अखेर 16 ऑगस्टला आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या एका दिवसानंतर लॉर्डसवर तिरंगा फडकलाच. सिराजने अँडरसनच्या यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि कोहलीच्या टीम इंडियाने मालिकेत 1-0 आघाडी घेतली. खरं तर पहिल्या कसोटीतही दीडशेच्या आसपास रन्स करायच्या होत्या, तीही मॅच आपली होती, असं मला आजही वाटतं. दुर्दैवाने शेवटच्या दिवशी पावसाचा खेळ झाला आणि एका संभाव्य विजयावर पाणी पडलं.


दुसरी कसोटी मात्र टिपिकल टेस्ट क्रिकेटचं दर्शन घडवणारी होती. म्हणजे कधी पारडं इकडे कधी तिकडे. टीम इंडिया तीन बाद 276. आपण पाचशेच्या डोंगराचे मनसुबे रचत होतो, त्याच वेळी इंग्लंडच्या वेगवान आक्रमणाने आपल्याला 364 वर रोखलं. मग यजमानांचा रुट पुन्हा एकदा भारताच्या मार्गातला स्पीडब्रेकर होता, त्याच्या 180 रन्सनी इंग्लंडला 27 ची का होईना आघाडी मिळवून दिली. तिथून पुढे परत अँडरसन अँड कंपनीने पाहुण्यांवर प्रेशर टाकलं. एका वेळी तीन बाद 55 अशा स्थितीत भारत असताना इंग्लंडला विजयाचं दार किलकिलं झालं असं वाटलं. त्याच वेळी ज्यांच्या फॉर्मबद्दल सर्वाधिक चर्चा सुरू आहे, अशा दोन ध्यानस्थ फलंदाजांनी अर्थात पुजारा-रहाणेने नांगर टाकला.


या जोडीने 100 ची केलेली पार्टनरशिप. त्यात पुजाराच्या 45 आणि रहाणेच्या 61 धावा. या सामन्याच्या दृष्टीने प्राईजलेस होत्या. मग पुन्हा इंग्लंडने मधल्या फळीला सुरुंग लावत विजयाच्या आशा पल्लवित केल्या. तिथे शमी-बुमरा या गोलंदाज जोडीने मात्र सामना त्यांच्या हातून पूर्ण हिरावून घेतला, असं म्हणावं लागेल. म्हणजे रहाणे-पुजाराने जी जमिन नांगरली, त्याचंच हे पीक म्हणावं लागेल. अर्थात दोन्हीकडे अप्रोच वेगळा होता. रहाणे-पुजारा गोलंदाजांच्या संयमाची परीक्षा घेत होते. तर, शमीने थेट प्रतिहल्ला चढवला. त्याआधी ऋषभ पंतनेही एक छोटेखानी पण, पॉझिटिव्ह खेळी केली. अँडरसनला स्टेप आऊट होऊन सीमापार धाडायला तुमच्याकडे कॉन्फिडन्स आणि अटिट्यूड, कपॅसिटी याचा संगम लागतो. पंतने तो ऑस्ट्रेलिया सीरीजपासून दाखवून दिलाय. इथपर्यंत मॅच बॅलन्स होती, पुढे जे झालं तो इतिहास होता.


दोन सेशनपेक्षाही कमी वेळात इंग्लंडचा ऑल आऊट


कोहलीच्या डाव घोषित करण्याच्या निर्णयाबद्दल चर्चा सुरू होणार असं वाटत असतानाच भारतीय वेगवान चौकडी (शब्द लिहितानाही गुदगुल्या होतायत) इंग्लंडवर चाल करुन गेली. बुमरा-शमी या बॅटिंग पार्टनर्सनी गोलंदाजीतही पहिले दोन सुरुंग लावले. दोन बाद एक. इंग्लंडला नक्कीच हुडहुडी भरली असणार. तिथून इंग्लंडच्या फलंदाजीची तब्येत सुधारणार नाही, याची काळजी आपण घेतली. म्हणजे बॅक अप बॉलर्सनी. आपलं वेगवान आक्रमण सध्या दृष्ट लागण्यासारखं वैविध्यपूर्ण आणि धारदार झालंय. त्याच धारेने इंग्लंडच्या फलंदाजीची मान, धड सारं काही कापून काढलं. दोन सत्रात 10 विकेट्स अशी स्वप्नवत वाटणारी कामगिरी आपण केली.


ज्यात सर्वात पाठ थोपटण्यासारखा परफॉर्मन्स होता, तो मोहम्मद सिराजचा. तीन-चार कसोटी सामन्यांचा अनुभव असलेल्या सिराजने ऑसी खेळपट्ट्यांवरुन इंग्लंडच्या पिचेससाठी केलेली एडजस्टमेंट कमाल होती.


म्हणजे ऑस्ट्रेलियात बाऊन्स हे वेगवान गोलंदाजाचं अस्त्र असतं. तर इंग्लंड भूमीवर स्विंगने तुम्ही फलंदाजांच्या तंत्राची परीक्षा घेत असता. अर्थात हा स्विंग कंट्रोल करता आला पाहिजे. सिराजने हा अभ्यास नीट केला आणि तो प्रत्यक्षात उतरवला. चेंडूच्या टप्प्यातही त्याने दाखवलेली मॅच्युरिटी सुखावणारी होती.


रवींद्र जडेजाकडून गोलंदाजीत मात्र थोडी निराशा झालेली दिसली. म्हणजे तो तळाच्या फलंदाजांना घेऊन काही उपयुक्त भागीदाऱ्या करतोय, हे जरी खरं असलं तरी त्याच्याकडून महत्त्वाच्या क्षणी ब्रेक थ्रूची अपेक्षा आहे. जे अश्विन आपल्याला देत असतो. किंबहुना नवीन चेंडूवर थेट दुसऱ्या षटकातही अश्विनच्या हाती चेंडू येऊन तो कर्णधाराला पाहिजे ते रिझल्ट अश्विनने दिलेत. या साऱ्या गोष्टी आगामी सामन्यांसाठी टीम सिलेक्ट करताना विचारात घेतल्या जाऊ शकतात. अर्थात इथे क्षेत्ररक्षण हाही फॅक्टर विचारात घ्यावा लागेल. जडेजाच्या फिल्डिंगचा क्लास खूपच वरचा आहे. त्याचा वेग, त्याची ग्राऊंड कव्हर करण्याची कपॅसिटी या साऱ्यात सरस आहे.


चौथ्या डावात खेळपट्टी फारशी धोकादायक नसतानाही शिस्तबद्ध गोलंदाजी करत आपण बाजी मारली. म्हणजे दोन कॅचेस सोडूनही आपण आठ ओव्हर्सआधीच जिंकलो, यावरुन आपल्या फास्ट बॉलर्सचा तिखटपणाचा अंदाज येतो.


रुट वगळता एखाद-दोन फलंदाजांनी ५० च्या आसपास खेळी केल्या असल्या तरी इंग्लंडची आघाडीची फळी आणि काही अंशी मधली फळीही भारताच्या तुलनेत कमकुवत आहे. हे दोष पाचव्या दिवशी उघडे पडले. रुट लवकर पॅव्हेलियनमध्ये गेला की, इंग्लंडच्या विजयाचा मार्गच बंद होतो, हे प्रूव्ह झालं. या सायकॉलॉजिकल मुद्याचा आपण पुढच्या तिन्ही कसोटीत चांगल्या पद्धतीने वापर करायला हवा.


राहुलला गवसलेला क्लासी टच, रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमध्ये दाखवत असलेली संयमी परिपक्वता हे पुढच्या तिन्ही मॅचेससाठी चांगलं लक्षण आहे.


आपल्या फलंदाजांपैकी कोहलीला एका मोठ्या इनिंगची गरज आहे. या मॅचच्या आपल्या दुसऱ्या डावात तो पॉझिटिव्ह खेळत होता. तेव्हा त्याने सॅम करनला दिलेली विकेट ही उत्तेजनार्थ बक्षिसासारखी होती. चेंडू इतका बाहेर होता, की त्याला बॅट लावून कोहलीने करनचं मनोबल उंचावलं असंच म्हणावं लागेल. पुढच्या मॅचेसमध्ये इतकी उदारमतवादी वृत्ती कोहली दाखवणार नाही, अशीच अपेक्षा आहे. एकूणातच भारतीय संघ सामना जिंकल्यानंतर रिलॅक्स झोनमध्ये जाणार नाही, हे राहुल आणि कोहलीने केलेल्या दोन स्टेटमेंट्सवरुन पक्क झालंय.


राहुल म्हणाला, आमच्या एका खेळाडूला टार्गेट करण्याचा तुम्ही प्रयत्न केलात तर, तुमच्यावर आमचे अकरा खेळाडू चालून जातील. ही आक्रमक वृत्ती कोहली-रवी शास्त्री जोडीने भिनवलीय या टीममध्ये. दुसरं कोहलीचं वाक्यही फारच आवडलं. वुई हॅव थ्री मोअर टेस्ट मॅचेस, वुई कान्ट सीट ऑन अवर लॉरेल्स. मेसेज अगदी स्वच्छ आहे. गाठ कोहली अँड कंपनीशी आहे. आता प्रतिस्पर्ध्य्याला त्यांच्याच भूमीत गुडघे टेकायला लावून मालिका खिशात घालण्यासाठी याहून चांगला मुहूर्त सापडणार नाही. सो लगे रहो टीम इंडिया.