जागतिक महिला दिन हा दिवस मी विशेष पद्धतीने कधीही साजरा केला नव्हता... २०१७ आधी दरवर्षी महिला दिनी नेहमी दादाकडून, मित्रांकडून चॉकलेट आणि एखादं फूल हे गिफ्ट ठरलेलं... पण यंदा ऑफिसमधल्या आम्हा मुलींचं ठरलं की एक सहल काढायची... आणि छान वाटलं.. म्हटलं चला जरा मज्जा करूयात.. मग कळलं की सहल आहे सातारा जिल्ह्यातील जाखणगावी जिथे सुरु आहे पाणी फाऊंडेशनचं महत्वाचं कार्य. आम्हा मैत्रिणींचा सहल हा  कल्ला आता जाखणगाव आणि पाणी फाऊंडेशन ऐकल्यावर जरा वेगळ्या प्रकारे सुरु झाला.  कधी काळी दुष्काळी गाव असलेल्या ठिकाणी जाऊन तिथे पाणी वाचवण्यासाठी, अस्तित्वात असलेल्या पाण्याचं योग्य नियोजन आणि वापर करण्यासाठी पाण्याचं महत्व समजून घेणं त्यामुळे जाखणगावची ही सहल खूप अविस्मरणीय आणि आनंददायी होती.


जाखणगावच्या दिशेने दुपारी २ वाजता मार्गस्थ होऊन रात्री 10 च्या सुमारास गावात पोहोचलो... आयुष्यात कधीही न अनुभवलेलं आणि नेहमी राजकीय व्यक्ती किंवा खेळाडूंसाठी त्यांच्या यशानंतर ज्या पद्धतीने गावात स्वागत केलं जातं तसं अगदी तुतारी, ढोल पथक, आणि मुलींच्या एका समूहानं लेझीम खेळून आमचं गावात स्वागत केलं... पाणी फाऊंडेशनच्या सदस्यांनी अगदी मिठी मारून, हळद-कुंकू लावून स्वागत केलं... नंतर गावातील मुलांनी पाणी फाऊंडेशनच्या गाण्यावर त्यांचा बसवलेला परफॉर्मन्स दाखवला... जो खूप वाखाणण्याजोगा होता अन् चिमुकल्यांच्या डोळ्यांतून, नाचातून ते पाण्याचं महत्व बघणं म्हणजे अविस्मरणीय अनुभव... त्यानंतर पाणी फाऊंडेशनच्या सदस्य आणि ग्रामस्थांसोबत दुसऱ्या दिवशीच्या कामाच्या नियोजनाची मिटींग झाली... या मिटींगमध्ये आम्ही एबीपी माझाच्या १५ मुली आणि जाखणगावातील १५ मुली अशा ३० जणींचे मिळून ४ नद्यांच्या नावाने ग्रुप पाडले... सर्व नियमावली समजावली...



या सगळ्यात विशेष म्हणजे मिटींग म्हटलं की आठवतं ते पाराचं झाड, तिथं चटई अंथरून, सरपंचासाठी एखादी खाट आडवी लावून होत असलेली मिटींग पण ही मिटींग थोडी वेगळी होती... आम्ही शाळेच्या प्रांगणात जमून आधी एक पाणी फाऊंडेशनने कामाआधी आणि ग्रामस्थांच्या एकीकरता असलेलं गीत गायलं... त्यानंतर शाळेच्या एका खोलीत जमलो... जिथे अत्याधुनिक वस्तू ठेवल्या होता... पांढरा रंगाचा फळा, ज्यावर आमच्या ग्रुपची नावं वगैरे लिहिली जाणार होती... पण आम्ही एबीपी माझाच्या १५ मुली आणि गावातील १५ मुली अशी एकमेकांची ओळख व्हावी म्हणून एक भन्नाट खेळ तिथे शिकलो...

मला तर शाळेची खूप आठवण झाली.. पण शाळेत हा खेळ नव्हता, शहरातल्या शाळेत खेळ म्हणजे लंगडी, चमचा-गोटी,सुई-दोरा, दोरीउड्या पण तिथे गेल्यावर मला नवा खेळ खेळता आला तो म्हणजे ताड-हत्ती-ताड-हत्ती.... ताड म्हणजे ३ सदस्यांपैकी मधल्या सदस्याने दोन्ही हात वर करायचे आणि त्याच्या दोन्ही बाजूच्या व्यक्तींनीही त्य़ांचे हात वर करून विरुद्ध दिशेने तोंड करुन उभं राहायचं... आणि हो, इथला हत्ती पण वेगळाच होता तीन सदस्यांनी मिळून हत्ती करायचा होता, तो म्हणजे मधल्या माणसाने सोंड आणि शेपूट करायची आणि इतर २ सदस्यांनी त्याचे कान व्हायचे... आता म्हणाल, खेळ तर सोप्पा आहे,... पण खेळ जरी सोप्पा वाटला तरी त्यात बऱ्याच जणी दिशेने उभं राहण्यात चुकायच्या आणि मग त्यांना शिक्षा... शिक्षारुपाने आम्ही गावातील मुलींना, महिलांना गाणं गायला, नाचायला लावलं... त्यामुळे आम्हा ३० जणींमध्ये खूप चांगलं बाँडींग जमलं...



खेळ खेळलो, पण जाखणगावी जाण्याचा जो नेमका हेतू होता तो फाऊंडेशनच्या सदस्यांच्या आणि आमच्या डोक्यात कायम बॅक ऑफ दी माइंड सुरूच होता... बरं, कुठल्याही कामाचं नियोजन करायचं म्हटलं तर नियम, नियमावली आलीच... या २२ एक नियमांच्या नियमावलीचं वाचन करायची जबाबदारी मला देण्यात आली... मी सर्वांसमोर मोठ्याने नियम वाचून दाखवले... हे नियम आमच्या आधी आलेल्या एक ग्रुपने तयार केले होते. आता विचार कराल, या नियमावलीत काय ते नवल? पण झालं असं की या नियमावलीत एक नियम होता ज्याने मला नियमावली वाचताना येणारं गालातल्या गालातलं हसू आवरताच आलं नाही.. तो नियम असा होता की- सकाळी ६ ते सायंकाळी ८ पर्यंत आळस करू नये, आता असा नियम वाचल्यानंतर कुणाला हसू येणार नाही, तसंच मलाही माझं हसू आवरता आलं नाही, मी हसल्याबरोबर सगळ्यांचा हशा उडाला... डोक्यात हा विचार आला की आळस देण्याचा आणि मी काम करण्याचा काय संबंध? पण मग मी त्या नियमाचा शब्दश: अर्थ न काढता कामाचा कंटाळा करू नये असा अर्थ काढला...



या नियमाबरोबरच वेळेवर ठरलेल्या ठिकाणी पोहोचणं, जेवणाच्या ताटात अन्न वाया न घालवणं, विशिष्ट वेळेत दिलेली कामं पूर्ण करणं, कामाच्या वेळेत फोनचा वापर न करणं, हेडफोन्स घालून गाणी न ऐकणं, मोबाईलचा वापर फक्त ब्रेकटाईम म्हणजे नाश्ता, जेवण आणि संध्याकाळचा नाश्ता या वेळेतच करणं, पाण्याचा योग्य प्रमाणात वापर करणं अशी जबराट नियमावली होती. ज्याचा आपण नेहमीच्या आयुष्यात अजिबातच विचार करत नाही. या छोट्यातल्या छोट्या गोष्टींचा विचार ही नियमावली करताना केला होता...

पहिल्या दिवसाची रात्र सरली होती... दुसरा दिवस उजाडला... पहाटेची एक छोटीशी गंमत शेअर करते... सकाळच्या शिवारफेरीचं नियोजन होतं, त्याकरीता अगदी पहाटे ५.३०चा कॉल टाईम असूनसुद्धा आम्ही ५.२५वाजता सर्व मुली तयार होतो... तिथे दिवसाचा पहिला चहा घेतला... त्य़ा चहाची चव आणि ते अगदी निरभ्र आकाशाखाली त्या चहा आणि पार्ले जी बिस्कीटांचा आस्वाद म्हणजे खरंच माझ्याकरता आजतागायतचा बेस्ट चहा-बिस्कीटचा Early Morning Breakfast... त्यात चहा घेत असताना शूटींगही सुरू होतं.. मुलींना तो चहा घेताना बरंच काही सूचत होतं, त्या प्रतिक्रिया देत होत्या आणि अचानक ज्ञानदा मॅम माझ्या दिशेने आल्या त्यांनी विचारलं काय कोमल, कसं वाटतंय, म्हटलं मी काय बोलू? म्हणजे एवढा सुंदर चहा पहाटे-पहाटे घेत असताना काय प्रतिक्रिया देण्यापेक्षा चहाचा आनंद घेण्यात मी रमले होते... त्यानंतर आम्ही शिवार फेरीच्या ठिकाणी गेलो, शिवार फेरी म्हटलं की वाटलं, ऊसाची किंवा ज्वारीची उभी पिकं असलेल्या शिवारात जाऊ तर तिथं आम्हांला नेलं ते उंच माळरानावर... जिथं फक्त मोकळं माळरान, पाणी फाऊंडेशनच्या साहाय्याने आणि ग्रामस्थांनी श्रमदान करुन बंधारा तयार केला होता.

मी कधीच माळरानही पाहिलं नव्हतं त्यामुळे आधी मला काही समजतचं नव्हतं, त्यांनी शिवारफेरी म्हणून इथे का आणलं... पण नंतर तिथली कामं बघितली आणि कळालं की खरं काम काय असतं... शिवारफेरीतलं ते माळरान असं की जिथून सूर्योदय अगदी समांतर अंतरावर दिसतो... इतर पर्यटनस्थळी आपण डोंगरातून उगवतानाचा सूर्योदय पाहतो पण मी मात्र माझ्या समांतर नजरेवर सूर्य उगवाताना पाहिला जो मी कधीच पाहिला नव्हता.. सूर्याचं ते मोहक, अल्हाददायक, डोळं दिपावणारं रूप मला प्रचंड भावलं... जाखणगावच्या पूर्ण सहलीतला सूर्योदयाचा तो क्षण माझ्यासाठी अत्यंत निरागस आणि आनंद देणारा अनुभवला...

शिवारफेरीनंतर आम्ही पोहोचलो श्रमदानाच्या ठिकाणी... तिथे श्रमदान झालं, त्यात आम्ही ४ ग्रुप्सनी मिळून गोदावरी-नर्मदा ग्रुप ५३५ लीटर+ कृष्णा-वर्धा ग्रुप ७२७= १२६२ लीटर पाणी वाचवण्यासाठी श्रमदान केलं होतं.. ही आकडेवारी देण्यामागचं कारण एकच आम्हां लहान मुलींचा असणाऱ्या कृष्णा-वर्धा गट तिथल्या आमच्या दोन ग्रुपच्या स्पर्धेत जिंकला होता पण मोठा विचार करायचा झाला तर आम्ही ३० ही महिलांनी एकत्र श्रमदान करुन दुष्काळावर मात कऱण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलं होतं...



आणखी एक नवा खेळ आमच्यासाठी आयोजित करण्यात आला होता... त्या खेळाचं नाव होतं- स्ट्रॉ गेम... नाव ऐकून आम्हा सर्व मुलींची उत्सुकता वाढली होती... पण इथले पाणी फाऊंडेशनचे प्रशिक्षणातील गेम म्हटले की त्यातून नक्की काहीतरी वेगळं शिकायला मिळणार हे ठरलेलं... स्ट्रॉ गेम असा की यातही ४ ग्रुप्समधून ३-३ सदस्यांची निवड केली... माझ्या ग्रुपमधून मी, कृपा आणि श्रद्धा अशा तिघींना आमच्या ग्रुपने निवडलं.. या खेळात ३ पिढ्य़ा बनवण्यात आल्या होत्या. ते म्हणजे आजोबा, वडील आणि नातू... एका टपात अंदाजे कळशीभर पाणी ओतलं होतं आणि विशिष्ट वेळेत १-१ संबंधित ग्रुपमधल्या नात्याने ते पाणी स्ट्रॉच्या माध्यमाने तोंडात खेचून ते प्लास्टीकच्या बाटल्यांमध्ये भरायचं होतं... यात तुम्ही एकावेळी कितीही स्ट्रॉ वापरू शकता पण मी मात्र सुरूवातीला एकच स्ट्रॉचा वापर केला... मध्ये मोह आवरला नाही म्हणून दुसऱ्या स्ट्रॉचा आधार घेतला पण जमलं नाही... पुन्हा आपलं एका स्ट्रॉच्या माध्यमातून जेवढं पाणी भरता आलं भरलं... मग असं करून ४ ग्रुप्सच्या तिन्ही सदस्यांनी नको तेवढ्या २,३ अगदी ४-४ स्ट्रॉजचा ही वापर केला... शेवटी टपात अगदी तळाला पाणी असताना खऱ्या खेळाला सुरूवात झाली... अगदी नळावर जशी भांडणं होतात तशी तेव्हा पाहायला मिळाली.. टपातलं पाणी संपत होतं म्हणून आम्ही पाणी फाऊंडेशनचे प्रशिक्षकांना टपात आणखी पाणी ओता अशी मागणी करतोय तर ते आपले गंभीर चेहरा करून मुलींमधला सगळा गोंधळ पाहात होते... पाणी ओढण्याच्या आणि बाटली भरण्याच्या नादात विचार करायला वेळच मिळाला नव्हता... मग आम्हांला प्रशिक्षकांनी परिस्थिती समजावली... पाणी जर अस्तित्वात असेल त्याचा योग्य वापर आपण केला नाही तर पुढच्या पिढीला पाणीसाठा मिळेल का?आपल्या पूर्वजांनी पाण्याचा जसा वापर केला तसाच आपण केला तर येणाऱ्या पुढच्या अनेक पिढ्यांसाठी पाण्याचं नामोनिशाण राहिलेलं नसेल... पण हा मजेशीर वाटणारा खेळही मजेतूनच पण पाण्याचं खूप मोठं असं महत्व शिकवून गेला...

सातारा जिल्ह्यासोबत माझं एक नातं... कारण माझं मूळ गाव सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील तोंडल... पण मला सातारा जिल्ह्यातील माझ्या मामा अन् मावशीच्या गावाशिवाय काहीच माहिती नव्हतं... अगदी जाखणगावलाही मी पहिल्यांदा गेले होते... खटाव तालुक्यातील हे गाव मला आधी फक्त नावाने माहिती होतं.. पण तिथे जाण्याचा योग आला अन् तोही खूप नवं काही शिकवून गेला.. माझ्या मूळ गावी आमच्या घरात सदैव पाणी, शेतात पाणी त्यामुळे पाण्याची कमतरता कधीच पाहिली नाही अन् जाणवलीही नाही... त्यानंतर मुंबईत लहानाची मोठी झाल्याने कधीच पाण्याचं दुर्भिक्ष अनुभवलं नव्हतं पण जाखणगावी गेल्यावर पाण्याचं दुर्भिक्ष, महत्व आणि दुष्काळ काय असतो हे कळालं आणि जाखणगावी महिलादिनानिमित्तच्या सहलीला जाऊन पाण्याचं दुसरं अंगही पाहिलं, बरंच काही शिकले... कधीचं खुरपं, फावडं न बघितलेल्या माझ्यासारख्या मुलीनं ते खुरपं आणि फावडं अगदी जाणीवपूर्वक आणि आनंदानं हातात घेऊन श्रमदान केलं... आई-बाबा, आजी आणि भावानं जेव्हा आमची स्टोरी पाहिली, मी त्यांना अनुभव सांगितला तेव्हा आईच्या डोळ्यात तरळणारं पाणी बरंच काही बोलून गेलं...

मुंबईसारख्या शहरात पाणी भरण्याचा अनुभव कधीच घेतला नाही... ठाणे जिल्ह्यातील मुरबाडमधील महिलांना एक घागर पाणी भरून आणण्यासाठी किती प्रवास करावा लागतो, हे टीव्हीवरचं पाहिलंय पण जाखणगावी जाऊन मी एक घागर पाणी साठवण्यासाठी काय प्रयत्न करायचे असतात हे अनुभवलं... जागतिक जल दिनी पाण्याच्या प्रत्येक थेंबाचं महत्व कळालंय... स्वत:च वचन घेतलंय की पाण्याचा एक थेंबही वाया जाऊ द्यायचा नाही आणि माझ्या आजू-बाजूला जात असेल तर शांत बसायचं नाही...