Blog : जगातील कोणत्याही भाषेतील चित्रपट असो त्यात मित्रांची कथा असतेच असते. जीवाभावाचे, एकमेकांसाठी प्राण देण्यास तयार असणारे मित्र केवळ चित्रपटातच दाखवतात असे नाही तर वास्तव जीवनातही अशा मित्रांचे दर्शन आपल्याला वेळोवेळी घडत असते. आपलेही असे काही अत्यंत जीवलग मित्र असतात जे संकटकाळी आपल्यासाठी उभे राहाण्यास एका पायावर तयार असतात. काही  जणांना पाठीत वार करणाऱ्या मित्रांचाही अनुभव आलेला असतोच.


असो आज काही जागतिक मैत्री दिन नाही त्यामुळे मैत्रीचा गाथा सांगणारा निबंध कशाला असा प्रश्न हे वाचताना तुम्हाला नक्कीच पडला असेल. त्याचे उत्तर थोडे फार शीर्षकात मिळाले असेलच. अनेकदा चित्रपट समाजातील वास्तव समोर आणतात, समाजातील वाईट गोष्टी समोर आणतात. चित्रपटात समाजातील एखादी गोष्ट प्रखरपणे मांडली की सरकार जागे होते आणि त्या गोष्टीकडे काळजीपूर्वक लक्ष देऊ लागते.


फेब्रुवारी 2024 मध्ये केरळमध्ये मल्याळम भाषेतील एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. फक्त 20 कोटी रुपयांमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 250 कोटींच्या आसपास गल्ला गोळा केला आहे. 2024 मध्ये देशभरात प्रदर्शित झालेल्या सर्व चित्रपटांमध्ये सगळ्यात जास्त कमाई करणारा हा चित्रपट ठरला आहे. बरे या चित्रपटात कोणी मोठे स्टार, तडक भडक गाणी, अॅक्शनचा भडीमार असे काही नाही, तरीही या चित्रपटाने दक्षिण भारतातीस सिंगल स्क्रीनला झळाळी मिळवून दिली.


हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर तामिळनाडू सरकारला जाग आली आणि 18 वर्षांपूर्वी कोडाईकॅनलमध्ये झालेल्या एका दुर्घटनेप्रकरणी चौकशीचे आदेश देऊन तत्कालीन दोषी पोलिसांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. ही आहे चित्रपट माध्यमाची ताकद. आता तुम्ही म्हणाल केरळमधील मल्याळम भाषेतील चित्रपट मात्र त्यावर तामिळनाडू सरकार कसे जागे झाले आणि त्यांनी चौकशीचे आदेश का दिले आणि दुसरे म्हणजे मैत्री आणि या सरकारच्या चौकशीच्या आदेशाचा संबंध काय?


संबंध खूप जवळचा आहे. 2006 मध्ये केरळच्या कोच्चीतील काही तरुण मित्र ओनमची सुट्टी असल्याने पिकनिकला जाण्याचा विचार करतात. सुरुवातीला ते गोव्याची निवड करतात परंतु काही कारणास्तव त्यांचा तो बेत रद्द होतो आणि ते तामिळनाडूच्या कोडाईकॅनलमध्ये येतात. कमल हसनच्या चित्रपटातील गुना चित्रपटातील एक गाणे को़डाईकॅनल येथेच चित्रित केलेले असते. हे गाणे ज्या ठिकाणी चित्रित केलेले असते तो भाग गुना केव्ह्ज म्हणून ओळखला जात असतो.


हे मित्र को़डाईकॅनलमध्ये आल्यानंतर गुना केव्हज पाहायला जातात. तेथे येत असताना अत्यंत चिंचोळ्या अशा 120 ते 130 फूट खोल खड्ड्यात एक मित्र पडतो. अत्यंत आनंदात आणि मजा करण्याच्या विचाराने आलेल्या या मित्रांना त्यामुळे धक्का बसतो. ते स्थानिकांशी संपर्क करून मित्राला त्या चिंचोळ्या खड्ड्यातून काढण्यासाठी मदत करावी अशी विनंती करतात. मात्र ती जागा डेव्हिल्स किचन नावाने ओळखळी जाते आणि तेथे कोणीही जिवंत राहत नाही. काही जण हत्या करून तेथे मृतदेह फेकतात, त्यामुळे मित्र मेला असेल तुम्ही परत जा असे स्थानिक सांगतात. मदतीसाठी पोलिसांकडे गेलेल्या मित्रांना पोलीस मदत करण्याऐवजी दमदाटी  करतात, मारहाण करतात आणि त्यांनी मित्राची हत्या केल्याचा आरोपही करतात.


मात्र सगळे मित्र खड्ड्यात पडलेल्या मित्राला बाहेर काढण्यावर ठाम असतात. ते सतत मित्राला हाका मारत असतात, आणि त्यांना मित्राचा आवाज ऐकू येतो. सगळे जण आनंदी होतात आणि मित्राला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु करतात. त्यांचे त्या मित्राला सुखरूप बाहेर काडण्याचा प्रयत्न म्हणजे हा मंजुमल बॉईज चित्रपट. पोलीस किंवा दुसरे कोणीही त्या खड्ड्यात उतरायला तयार नसताना मित्रामधील एक त्या खड्ड्यात उतरण्याची तयारी दर्शवतो, खड्ड्यात उतरतो आणि मित्राला घेऊनच बाहेर येतो. मित्र एकमेकांसाठी कसे जीव देण्यास तयार असतात ते या चित्रपटात दाखवण्यात आलेले आहे. जे वास्तवातील घटनेचे चित्रण आहे. शेवटी त्या मित्राला खड्ड्यातून बाहेर काढतात आणि सगळे मित्र घर परततात.


या चित्रपटात पोलिसांचे कठोर वर्तन दाखवल्याने तामिळनाडू सरकार जागे झाले आणि त्या मित्रांना मदत न करणाऱ्या त्या वेळच्या पोलीस अधिकाऱ्यांची आता चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले. यावरूनच हा चित्रपट किती परिणामकारक झाला आहे याची जाणीव होते. 


सुरुवातीची काही मिनिटे आपल्याया कंटाळवाणी वाटतात.  पण चित्रपटाच्या पुढील कथेसाठी ते किती आवश्यक आहे ते त्यातून दाखवण्याचा प्रयत्न दिग्दर्शक चिदंमबरम एस. पोडूवलने केला आहे.  त्याचा हा दुसराच चित्रपट आहे पण त्याने कमाल केली आहे. चित्रपट शेवटच्या प्रसंगापर्यंत प्रेक्षकांना बांधून ठेवण्यात यशस्वी झालेला आहे. चित्रपटाच्या शेवटी वास्तवातील त्या मित्रांचे फोटोही दिग्दर्शकाने दाखवून त्यांना सॅल्यूट केला आहे. मित्राचा जीव वाचवण्यासाठी त्या खड्डयात उतरलेल्या तरुणाचा नंतर वीर पुरस्कार देऊन सत्कारही करण्यात आला. 


चित्रपटात सूबीन शाहिरने प्रमुख भूमिका साकारली असून त्यानेच या चित्रपटाची निर्मितीही केली आहे. विशेष म्हणजे सूबीन स्वतः एक दिग्दर्शकही आहे. शाजू खलीदचे कॅमेरावर्क खूपच प्रभावी आहे. मैत्रीची गाथा दाखवणारा सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट डिज्नी हॉटस्टारवर रिलीज झालेला आहे. एक चांगला चित्रपट पाहाण्याची इच्छा असेल तर हा चित्रपट चुकवू नका. चित्रपटाच्या शेवटी तुम्हालाही टाळ्या वाजवण्याचा मोह होईलच.