आणखी एक उत्सव संपन्न झाला. चैतन्यमूर्ती बाप्पा आले. ऊर्जा, उत्साह, आनंद पेरुन  आपल्या गावाला निघून गेले. निरोप देताना मन भावूक होतंच. डोळ्यात टचकन पाणीही येतं. त्यात तुम्ही जर चौपाटीवर जाणाऱ्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होत असाल तर भावनांचा कल्लोळ तुम्हाला पाहायला मिळतो. कुणी लेझीम, कच्छी बाजावर ठेका धरत असतो. कुणी बाप्पाच्या गाडीसोबत, ट्रॉलीसोबत चालत असतो. कुणी आपल्या लहानग्याला कडेवर घेऊन वाट धरत असतो तर, एखादी आजी किंवा आजोबाही तरुणाईच्या उत्साहात ते अंतर कापत असतात. जसजशी निरोपाची अर्थात चौपाटीवरच्या विसर्जनाची वेळ आणि ठिकाण जवळ येतं. तशी पावलं जड होतात आणि मनही. समोर विस्तीर्ण समुद्र दिसतो. तेव्हा डोळ्यातही एक समुद्र दाटतो. या समुद्रात एकच लाट असते बाप्पांच्या भक्तीची.लाडक्या बाप्पाच्या निरोपाचा क्षण समीप येतो. बाप्पांची विसर्जनाआधीची आरती होते. मग बाप्पा गावाला निघतात. आपणही घराकडची वाट धरतो. सरलेल्या उत्सवाचा फ्लॅशबॅक मनाच्या पडद्यावर मग उमटू लागतो.

 

स्पर्धा, बक्षीस समारंभ, श्रीसत्यनारायण पूजा, गणेश याग, सहस्रावर्तने, अंताक्षरी स्पर्धा. प्रत्येक कार्यक्रमाची गोडी न्यारी. त्यातून तुम्ही स्पर्धक, आयोजक ते मुलगी स्पर्धक असलेला बाबा असा प्रवास करता तेव्हा फारच भारी अनुभव असतो. कधी काळी स्पर्धेत भाग घेणारे, स्पर्धा घेणारे आपण, त्याच स्पर्धेत आज आपली मुलगी भाग घेतेय, हे फिलिंग कल्पनेच्याही पलिकडे समाधान, आनंद देऊन जाणारं आहे.


तास-दीड तास सुरु राहिलेली महाआरती. त्यातल्या काही आरत्यांची वेळी घ्यायचे आलाप, किंवा लांब न्यायचा स्वर. प्रसादावर मारलेला ताव. मोदक, पेढे, बर्फी, साखर फुटाणे. तुम्ही नाव घ्या आणि तो प्रसाद तुमच्यासमोर असतो. जेवण थोडं कमीच जातं. किंवा केलं नाही तरी पोट भरतं. लाडक्या बाप्पाच्या मंडपात आपली माणसं कडकडून भेटतात, गप्पा रंगतात, तेव्हा तीन तास, चार तास झोपून काम करुन आल्याचा शीण कुठल्या कुठे पळून जातो, यातला प्रत्येक क्षण भरभरून जगण्यात मजा आहे.

 

त्या वातावरणात, बाप्पांच्या सहवासात विलक्षण जादू आहे. म्हणजे रिकामा पाट किंवा ट्रॉली पाहून मन गलबलून येतं. तुम्ही उत्सव भरभरून जगलेले असता, याची ती पावती असते. सार्वजनिक मंडळात, त्यातही गिरगावसारख्या उत्सवी वातावरण कणाकणात वसलेल्या भागात, चाळींमध्ये तुम्ही जेव्हा राहत असता, तेव्हा अवघ्या मंडपाचं घर आणि घराचा गणेशोत्सव मंडप व्हायला वेळ लागत नाही. 


सध्या महागड्या फोन्समुळे रोजच्या रोज व्हिडीओ कॉलिंगची सुविधा उपलब्ध असली तरी प्रत्यक्ष भेटीचा आनंद काही औरच. आपली चाळ शरीराने सोडून गेलेली, पण मनाने तिथेच असलेली मंडळी अनेक महिन्यांनी किंवा कदाचित अनेक दिवसांनी भेटत असतात, पण आपलेपणाचा धागा घट्ट असतो. अनेक उत्सवांच्या तर कधी लहानपणीच्या आठवणी मनाच्या कप्प्यातून डोकावू लागतात. त्यातही आपल्या बाबांच्या, काकांच्या वयाची मंडळी जेव्हा गप्पांचा फड रंगवतात,  तेव्हा तुम्ही श्रोत्यांच्या भूमिकेत राहणंच उत्तम. त्या आठवणींमधून मध्येमध्ये संस्कृतीचा, उत्सव आयोजनाच्या मॅनेजमेंटचा एकेक पदर ही मंडळी तुमच्यासमोर उलगडत असतात. मंडपातले किंवा अगदी घरी आलेल्या नातेवाईकांसोबतच्या गप्पांचे ते क्षण मोगऱ्यासारखे असतात. सुवासाने उल्हासित करणारे. क्षण निघून गेले तर मनात गंध दरवळतच राहतो.

 

घरगुती गणेशोत्सव असो वा सार्वजनिक, आपल्या बाप्पासोबतच्या नात्याची ती वीण वर्षानुवर्षे आणखी घट्ट होत राहते. दहा दिवस कापरासारखे भुर्रकन उडून जातात तरी त्याचा दरवळ उदबत्तीसारखा चिरंतन राहतो.  विसर्जनानंतर उसळ पाव किंवा मिसळ पावचा बेत हा हल्लीचा शिरस्ता. त्याचा आस्वाद घेतला की, घराकडची वाट तुम्ही धरता. कधी मालिशवाला आला असेल तर तलिया किंवा पायाचा मसाज करुन घेऊन तुम्ही झोपी जाता.


दुसऱ्या दिवशी तुमचं रुटिन लाईफ सुरु होतं, कामावर जाऊन तुम्ही परतता, त्यातही तुमची ड्युटी जर रात्री उशीरा संपणारी असेल तर दुसऱ्या दिवशी तुम्ही 1 च्या सुमारास जेव्हा घरी येता, तेव्हा जे रस्ते वाद्यांच्या दणदणाटाने, बालगोपाळांच्या नृत्याविष्काराने निनादलेले असतात,  तेच रस्ते शांत झोपी जातात. तुम्ही तुमच्या इमारतीत, मंडपात प्रवेश करता. 


आधी श्याम सदनमध्ये जवळपास चाळीसहून अधिक वर्षे (ज्या वास्तुचा आता पुनर्विकास प्रकल्प सुरु आहे) तर, गेल्या काही वर्षांमध्ये कुडाळदेशकर निवास आणि अॅटलास रॉयल बिल्डिंगमध्ये बाप्पांच्या उत्सव साजरा झाल्यानंतरच्या रात्रीची शांतता उत्सवाच्या आठवणींनी मन गलबलून टाकते. त्याच वेळी आपण बाप्पांशी इतके एकरुप झालेले असतो की, मोकळा मखर, रिकामा पाट, गजबजलेल्या मंडपातली शांतताही जणू हळूहळू बोलू लागते. लेझीम किंवा कच्छीच्या तालावर जसा फेर धरला जातो, तसा फेर धरत या आठवणी येतात. त्यांचं बोट पकडत एकेक दिवसाचा आठवणीचा हार गुंफला जातो अन् ताजातवाना ठेवला जातो वर्षभरासाठी.

माझं राहण्याचं ठिकाण बदललं तरी बाप्पांबद्दलची ओढ, आपलेपणा तसाच. म्हणूनच अनंतचतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशीच्या रात्री घरी परततानाची भावनाही तीच. बाप्पांच्या मूर्तीचं विसर्जन झालेलं असतं आणि तुमच्या मनात या अविस्मरणीय क्षणांचं आगमन.