BLOG : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची इच्छा होती की, हरियाणात एकत्र  विधानसभा निवडणूक लढवावी. मतांचे ध्रुवीकरण होऊ नये आणि भाजपला त्याचा फायदा होऊ नये असे त्यांना वाटत होते. हरियाणाची सता मिळवून शंभू बॉर्डर खुली करून शेतकऱ्यांना दिल्लीकडे जाण्याचा मार्ग मोकळा करण्याचा काँग्रेसचा विचार आहे. त्यासाठी सत्ता मिळवण्यासाठी काहीही करावे असे काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांना वाटत होते. मात्र स्थानिक नेत्यांचा या युतीला विरोध होता. 


काँग्रेसच्या सर्व्हेतही हरियाणात काँग्रेसला जास्त जागा मिळतील असेच दिसत होते. त्यातच आप 10 जागा मागत होते. मात्र काँग्रेसचे नेते 3 ते 5 जागा देण्यासच तयार होते. जवळ जवळ आठ दिवसांच्या विचार मंथनानंतर आप आणि काँग्रेसने एकटेच लढण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय झाल्याबरोबर आपने 20 जागांची यादीही जाहीर केली. आप काँग्रेस आणि भाजपमधील काही बंडखोरांना तिकीट देणार असल्याचेही सांगितले जात आहे. यामुळे अनेक जागांवरील समीकरण बदलणार असून त्याचा काँग्रेस आणि भाजपलाही फटका बसणार आहे.


मात्र काँग्रेस आणि आपमधील युती का फिस्कटली याची काही कारणे आता समोर आली आहेत. त्यात महत्वाचा मुद्दा होता आपकडून जास्त जागांची मागणी. काँग्रेसला बिहारमध्ये जागा वाटपाच्या तिढ्यावरून मोठा फटका बसला होता. बिहारमध्ये काँग्रेसने राजद बरोबर युती केली होती. खरे तर राजदने जास्त जागा मागितल्या होत्या पण काँग्रेसने वाटघाटी करीत 70 जागा पदरात पाडून घेतल्या. पण त्यापैकी फक्त 19 जागांवरच काँग्रेसला विजय मिळवता आला होता. राजद 144 जागांवर लढले होते. त्यांनी 75 जागा जिंकल्या होत्या. भाजपपेक्षा एक जागा जास्त जिंकली होती. पण एनडीएने संख्याबळ जुळवले आणि नितीश कुमार पुन्हा बिहारच्या मुख्यमंत्रीपदजी विराजमान झाले होते. 


हरियाणामध्येही आपला जास्त जागा दिल्या आणि ते जर त्या जागा हरले तर त्याचा मोठा फटका बसू शकतो म्हणून काँग्रेस आपला जास्ता जागा देण्यास तयार नव्हते. हरियाणामध्ये आतापर्यंत काँग्रेस आणि भाजपमध्येच थेट लढाई झाली आहे. भाजप अन्य पक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करीत आली आहे. हरियाणात आपचे अस्तित्व तसे फार नाही. अशात आप जर सोबत आली आणि जास्त जागांवर पराभव झाला तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे कठिण होईल असे काँग्रेस नेत्यांना वाटत  होते. म्हणूनच काँग्रेस जास्त जागा लढवण्यावर ठाम होती आणि आपच्या दबावाला बळी पडायचे नाही असेही त्यांनी ठरवले होते. 


त्यात आप काही जागांवर आग्रही होती. कलायत आणि कुरुक्षेत्रची जागा सोडा असा आपचा आग्रह होता आणि काँग्रेस या 2 जागा कोणत्याही परिस्थितीत सोडण्यास तयार नव्हती. युती तुटल्याबरोबर आपने लगेचच कलायतमधून अनुराग ढांडा, महममधून विकास नेहरा आणि रोहतकमधून बिजेंद्र हुडा यांची नावे जाहीर केली. आणखी एक गोष्ट म्हणजे आपची महत्वाकांक्षाही काँग्रेस नेत्यांना चांगलीच ठाऊक आहे.


पंजाबनंतर हरियाणातही सत्ता स्थापन करण्याची आपची महत्वाकांक्षा आहे. दिल्ली, पंजाबमध्ये आपने काँग्रेसला धूळ चारली होती. गोवा आणि गुजरातमध्येही आपमुळे काँग्रेसला चांगलेच नुकसान झाले होते. आपण फक्त दिल्ली आणि पंजाबपुरतेच मर्यादित राहायचे नाही तर दंशभरात पोहोचायचे अशी अरविंद केजरीवाल यांची महत्वाकांक्षा आहे. आपच्या या महत्वाकांक्षेला किती बळ द्यायचे आणि त्यांना मोठे का होऊ द्यायचे असाही काँग्रेस नेत्यांचा विचार होता. 


एक प्रकारे पाहिले तर आप आणि काँग्रेस दोघेही युती करण्याबाबत तेवढे आग्रही नव्हते. आपल्या अटींवर युती झाली तरच करायची असे काँग्रेस नेत्यांनी ठरवले होते आणि आपनेही जास्तीत जास्त जागा मिळाल्या तरच युती करायचे असे ठरवले होते. ही  गोष्ट न झाल्यानेच हरियाणात आप आणि काँग्रेसची युती फिस्कटली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.