BLOG : देशातील अठराव्या लोकसभा निवडणुकीचं काल सूप वाजलं. मतदान संपल्यानंतर सगळ्यांचेच लक्ष एक्झिट पोलवर होते. एक्झिट पोल म्हणजे नवे सरकार कोणाचे असेल याचा अंदाज असतो. काल जाहीर झालेल्या सर्व एक्झिट पोलमध्ये भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) तिसऱ्यांदा सत्तेवर येणार असा कल दिसून आला आहे. याचाच अर्थ नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान होतील. मात्र काँग्रेसचा नेहमीप्रमाणेच या एक्झिट पोलवर विश्वास नाही. काँग्रेस प्रणित इंडी आघाडीला 295 पेक्षा जास्त जागा मिळतील असा विश्वास काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला आहे. एवढेच नव्हे तर राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकतात असे सूतोवाचही केले आहे.


एकीकडे काँग्रेस अध्यक्ष विजयाचा विश्वास व्यक्त करीत असतानाचा इंडी आघाडीतील काही पक्षांचे नेते ईव्हीएमवर आतापासूनच आरोप करू लागलेत. इंडी आघाडी जिंकत आहे मात्र 4 जूनला भाजप जिंकले तर ते ईव्हीएममध्ये फेरफार करून जिंकले असे म्हणावे लागेल असे काही नेते जाहीररित्या बोलू लागले आहेत. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी रविवारी सकाळी हे बोलून दाखवलेलेच आहे. मात्र यासोबतच इंडी आघाडीला 295 पेक्षा जास्त जागा मिळतील असा विश्वासही व्यक्त केला आहे. अर्थात 2014 पासून विरोधक भाजपवर ईव्हीएममध्ये फेरफार केल्याचा आरोप लावत आलेलेच आहेत. पण एकाही पक्षाने वा नेत्याने ईव्हीएममध्ये फेरफार करता येतो हे सिद्ध करून दाखवलेले नाही. 


एक्झिट पोलबाबत बोलायचे झाल्यास हे अंदाज एखादा अपवाद वगळता बहुतांश वेळा खरे ठरल्याचे सिद्ध झाले आहे. एक्झिट पोल अर्थात् मतदानोत्तर चाचणी ही मतदान करणाऱ्यांशी बोलून केलेली असते. मात्र लाखोंचा मतदार संघ असलेल्या भागातील काही हजार लोकांशी बोलून ही चाचणी घेण्यात येते. त्यातही मतदान करणारे खरेच सांगतात असेही नसते. मात्र त्या मतदारसंघातील राजकीय पक्षांची स्थिती, मागील दोन वेळचा निकाल याचा विचार करून चाचणी जाहीर केली जाते. सुरुवातीला ही चाचणी थोडी अयशस्वी व्हायची पण आता बऱ्यापैकी अजून अंदाज व्यक्त केले जाऊ लागले आहेत. अर्थात एक्झिट पोलमध्ये दिलेलेच संख्याबळ पक्षांना मिळते असे नाही. त्यामध्ये 5-10 जागांचा फरक दिसून येतो पण एक कल समोर येतो. 


2004 लोकसभा निवडणुकांच्या बहुतेक सर्व एक्झिट पोलमध्ये एनडीएला 230 ते 275 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता आणि काँग्रेस प्रणित यूपीएला 174 ते 205 जागांचा अंदाज वर्तवण्यात आला होता. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची इमेज आणि भाजपची इंडिया शायनिंगची मोहीम यामुळे एक्झिट पोलमध्ये एनडीए बहुमताकडे जाताना दिसत होती, पण हे अंदाज साफ चुकले होते आणि एनडीएला फक्त 187 तर यूपीएला 219 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसने डॉ. मनमोहन सिंह यांना पंतप्रधानपदी बसवले आणि यूपीए शासन सुरु झाले.


2009 मध्येही एक्झिट पोलमध्ये यूपीएला 199 आणि एनडीएला 197 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. काँग्रेस पुन्हा सत्तेवर येत नाही असेही एक्झिट पोलमध्ये दिसत होते, मात्र मतमोजणीनंतर यूपीएला 262 त्यापैकी काँग्रेसला 206 जागा मिळाल्या होत्या तर भाजपला 116 जागांवर समाधान मानावे लागले होते. यूपीएला बहुमत मिळाल्याने पुन्हा एकदा मनमोहन सिंह पंतप्रधापदी बसले होते. 


2014 मध्ये मात्र एक्झिट पोलचे अंदाज बऱ्यापैकी बरोबर आले होते. पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी संपूर्ण भारत पिंजून काढला होता. डॉ. मनमोहन सिंह यांच्याबाबत जनतेमध्ये नाराजी होती. एक्झिट पोलमध्ये एनडीएला 249 ते 340 जागांचा अंदाज वर्तवण्यात आला होता तर यूपीएला 70 ते 120 जागांचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मतमोजणीनंतर एनडीएला 226 जागा मिळाल्या तर यूपीएला फक्त 60 जागांवर समाधान मानावे लागले होते. 


2019 ला अशीच स्थिती होती. एनडीएला 277 ते 365 जागांचा अंदाज वर्तवण्यात आला होता तर यूपीएला 82 ते 132 जागांचा अंदाज वर्तवण्यात आला होता. अपेक्षेप्रमाणेच एनडीएने 353 जागांवर विजय मिळवला तर यूपीए 91 जागांवर विजयी झाली.


खरे तर 2019 च्या पराभवानंतर काँग्रेस प्रणित यूपीएने देशभरात मोदी आणि भाजपविरोधात रान उठवायला पाहिजे होते. काही राज्यांध्ये काँग्रेसने भाजपचा पराभव करून सत्ता मिळवली होती, त्याचा फायदा घेत भाजपला सळो की पळो करून सोडले पाहिजे होते पण काँग्रेसने ते केले नाही. मिळालेले यश डोक्यात गेले आणि यावेळी आपण लोकसभा जिंकूच असा फाजिल आत्मविश्वास त्यांना वाटू लागला. भाजपने 2019 च्या निवडणुका संपल्याबरोबर 2024 च्या निवडणुकांची तयारी सुरु केली होती. मात्र नेहमीप्रमाणे सुस्तावलेल्या काँग्रेसने निवडणुकीच्या एक वर्ष अगोदर निवडणुकीची तयारी सुरु केली. भाजपला नामोहरम करण्यासाठी नितीश कुमार यांनी इंडी आघाडीची कल्पना मांडली. याला उबाठाच्या उद्धव ठाकरेंसह शरद पवार, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, तेजस्वी यादव, स्टॅलिन यांनी पाठिंबा दिला. असे सर्व विरोधक एकत्र आल्याने भाजपला आपण हरवू असा विश्वास विरोधकांना वाटू लागला. त्यापूर्वी राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढून संपूर्ण देश ढवळून काढला होता. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचं चित्र सोशल मीडियावर दिसत होते. राहुल गांधींबरोबर काँग्रेसचे अनेक नेते भारतच जोडो यात्रेत सहभागी झाले होते. सोशल मीडियावर काँग्रेसने भारत जोडो यात्रा यशस्वी करून दाखवली होती. काँग्रेसने सोशल मीडियावर जबरदस्त प्रचार मोहीम सुरु केली होती. सोशल मीडियावरील प्रचार पाहता यावेळी राहुल गांधी नक्कीच पंतप्रधान बनतील असा विश्वास काँग्रेस नेत्यांना वाटू लागला होता.


मात्र थोड्याच दिवसात इंडी आघाडी फुटली, ज्या नितीश कुमार यांनी इंडी आघाडी स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतले तेच पुन्हा भाजपकडे गेले. दुसरीकडे ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसला झुकते माप देण्यास नकार दिला. आणि एकत्र येत असलेल्या इंडी आघाडीत सर्व काही आलबेल आहे असे दिसले नाही. नेते वर वर एकत्र असल्याचे दाखवत असले तरी प्रत्येक जण स्वतःचा पक्ष वाढवण्याचा आणि जास्तीत जास्त जागा मिळवण्याचा प्रयत्न करीत होता.


2014 मध्ये भाजपने ज्याप्रकारे सोशल मीडियाचा वापर करून काँग्रेसला नामोहरम केले होते तसे काँग्रेस यावेळी भाजपबाबत करू शकली नाही. याचे कारण म्हणजे सोशल मीडियावरचा लोकांचा उडालेला विश्वास. मात्र काँग्रेसला वाटत होते की देशात त्यांचीच सत्ता येणार आणि याच फाजील आत्मविश्वासाने इंडी आघाडी निवडणुकीला सामोरे गेली. एकीकडे नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे 24 तास राजकारण करणारे नेते आणि दुसरीकडे पार्ट टाईम राजकारण करणारे राहुल गांधी. यांच्यात मोदी आणि शाह आणि आघाडी घेतली. निवडणुकीच्या निमित्ताने संपूर्ण देश पिंजून काढला. तिसऱ्यांदा सत्तेवर येऊ याची खात्री असतानाही कार्यकर्ते घरात बसून राहू नयेत, त्यांना जोश यावा म्हणून नरेंद्र मोदींनी 400 पारचा नारा दिला. मात्र विरोधकांनी भाजपला देशाची घटना बदलायची असल्याने त्यांना 400 पेक्षा जास्त जागा हव्या आहेत असा प्रचार सुरु केला जो फोल होता. या निवडणुकीतह काँग्रेसने मागील दोन लोकसभा निवडणुकांप्रमाणे नरेंद्र मोदींना टीकेचा धनी केले. त्याचा फायदा नरेंद्र मोदींनाच झाल्याचे एक्झिट पोलमधून दिसून येत आहे.   


एक्झिट पोलचा अंदाज कितपत खरा ठरतो हे मंगळवारी 4 जूनला कळेलच. पण नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेवर येणार हे मात्र एक्झिट पोल दर्शवत असल्याने तेच पंतप्रधान होतील यात शंका नाही. खरे तर आता काँग्रेसने जागे होण्याची आवश्यकता असून ईव्हीएमवर दोष देण्यात वेळ घालवण्यापेक्षा आणि एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा 2029 च्या लोकसभा निवडणुकांची तयारी आतापासूनच सुरु करायला हवी तरच त्यांना 2029 मध्ये चांगले यश मिळेल. काँग्रेसला हा सल्ला देण्याचे आणखी एक कारण म्हणजे भाजपने 2029 ची तयारी गेल्या वर्षीपासूनच सुरु केली आहे.