Jaipur: राजस्थानामधील (Rajasthan) गुलाबी शहर अशी ओळख असणाऱ्या जयपूरमध्ये हवामहल, ईसरलाट स्तंभ, सिटी पॅलेस आणि चित्तोडगड सोबतच अमेर किल्ला आणि बरंच काही आहे. यातील अमेर किल्ला जयपूर (Jaipur) शहरापासून 11 किलोमीटर लांब आहे. या किल्ल्याची स्थापना राजा मानसिंह यांनी 1592 साली केली. हा किल्ला ऐरावली पर्वतरांगमध्ये असून हिंदू संस्कृतीप्रमाणे केलेले सुंदर नक्षीकाम याचं प्रमुख वैशिष्ट्य असल्याचं पाहायला मिळत.  राजा मानसिंह यांनी 1592 ते  1614 या काळात राज्य केलं. अमेर किल्ल्यावर राजा मानसिंह यांनी लढाईवेळी वापरलेल्या तलवारी तसेच राणी, दासी आणि सैनिक साथीदारांचे निवासस्थान तसेच तेथे राहणाऱ्या लोकांसाठी करण्यात आलेलं नियोजन हे सर्व किल्ल्यावर पाहायला मिळते. किल्ल्याचं मुख्यद्वार 'हाथी द्वार' म्हणून प्रसिद्ध आहे. त्याकाळात विविध सोहळ्यावेळी राजाचे स्वागत या अंबारीतून होत असे अशी पद्धत तिथे रूढ होती. मुख्यद्वारा ठिकाणीच जल कुंड देखील आहेत ज्याची रचना पायऱ्यांची केली असल्याचं पाहायला मिळतं.


भव्य शीश महल
किल्ल्यावर एक शिला देवी मंदिर देखील आहे. राजा मानसिंह यांचा एका युद्धात पराभव झाला होता.  पराभवानंतर त्यांनी  शिला देवी मंदिरात पूजन केले होते. याच ठिकणी शिश महल आहे. हा शीश महल भव्य आणि सुंदर आहे. एका आरशाकडे पाहत असतानाच दुसऱ्या आरशामध्ये  तयार होणाऱ्या प्रतिमा आणि त्यावर असणारे नक्षीकाम हे अनेक पर्यटकांना थक्क करते. खास बेल्जियम मधून त्यावेळी हे आरसे आणण्यात आल्याची माहिती तेथील गाइडनं दिली. किल्ल्यावर असणाऱ्या तोफ, ढाल, तलवारी, राजा आणि राण्यांचे महल, स्नान गृह, तलाव हे पाहण्यासारखे आहेत. याठिकाणी 4 प्रकारचे द्वार आहेत. यावर करण्यात आलेले  नक्षीकाम हे शीश महलचं सौंदर्य वाढवते.  




अमेर किल्ल्याजवळ असणाऱ्या जयपूर पॅलेजचे देखील इतिहासात विशेष महत्व आहे. राजाच्या इतिहासाप्रमाणेच राजाचे अस्तित्व जनतेला समजण्यासाठी या किल्ल्यावर एक विशिष्ट झेंडा फडकवला जातो. राजघराण्यातील राजे हे राजवाड्यात असतील तर मुख्य झेंड्यासोबत एका लहान आकाराच्या झेंडा हा किल्ल्यावर फडवला जातो. या झेंड्याचा इतिहास देखील वेगळा आहे. जयपूर पॅलेजचा राजा हा पोलो हा खेळ उत्कृष्ठ  खेळत होता. जेव्हा राजा पोलो हा खेळ खेळत असे तेव्हा त्याच्या पोशाखाप्रमाणे हा झेंडा तयार करण्यात आला आहे. या ठिकाणी जगातील सर्वांत मोठे चांदीचे  2 गंगाजल कुंड  आहेत. ज्याची निर्मिती 14 हजार चांदीची नाणी वितळवून करण्यात आली आहे. यामधील एका गंगाजलाचे कुंड हे वजन 345 किलो इतके आहे.  




जयपूर हे गुलाबी शहर अर्थात पिंक सिटी म्हणून ओळखले जाते कारण म्हणजे ठिकाणी असणारा गुलाबी रंगाचा दगड आणि आढळणारी गुलाबी माती. यामुळे इथे असणाऱ्या वास्तू या गुलाबी रंगाच्या बांधल्या जात आहेत. याचच एक उत्तम ठिकाण म्हणजेच 'हवा महल'.जयपूर मधील लोकप्रिय असलेलं 'हवा महल' 1799 रोजी महाराजा सवाई प्रताप सिंहने बनवला. तर महलाची रचना राजमुकुटासारखी आहे. पाच मजली असलेला हा महल वरील बाजूने केवळ दीड फूट रचना आले. या महलला 953 सुंदर, नक्षीदार खिडक्या आहेत. या खिडक्याना झरोखा असं देखील म्हंटलं जात.



जयपूर शहराच्या मध्यवर्ती भागात असणार ईसरलाट हे प्रसिद्ध ठिकाण आहे. जयपूरची निर्मिती करणाऱ्यामध्ये महाराजा सवाई ईश्वरी सिंह आणि मधोसिंह प्रथम यांच्यात झालेल्या लढाईमध्ये सवाई ईश्वरी यांचा विजय झाला होता. या विजयाचे प्रतिक म्हणून ईसरलाटची निर्मिती करण्यात आली. या ठिकाणाला सगरासूली देखील म्हटलं जाते. शहराच्या मध्यवधी भागात असणाऱ्या या अष्टकोनी स्तंभाची उंची 140 फूट इतकी आहे. या स्तंभामध्ये एका लहान दरवाज्यातून प्रवेश होतो तर 264  वर्तुळाकार पायऱ्या वरच्या दिशेने फिरत आहेत. तर शेवटी या स्तंभाच्या सर्वात वरच्या भागातून जयपूर या गुलाबी शहाराचे विलोभनीय दृश्य पाहायला मिळते. या स्तंभावरून जयपूरच्या राजघराण्यातील पॅलेसचे रक्षण तसेच टेहाळणी करण्यासाठी त्याकाळी या बूरुजाचा वापर केला जात असे. एकेकाळी सर्वोच्च मिनार अशी ओळख असणाऱ्या ईसरलाट वरून दिसणाऱ्या गुलाबी शहराचे अप्रतिम दृश्य नक्की अनुभवण्यासारखे आहे.