाबद्दल समजावून घेणं उद्बोधक ठरेल. दीनदयाळ उपाध्याय यांच्या कार्यकर्तृत्वाच्या तुलनेत त्यांच्या देशाच्या वैचारिक आणि सामाजिक वर्तुळात नेहमीच उपेक्षा झाली. त्यामुळेच आज त्यांच्या विषयी सर्वसामान्यांना पुरेशी माहिती नाही. वैचारिक बैद्धिक वर्तुळात त्यांच्या कामाची जाण नाही. त्यामुळेच त्यांच्या विचार संपदेचा पुरेसा दबदबाही नाही.

हा दबदबा नसण्यामागे काँग्रेस आणि डाव्या मंडळींनी जोपासलेली वैचारिक अस्पृश्यताही कारणीभूत आहे. कारण, तथाकथित डाव्या आणि लिबरल मंडळींनी दीनदयाळ उपाध्यायसारख्या अनेकांची अनुल्लेखाने बोळवण केली. समाजवाद वा साम्यवाद आणि भांडवलशाही अशा दोन्ही गटात विभागलेल्या अर्थ आणि विचार विश्वात दीनदयाळ उपाध्यायांनी मिश्र अर्थव्यवस्थेचा पुरस्कार करुन एकात्म मानवतावाद या नावाने एका चिंतनाची मांडणी केली. त्यांच्या चिंतनाला एका नामवंत मराठी वर्तमानपत्राने 'गूढ गुंजन' असे संबोधून त्यांची संभावना केली होती. आज या चिंतनात्मक मांडणीलाही 50 वर्षे पूर्ण होत आहेत. महत्त्वाचं म्हणजे, लोकतांत्रिक शासनव्यवस्था, राजकीय पक्षांच्या संचालनाची पद्धत इथपासून ते विकास संकल्पनेपर्यंत अनेक विषयांवर दीनदयाळ उपाध्याय यांनी अतिशय मुलगामी स्वरुपाची वैचारिक मांडणी केली. 25 सप्टेंबर हा त्यांच्या जन्मशताब्दीचा दिवस असल्याने, त्यानिमित्ताने त्यांच्या विचारविश्वाची आणि कार्यकर्तृत्वाचीही निदान तोंडओळख व्हावी, यासाठी हा लेखन प्रपंच!

स्वामी विवेकानंद आणि महात्मा गांधींप्रमाणेच एतद्देशीय विचार, परंपरेशी नातं सांगणाऱ्या एकात्म मानववादाची मांडणी ही दीनदयाळ उपाध्याय यांची सर्वाधिक महत्त्वाची कामगिरी आहे. मनुष्याला केवळ 'आर्थिक प्राणी' न मानता त्याच्या भौतिक, बौद्धिक, भावनिक आणि आत्मिक अशा चतुर्विध गरजांचा विचार सामायिकपणे व्हायला हवा ही एकात्म मानवतावादाची मूळ बैठक होती. त्याआधारेच माणसाच्या जगण्याची उद्धेश्यपूर्णता, संपूर्णता, त्यामधील परस्पर नातेसंबंध इत्यादी अनेक मुद्द्यांना स्पर्श करणारी विसतृत आणि तर्कशुद्ध मांडणी त्यांनी केली. या मांडणी बरोबरच त्यांनी सामाजिक आणि आर्थिक लोकशाही नसेल, तर राजकीय लोकशाही निरर्थक ठरेल हेही आग्रहाने सांगितले. महात्मा गांधींप्रमाणेच त्यांनी रांगेतल्या शेवटच्या माणसाला, म्हणजेच सर्वाधिक वंचित व्यक्तीला विकासाची फळे वितरीत करताना सर्वाधिक प्राधान्य द्यायला हवे या 'अंत्योदय' विचाराचा आग्रही पुरस्कार केला.

दीनदयाळ उपाध्याय त्यांचा मूळ पिंड राजकारण असला, तरी त्यांची प्रकृती एखाद्या चिंतकाची होती. त्यावेळच्या भारतीय जनसंघाला स्पर्धात्मक तडजोडवादी राजकारणापासून दूर ठेवण्यात त्यांनी उल्लेखनीय यश मिळवले होतं. लोकशाही यशस्वी व्हायची असेल, तर लोकशिक्षणाच्या माध्यमातून लोकमताची मशागत करण्याशिवाय पर्याय नाही, ही त्यांची ठाम धारणा होती.

राजकीय पक्षांचे काम गांभीर्यपूर्वक चालायचे असेल, तर त्यांची सुस्पष्ट अशी स्वीकृत विचारधारा असायला हवी. शिवाय, राजकीय पक्षांची तळागाळापर्यंत मजबूत संघटनात्मक संरचना नसेल, तर राजकीय पक्ष हे निवडणूक लढवणे-जिंकण्याचे केवळ एक यंत्र ठरतील, असा यातील धोका दीनदयाळजींनी ओळखला होता.

खूप कमी वयात म्हणजे, जेमतेम पन्नशीतच दीनदयाळ उपाध्याय जनसंघाचे अध्यक्ष झाले. डिसेंबर 1967 मध्ये कोळिकोड इथल्या राष्ट्रीय अधिवेशनात त्यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर, महिन्या-दीड महिन्यात त्यांची हत्या झाली. 11 फेब्रुवारी ही त्यांची पुण्यतिथी.

भारतीय जनसंघाला एक पर्यायी राजकीय पक्ष म्हणून ठळकपणे पुढे करण्यामध्ये दीनदयाळजींची मुख्य भूमिका होती. हे घडविण्यासाठी पक्षाला स्वत:ची अशी स्वतंत्र वैचारिक ओळख मिळवून देण्यात आणि संघटना बांधणीची एक वैचारिक पद्धत विकसित करण्यातही त्यांनी यश मिळवलं. राजकारणात व्यक्तिगत आकांक्षेबरोबरच आदर्शवादाच्या प्रेरणेतून काम व्हायला हवे, याचा आग्रह दीनदयाळजी सारख्यांनी धरला. म्हणूनच भारतीय जनसंघ आणि नंतर भाजप समर्थ राजकीय पक्ष म्हणून विकसित होऊ शकला. महात्मा गांधींचे गुरु म्हणून ज्यांना आपण ओळखतो, त्या गोपाळ कृष्ण गोखले यांच्या राजकारणाच्या आध्यात्मिकरणाची गरज आग्रहाने मांडली होती. आध्यात्मिकरण ही फार मोठी गोष्ट झाली. पण स्वातंत्र्योत्तर राजकारणात, त्या क्षेत्राच्या स्वाभाविक मर्यादा लक्षात घेऊनही, सुविचारी व्यक्तींची सज्जनशक्ती व्यापकतेने आणि टिकाऊपणे उभी करता येऊ शकते, हे सिद्ध करण्याचे श्रेय दीनदयाळजींना द्यायला हवे!

विनय सहस्रबुद्धे, खासदार, राज्यसभा

vinays57@gmail.com

संबंधित ब्लॉग


देश - काल - स्थिती : काश्मीर प्रश्नातला कळीचा मुद्दा !