IND vs NZ: दिवाळी (Diwali 2023) सेलिब्रेशन ऐन रंगात असतानाच विश्वचषकाच्या (World Cup 2023) मैदानात उद्या  चौकार-षटकारांची दिवाळी साजरी होणार आहे. निमित्त आहे ते भारत-न्यूझीलंड (India vs New Zealand) सेमी फायनलचं (ICC World Cup Semi Final). मुंबईच्या (Mumbai News) वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) ही लढाई रंगणार आहे. वानखेडेपासून हाकेच्या अंतरावर उधाणलेला समुद्र तर आज वानखेडेत भारतीय टीमच्या फॅनचा समुद्रही अवतरणार आहे. सलग नऊ सामने जिंकत रोहितसेनेने असामान्य कामगिरी बजावलीय. सर्व प्रतिस्पर्ध्यांना पाणी पाजलंय. त्यात किवी टीमदेखील आहे. पण, नॉक आऊट मॅचमध्ये हा सारा इतिहास पुसून जाईल आणि वर्तमानातली कामगिरी जी इतिहास घडवेल, तीच महत्त्वाची असेल.


फॉर्म, सातत्य आणि लय याचा विचार केल्यास रोहितची (Rohit Sharma) टीम कमाल कामगिरी करतेय. तर, दुसरीकडे विल्यमसनची किवी टीम पहिले चार सामने जिंकल्यानंतर सूर काहीसा हरवून बसलेली. त्यात विल्यमसन दुखापतीमुळे सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकलेला. असं असलं तरी फायटर न्यूझीलंडने चौथा क्रमांक पटकवत सेमी फायनलचं तिकीट मिळवलंच. त्यांची लढाऊ वृत्ती पाहता नऊ विजयांची माळ लावणारी भारतीय टीम त्यांना कमी लेखण्याची चूक करणार नाही. 


न्यूझीलंड टीमकडेदेखील मोठ्या स्टेजवर परफॉर्म करणारे मोहरे आहेत. विल्यमसन, मिचेलसारखे तगडे बॅट्समन त्यांच्या ताफ्यात आहेत. धोकादायक ठरु शकणारा कॉनवे आहे. या वर्ल्डकपमधील त्यांचा बॅटिंग हीरो युवा फलंदाज रचिन रवींद्रने थक्क करणारी कामगिरी करुन दाखवलीय.  डावखुरा रवींद्र फिरकी तसंच वेगवान माऱ्याला समर्थपणे तोंड देताना या स्पर्धेत पाहायला मिळाला. नाबाद 123, 116 आणि 108 अशा तीन शतकांची नोंद त्याने केलीय. याशिवाय 75, 51, 42, 32 अशा उपयुक्त खेळीही केल्यात. कधी सलामीला तर कधी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरणाऱ्या रवींद्रचा सेमी फायनलमध्ये लवकर अडसर दूर करावा लागेल. लॅथमसारखा अत्यंत हुशार फलंदाजही त्यांच्याकडे आहे. त्याने विल्यमसनच्या अनुपस्थितीत नेतृत्वही उत्तम केलेलं.


न्यूझीलंड टीमची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांच्या बॅटिंगमध्ये असलेली डेप्थ. नीशम, फिलिप्स, सँटनरसारखे खेळाडू जे तळाच्या फळीत येऊन चौफेर टोलेबाजी करतात. त्यामुळे अगदी नऊ,दहा नंबरपर्यंतही न्यूझीलंड टीम फटक्यांचे फटाके फोडू शकते. इथे भारतीय संघाबद्दल थोडी धास्ती वाटतेय. कारण सात नंबरच्या जडेजानंतरचे चारही गोलंदाज हे तितके परिणामकारक फलंदाज नाहीत, जितके किवींचे बॉलर्स इफेक्टिव्ह बॅटिंग करतात. तसंच त्यांच्याकडे साऊदी आणि बोल्ट ही आक्रमणाची अनुभवी जोडगोळी आहे, ज्यांच्यावर प्रमुख मदार आहे.


किवी टीमच्या कामगिरीत चढउतार असले तरी सेमी फायनलची मॅचचा दबाव वेगळा आहे. मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे ही नॉक आऊट मॅच आहे. त्यामुळे आधीची पाटी पुसून आपल्याला नव्याने आपल्याला पेपर सोडवायचाय. या वळणावर किवी टीम ही धोकादायकच आहे. 2019 च्या वर्ल्डकपमध्ये आपण ते अनुभवलंयदेखील.  क्षेत्ररक्षण हीदेखील किवी टीमची जमेची बाजू आहे. त्यामुळे त्याही आघाडीवर आपल्याला सरस कामगिरी बजावावी लागणार आहे.


दुसरीकडे भारतीय टीमचं या स्पर्धेतलं सातत्य केवळ अविश्वसनीय आहे. रोहित-गिल जोडीची खणखणीत सलामी, मिस्टर कन्सिस्टंट कोहली, श्रेयस अय्यर, राहुल यांच्या बॅटमधून पडणारा धावांचा पाऊस क्रिकेटरसिकांना आनंदांच्या वर्षावात चिंब करतोय. प्रत्येक सामन्यागणिक कोहली नावाचा धावांचा महासागर रुंदावतोच आहे. रोहित शर्मा सुरुवातीला फलंदाजीला उतरत गोलंदाजीच्या ठिकऱ्या करतोय. धावांचा हायवे खुला झाल्यावर कोहली आणि कंपनीची गाडी सुसाट निघतेय. सूर्यकुमार यादवलाही जेव्हा मिळाल्या त्यावेळच्या छोट्या संधींचं त्याने सोनं करण्याचा प्रयत्न केलाय, तसाच गिलही उत्तम ऱ्हिदममध्ये खेळत तीन आकडी स्कोरकडे तो पोहोचतोय असं वाटत असतानाच गाडी अडकतेय. आता ही कमी भरुन काढण्यासाठी सेमी फायनलपेक्षा मोठा मंच दुसरा कोणता असणार? त्यामुळे गिलकडून येणाऱ्या मॅचमध्ये मोठ्या इनिंगची अपेक्षा आहे. तशीच सूर्यकुमार यादवकडूनही मोठी खेळी व्हावी अशी अपेक्षा आहे. मॅक्सवेल स्टाईल बॅटिंग करण्याची क्षमता असलेला सूर्या बहरात आला की स्टेडियमचे कोपरेही कमी पडतील अशी टोलेबाजी करत असतो. हा सूर्य उद्या वानखेडेवर तेजाने तळपावा अशी अपेक्षा करुया (खरं तर अव्वल पाचांनीच काम फत्ते करावं आणि त्याला बॅटिंगच येऊ नये अशीही छुपी अपेक्षा आहे) . यंदाच्या विश्वचषकाचं आपलं बॅटिंग इतकंच  बलस्थान ठरलंय ते गोलंदाजी. वेगवान त्रिकूट आणि फिरकी जोडगोळीचा परफॉर्मन्सही प्रतिस्पर्धी टीम्सची दाणादाण उडवतोय. पंड्या दुखापतग्रस्त होऊन बाहेर गेल्यापासून या पाच जणांनी  प्रतिस्पर्ध्यांना सळो की पळो करुन सोडलंय. बुमरा, सिराजच्या जोडीला शमी आला आणि वेगवान माऱ्याची धार आणखी वाढलीय. बुमराचं वैविध्य, अचूकता, शमीची सीम मूव्हमेंट,टप्पा आणि सिराजचा पेस या तिघांनीही भल्या भल्या बॅटिंग लाईनअपची झोप उडवलीय. तर जडेजा, कुलदीपची फिरकीही समोरच्या टीमला ढूंढो ढूंढो करायला लावतेय.  पहिली गोलंदाजी असताना प्रतिस्पर्धी बॅटिंगला ब्रेक लावणं आणि दुसरी गोलंदाजी असताना ती उखडून टाकणं हे काम भारताचे पाचही गोलंदाज अगदी चोख बजावतायत.


इंग्लंडला 129 वर ऑलआऊट, श्रीलंका 55 वर पॅकअप तर बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला 83 वरच खुर्दा. ही कामगिरी समोरच्या टीमला धडकी भरवणारी आहे. आजच्या सामन्यात असाच किवींची धडधड वाढवणारा परफॉर्मन्स या पाचही जणांकडून अपेक्षित आहे. टॉसचं दान कुणाच्या पारड्यात पडतंय यावरही बरंच काही अवलंबून असेल. दुसऱ्या सत्रात चेंडू काहीसा मूव्ह होऊ शकतो, त्यामुळे सुरुवातीच्या काही ओव्हर्स धावांचा पाठलाग कऱणाऱ्या टीमसाठी कसोटी पाहणाऱ्या ठरु शकतात.


मॅच मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर आहे. त्यात मुंबईत सध्या प्रदूषित हवेचा प्रश्न ऐरणीवर आलाय त्यामुळे दिवाळी फटाक्यांसाठी वेळेची बंधन आहेत. संध्याकाळी 8 ते 10 अशीच वेळ फटाक्यांसाठी आहे. हे नियम चौकार, षटकारांच्या फटाक्यांना मात्र नाहीत, त्यामुळे भारतीय बॅट्समननी हे फटाके जोरात वाजवले तर किवी टीमचं पॅकअप नक्की होईल, अर्थात त्यांना गोलंदाजांची साथही मोलाची ठरेल. आपल्याला फायनलसाठी अहमदाबादचं आणि किवी टीमला परतीचं तिकीट काढण्यासारखा परफॉर्मन्स देऊया. सेमी फायनलचा फटाका जोरात वाजवूया.