कुठल्याही तिला पावसात भिजायला आवडतंच. बेभान होऊन पाऊस अंगभर गोंदवून घेण्यासाठी तर ती वेडीपिशी होते, पण हव्या त्या वेळी, हव्या त्या ठिकाणी आणि हव्या त्या माणसासोबत धुँवाधार पावसात भिजण्याची तिची अनावर इच्छा प्रत्येकवेळी पूर्ण होतेच असं नाही. कुठल्याही तिची आणि तिला वेडावणाऱ्या पावसाची गोष्ट.


तिचा जन्मच मुळी ऐन पावसाळ्यातला. रखरखीत उन्हाळा मागे पडून कोसळधार पाऊस पडत असताना  तिनं या जगात प्रवेश केला. तिच्या आयुष्यातला पहिला पाऊस, पहिला पावसाळा तिनं पाळण्यातूनच बघितला इवल्या नाजूक डोळ्यांनी, पण दुसऱ्या पावसाळ्यात मात्र तिला पावसाचे टपोरे थेंब अंगावर घेण्यापासून कुणीही रोखू शकलं नाही. पावसातलं तिचं नटखट रूप बघून सगळ्यांना कोण आनंद झाला. कित्येक पावसाळे आले आणि गेले  रांगायला, चालायला लागलेली असताना कुतूहल म्हणून तिचं पावसात भिजणं हळूहळू मागे पडत गेलं. पाऊस आला की " सर आली धावून मडके गेले वाहून "  म्हणायला शिकलेल्या तिला शाळकरी वयात फक्त माहीत होतं दप्तर न भिजवता, एका हाताने छत्री धरून दुसऱ्या हाताने गणवेश सावरत, वाटेत आडवे येणारे खड्डे चुकवत घर गाठणं. मुसळधार पावसात कपडे, दप्तर भिजण्याची परवा न करता सायकल दामटवत रस्त्यावरून जाणाऱ्या पोरांच्या बेफिकीरपणाचं तिला सतत कौतुक वाटत राहायचं. खिडकीच्या गजातून हात बाहेर काढून तळहातावर पाऊसथेंब झेलण्यावरच बऱ्याचवेळा तिला समाधान मानावं लागलं. मैत्रींणींसोबत मजा म्हणून पावसात भिजल्यानंतर मिळालेला आईचा ओरडा आणि पुढे चार दिवस गळणारं नाक तिला आजही विसरता आलेलं नाहीय.

खऱ्या अर्थानं तिला पाऊस आपलासा वाटला, बाई असण्याची सगळी बंधन झुगारून पाऊस रोमारोमात भरून घ्यावासा वाटला जेव्हा तिच्यात ऋतूबदल झाला, एक नवाच पाऊसबहर तिच्यात मुक्कामाला आला. तिला पाऊस जीवलग सखा, प्रियकर वाटायला लागला. ती डोळ्यांत पाऊस आणून पावसाची वाट पाहायला लागली. आणि तो येण्याच्या नुसत्या चाहुलीनेही कावरीबावरी होऊ लागली. पाऊस तिला खुणवायचा, हातवारे करायचा. ती मनोमन लाजायची, खट्याळ हसायची. तिच्या कोवळ्या वृत्ती तरारून यायच्या. ती आंतर्बाह्य पावसाळी होऊन जायची. मग सगळी बंधनं झुगारून एका अधिर उत्कटतेने प्रत्येक भेटीवेळी त्याच्या बाहुपाशात शिरून रीती व्हायची. पण तरीही प्रत्येकवेळी नव्याने भेटणारा पाऊस मात्र तिला अजूनही परिपूर्ण वाटत नव्हताच. चिंब भिजल्या तिच्या मनाचा एक कोपरा कोरडाच असायचा. काहीतरी चुकल्यासारखं वाटत राहायचं तिला. काहीतरी गवसलंय, पण अजून जे खूप मौलिक आहे पण ते हवं होतं. तिच्या नजरेला कशाची तरी ओढ होती, कुणाची तरी आस होती. पण कशाची आस, कुणाची ओढ?

आणि मग अशाच एका मुसळधार पावसात तो भेटला. भर पावसात छत्री असूनही ती न उघडता हात पसरून पाऊस कवेत घेणारा. पावसाइतकाच प्रिय वाटणारा तिचा प्रियकर. पाऊसओढ हा दोघांमधला सामाईक दुवा. अजून काय हवं होतं मग! तिला पावसाइतकीच त्याचीही ओढ वाटायला लागली. " ये बारीश का मौसम है मितवा, ना अब दिल पे काबू है मितवा" असंच काहीसं ती गुणगुणायला लागलेली. आभाळ भरून आलं की अंगात वारं भरल्यासारखी ती त्याला भेटायला जायची. तेव्हा तो म्हणायचा, " जब तू हसती है, बारीश होती है " तेव्हा तिचा उभा देह पाऊस होऊन जायचा. तिला त्याच्यासोबत पावसात भिजायचं असायचं. त्याचा हात हातात घेऊन, त्याला बिलगून धोधो कोसळणारा पाऊस मनात देहात साठवून घ्यायची ती. तिच्या ओल्या केसातून ओघळणारे पाऊसथेंब तो तळहातावर घ्यायचा आणि पिवून टाकायचा. तेव्हा भर पावसात भरून आलेले डोळे तो त्याच ओल्या तळहाताने पुसायचा. तेव्हा ती म्हणायची, " आपल्या घराचं नावही आपण पाऊसच ठेवायचं." पावसाचे काही थेंब वरच्या वर अलगद झेलून तो तिच्या ओंजळीत द्यायचा.

असे कितीतरी प्रेमपावसाळे त्यांनी अनुभवले. जगण्याचा उत्सव केला. आता तिच्या मनातला कोरडा कोपरा चिंब भिजून गेला होता. तिच्यातल्या अपूर्णत्वाची जागा पूर्णत्वाने घेतली होती. तिची नदी दुथडी भरून वाहत होती. तिच्या मनातल्या समुद्राला भरती आली होती. 'आकंठ' या शब्दाची अनुभूती ती साक्षात जगत होती. तिच्या मनात ढोलताशे वाजत राहायचे. त्याने तिच्याआत दडून बसलेला मोर शोधून द्यायला मदत केली होती. तिनं तो मोर प्राणपणाने जपला. त्याच्यासोबतीनं मनमोराचे पिसारा फुलवून नाचणे आतल्याआत अनुभवत राहिली.

पण मग एक दिवस खूपच मोठा अवकाळी पाऊस आला. तिनं आणि तिच्या प्रियकरानं भर पावसात, पावसाच्या साक्षीनं हातात हात घेऊन रंगवलेली सगळी स्वप्नं एका क्षणात तिच्या नजरेच्या टप्प्यापासून फार दूरवर वाहून गेली. पाऊस झेलून परतताना त्यानं तिला दिलेलं आणि तिनं खिडकीवर टांगून ठेवलेलं चिमणीचं घरटंही  उडून खाली पडलं. खिडकीचे गज हातात घट्ट पकडून ती पुढचे कित्येक दिवस बाहेरच्या पावसाकडे मुद्दाम दुर्लक्ष करत आपल्या डोळ्यातूनच पाऊस सांडत राहिली. आणि तो पुन्हा कधीच पावसात भिजणार नसल्याचा निरोप तिच्याजवळ ठेऊन गेला.

तिचं अवखळ अल्लडपण मागे पडलं, तिचं गावं बदललं, घर बदललं, घरातली माणसं बदलली, पण पाऊस मात्र होता तसाच राहिला तिचा पहिला वहिला प्रियकर. तिला आजही त्याच्या आठवणीत नखशिखान्त पावसात भिजावसं वाटतं. आता ती पावसात तिचा पाऊसवेडा प्रियकर पाहते. तिच्या बदललेल्या जगात तिला हवाहवासा पाऊस सतत तिचा पदर धरून असतोही. पण आता मात्र निर्बंधांच्या साखळ्या अधिक मजबूत झालेल्या आहेत.

आकाशात काळे ढग दाटून आले की स्वतःची पावसात भिजण्याची इच्छा बाजूला ठेऊन दोरीवर वाळत घातलेले कपडे भिजू नयेत याची तिला काळजी घ्यायची असते. घरात पाऊस येऊ नये म्हणून  दारं खिडक्या गच्च लावून घ्याव्या लागतात. घरातल्यांच्या " अद्रकवाली चाय" च्या " गरमागरम कांदाभजीच्या" फर्माईशी पुऱ्या करायच्या असतात. खिडकीतून दिसणारा पाऊस बघत कपात चहा ओतताना 'प्रियकरासोबत पावसात भिजलेल्या मनात पुन्हा पुन्हा उसळी मारून वर येणाऱ्या ओल्या आठवणी' डोळ्यांच्या तळ्यातून डोकं वर काढून बाहेर येऊ नयेत म्हणून जिवाचा आटापिटा करायचा असतो. साडीचा पदर कमरेला खोचून पावसात भिजून आलेल्या त्याच्या ' टाॕवेल दे '' शर्ट दे' सारख्या मागण्याही पूर्ण करायच्या असतात. शाळेतून भिजून आलेल्या मुलांची दप्तरं सुकवायची असतात. या सगळ्या धावपळीत तिला तिचा पाऊस सतत खुणावत असतो, प्रेमाने हात पुढे करत असतो, तिला मिठीत घेण्यासाठी आसुसलेला असतो,पण तिला त्याच्याकडे साधा एक कटाक्ष टाकायलाही आताशा उसंत मिळत नाही.

तिची धांदल संपत आलेली असते, तेव्हा पाऊस वेड्यासारखा धुँवाधार बरसून निघून गेलेला असतो. खिडकीचे गज धरून पुढचा कितीतरी वेळ ती डोळ्यातून अखंड पाऊस सांडत राहते पाठमोऱ्या पावसाकडे बघत.