- डॉ. रेवत कानिंदे
(लेखक जेजे रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी आहेत)

दोन दिवसांपासून कुणालाही कॉल केला की रिंग जायच्या आधी कोरोना विषाणू विषयी जागरूकता देणारा मॅसेज ऐकायला येतोय. मागे H1N1 विषाणूचा प्रादुर्भाव वाढलेला त्यावेळेस एवढी तत्परता नव्हती.


भारतात आरोग्य विषयक ढिसाळ कारभाराची सगळ्यांना जाणीव आहे. ज्या खेड्या-पाड्यांमध्ये डॉक्टर्स आहेत तिथं औषधं उपलब्ध नाहीत. ज्या मोठ्या रुग्णालयात मुबलक औषधसाठा आहे, तिथं स्पेशालिस्ट डॉक्टर्स नाहीत, अशी अवस्था आहे. त्यात कोरोना सारखे साथीचे रोग आले की, त्या विषयी जागरूकता करण्याची जबाबदारी ही शासकीय सेवेत असणाऱ्या आणि संख्येने तुटपुंजे असलेल्या डॉक्टर्स वर येते. तुमचं रोजच काम सांभाळून ही वाढीव कामं करतांना मग डॉक्टर्सची दमछाक होते. मग ती एअरपोर्टवर स्क्रिनिंग करण्याची ड्युटी असो, वा शासकीय रुग्णालयात साथीच्या रुग्णांसाठीची वेगळी व्यवस्था. न थकता जबाबदारीची जाणीव ठेवत ही कामं करावी लागतात. ती ते करतात ही.


भारतासारख्या लोकसंख्येमध्ये अव्वल असलेल्या देशात हवेतून पसरणाऱ्या रोगाची सुरुवात झाली तर ती थांबवणं आवश्यक आहे. असे रोग पसरू नये म्हणून फक्त डॉक्टरांनी जागरूक राहून फायदा होत नाही, तर प्रत्येक नागरिकाने काळजी घेणे आवश्यक असते. शिंका, खोकला यामुळे पसरणारे रोग हे खूप जास्त संसर्गजन्य असतात. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःची माफक काळजी घेणे अपरिहार्य ठरते. अशा वेळेस सगळ्यात महत्वाची भूमिका असते ती जनजागृतीची. केंद्र सरकारने सुरू केलेला उपक्रम ज्यात फोन कॉल केल्यावर ऐकू येणारा मेसेज आहे हा स्तुत्य उपक्रम आहे.


कॉल केल्यावर ऐकू येणारा खोकल्याचा आवाज हा व्हाइट कॉलर असलेल्या अभिजन कानांना कितीही इरिटेड होणारा वाटत असला तरी त्यामाध्यमातून होणारी जनजागृती ही नक्कीच फायद्याची ठरणार आहे. जनजागृती करतांना ती किती दिखाऊ आहे? ह्या पेक्षा ती किती तळागळातील लोकांपर्यंत पोहचेल हे महत्वाचं असतं. इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया हा प्रत्येकच वेळी एखादा संदेश सगळ्यांपर्यंत पोहोचवेल असं नसतं. त्यातही त्याला वेळ आणि काळाची मर्यादा असते. फोन कॉलवरील संदेश हा जो कुणी कॉल करेल, ज्या कुठल्या वेळेला करेल, त्या वेळेला जनजागृती करत आहे.


भारतासारख्या धर्मांधतेनं बरबटलेल्या देशात अंगारे-धुपारे, गोमूत्र -शेणाचा वापर, बाबा बुआ मौलवीचे गंडे, दोरे यामार्फत जो खोडसळ आणि हानिकारक प्रकार चालतो, तो संशयित रुग्णाला तसेच रुग्णाच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे. अशा अंधश्रद्धा मीडियावरही वारंवार फिरत असल्याने वैज्ञानिक आणि वैद्यकीय दृष्ट्या योग्य तो सल्ला प्रत्येकापर्यंत पोहोचणे फार गरजेचे आहे. फोन कॉल वरील संदेश ते योग्य प्रकारे करत आहे.


कोरोना हा विषाणू आहे. विषाणूसाठी आपण जे इतर आजारांसाठी अँटिबायोटिक्स खातो ते उपाय म्हणून वापरता येत नाहीत. अँटीबायोटिक्स हे जिवाणूसाठी असतात. विषाणूंच्या बाबतीत विषाणूंची लागण होऊ न देणं, हाच महत्वाचा प्रतिबंधात्मक उपाय आहे. हा फोन कॉलवर येणारा मेसेज नेमकं तेच करत आहे. जर कुणाला सर्दी खोकला असल्यास त्यांनी रुमाल किंवा टिश्यू पेपरचा वापर करावा, ते उपलब्ध नसल्यास शिंका किंवा खोकला हात कोपराला दुमडून त्यामध्ये खोकावे, वारंवार हात धुवावे, हात डोळे, नाक, तोंडाला न लावण्याची खबरदारी घ्यावी, जर कुणाला सर्दी खोकला असेल तर त्या व्यक्ती पासून किमान एक मिटर अंतर सोडून थांबावे, असे वरकरणी सोपे वाटणारे पण अत्यंत महत्वाचे उपाय या मेसेजमध्ये सांगण्यात आले आहेत. एवढंच काय तर अशी लक्षणं आपल्यामध्ये आढळल्यास त्या बाबतीत अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर सुद्धा देण्यात आला आहे. जगभरात पसरत असलेला आणि सगळ्यांच्या मनात दहशत निर्माण केलेला आजार मेसेजमध्ये सांगितलेल्या सोप्या आणि सहज उपायाने थांबू शकतो. त्याचा प्रादुर्भाव वाढण्यापासून प्रतिबंध होऊ शकतो. अगदी महागडे मास्क वापरून स्वतः मध्ये आणि इतरांमध्ये पॅनिक करण्याऐवजी या सोप्या मार्गाचा उपाय करता येऊ शकतो, एवढा तो प्रामाणिक मेसेज आहे.


रोज जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवायला पाहिजे, असं सतत आपली आई लहान मुलांना सांगत असते, तसच काहीसं हा मेसेज करत आहे, आपल्या सगळ्यांसाठी. त्या निमित्ताने आपल्या सगळयांनाच चांगली सवय लागली तर काय वाईट आहे. Prevention is better than cure जे म्हणतात ना ते हेच. त्यामुळे अशा मेसेजने इरिटेड न होता संयम बाळगून काळजी घेणे अत्यावश्यक आहे. तरच आपण कोरोना विषाणू चा योग्य पद्धतीने सामना करू शकू.