'अब हिंदू मार नहीं खायेगा' माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी 1970 साली लोकसभेत भाषण करताना केलेलं हे वक्तव्य प्रत्येक भारतीयाला माहिती आहेच. या वक्तव्याला पार्श्वभूमी आहे ती 1970 च्या भिवंडी दंगलीची.  नुकतंच देशाचे माजी कायदेमंत्री राम जेठमलानी यांचे निधन झाले. भारतात कोणताही अतिचर्चित, वलयांकित खटला उभा राहिला की त्यात वकील म्हणून 'राम जेठमलानी' हे असणारचं असं एक सूत्रच झालेलं होतं.


राम जेठमलानी यांनी लढवलेले आजवरचे खटले अनेक प्रकारे, अनेकार्थाने गाजले, लक्षात राहिले. त्यात भिवंडीतल्या हिंदू पक्षकारांचा १९७० च्या दंगलीतला खटला आहे. ज्यातले काही मुद्दे आज मुद्दाम अधोरेखित करावेसे वाटतात. १९७० च्या भिवंडी दंगलीविषयी लिहीताना त्याचा इतिहास थोडा समजून घेण्याचा प्रयत्न करुया. म्हणजे जेठमलानी यांनी लढवलेला खटला काय होता त्याची गहनता किती होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी कोर्टात कशी बाजू मांडली होती हे समजण्यास मदत होईल.

मुंबईपासून ४५ किलोमीटर अंतरावर असलेलं भिवंडी हे एकेकाळी बंदर असल्यानं इराण, अफगाणमधले मुस्लिम व्यापारी येऊन राहिले आणि वस्ती वाढवली. त्यामुळे जवळपास ४८ टक्के लोकसंख्या ही याच लोकांची झाली.  शिवाय उत्तरप्रदेश, बिहार, आध्रंप्रदेश, कर्नाटक राज्यातील लोकांची संख्याही जास्त आहे.

१९६७ साली भिवंडीमध्ये शिवजंयती मिरवणुकीच्या दरम्यान गुलाल उधळण्यावरुन हिंदू आणि मुस्लिम यांच्यात वाद झाला होता आणि त्यानंतर दोन्ही पक्षकारांमध्ये सतत तणाव वाढत राहिला. १९७० साली अहमदाबादमध्येही दंगल झालेली होती. त्याच काळात भिवंडीमध्ये जनसंघ, संघ, शिवसेना ही बाळसं धरत होती त्यामुळे तरुण मंडळी मोठ्या प्रमाणात यासगळ्याकडे आकर्षित होत होती.

१९७० साली भिवंडीतील काही संघ स्वयंसेवकांना पत्रं आली होती. त्यात लिहिण्यात आलं होतं की 'अहमदाबादचा बदला आम्ही भिवंडीत घेऊ'. आजही ही पत्रं उपलब्ध आहेत. यानंतर त्या स्वयंसेवकांनी पोलिसांत तक्रार वगैरे दाखल केली होती. पोलिसांकडून मदत मिळेल अशी अपेक्षा त्याहीवेळी हिंदू पक्षकारांना होती.

सात मे 1970 साली शिवजयंतीची मिरवणूक शिवरायांची प्रतिमा घेऊन निघाली होती, जवळपास तीन ते चार हजारांच्या संख्येने लोकं होती. मिरवणूक केसरबागच्या ठिकाणी आली असताना अचानक मिरवणुकीवर दगडफेक सुरु झाली. मशिदींमधून बल्ब, अॅसिडचे दिवे, पेट्रोल बॉम्बचा हल्ला सुरु झाला आणि सत्तर सालची दंगल ही पेटवली गेली होती, असं हिंदू पक्षकारांचं म्हणणं आहे.

यानंतर ही दंगलीची आग प्रचंड धुमसत राहिली. शेकडो लोकांचे जीव गेले, घरं जाळली गेली. अगदी होत्याचं नव्हतं झालं. दोन्ही पक्षकारांनी ऐकमेकांना अगदी जशासतसं उत्तर दिलं होतं. ही दंगल त्यावेळी एवढी पेटली होती की भिवंडीसारख्या गावाची दखल बीबीसीने घेतली होती. त्यावेळी दंगलीचं वृत्त बीबीसीने दाखवलं होतं.

भिवंडीतल्या दंगलीची चौकशी करण्याकरिता मादन कमिशनची स्थापना करण्यात आली होती. त्यात जनसंघाकडून हिंदू पक्षकारांचे वकील म्हणून राम जेठमलानी यांची निवड करण्यात आली होती.

जेठमलानी यांनी मादन कमिशन समोर हिंदू समाजाची बाजू मांडली शिवाय मुस्लिमांकडून ही दंगल कशी प्लॅन केलेली होती. मशिदींमध्ये पेट्रोल ब़ॉम्ब, तलवारी अधीच कसे आणून ठेवण्यात आले होते, शिवाजी महाराज धार्मिक नेता नाही, देशाचा नेता आहे. मुसलमानांकडून याला मुद्दाम धार्मिक रंग दिला गेला होता हे सगळं त्यांच्या पद्धतीने कमिशनसमोर मुद्दे मांडले.

काही ज्येष्ठ वकिलांकडून मिळालेल्या माहितीनुसार मादन कमिशनकडून या दंगलीची चौकशी करुन जो रिपोर्ट तयार करण्यात आला होता त्याचे जवळपास सात खंड होते.

१९७० च्या दंगलीची आग ही १९८४ च्या दंगलीत ही सारखीच होती आणि आजही भिवंडी वरुन शांत दिसत असली तर ज्वालामुखी सारखं हे शहर आतून कायम पेटलेलं असतं.

या बहुचर्चित दंगलीचा खटला जेठमलानी यांनी लढवला होता. आणि हिंदूचे वकील म्हणून १९७१  च्या लोकसभा निवडणुकीचं जनसंघाने तिकीट दिलं होतं की भिवंडीत याचा फायदा होईल. एक्काहत्तर साली मावळ पण भिवंडी लोकसभेचा भाग होता.

श्रीकृष्ण (भाऊसाहेब) धामणकर यांना काँग्रेस पक्षाकडून रिंगणात उतरवण्यात आलं होतं तर जनसंघाकडून राम जेठमलानी तर शेकापकडून धुळप नारायण होते. तिरंगी लढत झालेली बघायला मिळाली होती. जेठमलानींचा प्रचार करण्यासाठी त्यावेळी वाजपेयींचा भिवंडी दौरा झाला होता. दंगलीची प्रकरण ताजं होतं. मात्र तरीही जेठमलानी यांचा पराजय झाला.

अगदी आकडेवारीच द्यायची म्हटली तरी १ लाख ६३ हजार ६८४ मतं ही धामणकरांना मिळाली तर जेठमलांनींना ९७ हजार २०३ इतकी मतं मिळाली होती. जवळपास ६६ हजार मतांनी काँग्रेसचा विजय झाला होता. थोडक्यात कारणमीमांसा करायची झाली  तर, देशात काँग्रेस (आय) रुजली होती, फुलली होती आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा प्रभाव हा जनमानसावर होता.

पण यानंतरही निष्णात कायदेपंडित अशी ओळख असलेले जेठमलानी राजकारणात सुद्धा सक्रीय होते.  त्यांनी भारतीय जनसंघ, नंतर भाजपा आणि राष्ट्रीय जनता दल तसेच त्यांनी स्थापन केलेले पक्ष भारत मुक्ती मोर्चा आणि पवित्र हिंदू कझगम यांच्या माध्यमातून राजकारण केले. परंतु, राजकीय क्षेत्रातील आपल्या प्रवाहाशी विसंगत ठाम भूमिकांमुळे ते नेहमीच चर्चेत राहीले आणि वेळप्रसंगी पक्षशिस्तीच्या कारवायाही ओढवून घेतल्या. त्यावेळच्या जनसंघेतर काँग्रेसविरोधी पक्ष आणि कार्यकर्त्यांची साथ मिळाली असती तर जेठमलानी यांचा भिवंडी लोकसभा मतदारसंघातून विजय शक्य होता असे जुन्या पिढीतील लोक सांगतात.

ही माहिती जुने-जाणकार, भिवंडीतल्या ज्येष्ठ मंडळींकडून घेतली आहे. आता ही मंडळी 90 च्या घरात आहे, शिवाय त्यांच्याकडे उपलब्ध पुरावे देखील आहेत. तरीही या माहितीत काही त्रुटी असण्याची शक्यता आहे.