2011 साली एमए मास कॉम जर्नालिझमचा फायनल रिसर्च प्रोजेक्ट 'विदर्भ में किसान आत्महत्या की समस्या और स्थानीय मीडिया कवरेज' (Vidarbha Farmer suicide Issue) या विषयावर होता. विशेष संदर्भासाठी चंद्रपूर जिल्हा (chandrapur) घेतलेला. त्यावेळी बऱ्यापैकी चंद्रपूर जिल्हा फिरलेलो. जिल्ह्यात ह्या विषयावर काम करत अनेक भयानक गोष्टी समोर आलेल्या. अनेक आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या परिवारांची स्थिती जवळून पाहिली. पात्र-अपात्रतेच्या गर्तेत शासकीय मदत मिळावी म्हणून अडकलेली अनेक उदाहरणं, काही आत्महत्यांची कारणं तर अत्यंत दुर्दैवी. त्या सर्व गोष्टी थिसिसमध्ये आहेत. हे काम करत असताना, खासकरून चंद्रपुरात करत असताना, संशोधक दादाजी खोब्रागडे (Dadaji Khobragade) यांच्या नावाशिवाय शेती, शेतकरी हा विषय पूर्ण होऊ शकत नव्हताच. त्यावेळी भारी मोबाईल वगैरेची वाणवाच. दादाजींचा संपर्क नव्हताच. शोधत-शोधत नांदेडला (त्यांचं छोटंसं गाव) पोहोचलो. ते घरी नव्हते, तालुक्याला गेलेत असं कळलं. तोवर गावात फिरून त्यांच्याविषयी माहिती घेतली. गावातल्या लोकांना विशेष असं अप्रूप नव्हतंच. 


तांदळाच्या एचएमटी धानाची (HMT Rice) जात शोधणारा हा मोठा संशोधक (Indian innovator Dadaji Khobragade). एरवी संशोधक म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एकदम टकाटक संशोधकी पेहराव आणि समोर वेगवेगळ्या रंगाच्या लंबूळक्या बाटल्यांमध्ये फॉस्फरस वगैरे तत्सम गोष्टी घेऊन लॅबमध्ये काम करत असलेला माणूस अशीच छबी यायची. बराच वेळ फिरुन झाल्यावर त्यांच्या घराकडं आलो. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ते आले. सडपातळ बांध्याच्या हा कास्तकारी माणूस. चेहऱ्यावर निर्विकार भाव. एकदम गावठी आज्जा असलेला हा माणूस. मी म्हटलं, 'तुमची माहिती हवीय, असं असं काम करतोय' तर म्हटले 'पत्रकार आहेत काय?' मी म्हटलं, 'होणार आहे, आता विद्यार्थी आहे.' त्या गप्पा जवळपास दोनेक तास झाल्या. या गप्पात त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या ज्या ऑलरेडी मीडियात आलेल्या आहेतच. इथं विमान वगैरे बनविणाऱ्या हाय क्लास वैज्ञानिकांना सरकार कोट्यवधींचं अनुदान देतं. (अर्थात ते द्यायला हवंच) मात्र पोटाशी संबंधित मोठा शोध लावणारा हा माणूस तुकडाभर जमिनीसाठी सरकारी उंबरे झिझवत होता. ते ही सरकारकडून घोषणा झालेली गोष्ट मिळविण्यासाठी. 



केवळ तिसरीपर्यंत शिक्षण झालेलं आणि शेतीही अवघी दीड एकर. घरात गरिबी असताना त्या परिस्थितीपुढे हात न टेकता तांदळाची एक नव्हे तर तब्बल नऊ वाण विकसित करणारे दादाजी खोब्रागडे खऱ्या अर्थाने संशोधक होते. संशोधनासाठी लागणारे अनुकूल वातावरण हाताशी नसताना दादाजींनी 1983 पासून नवे वाण विकसित करायला सुरुवात केली. तब्बल सहा वर्षांनी एक वाण विकसित केले. नाव काय द्यायचे तर, मित्राच्या हाताला बांधलेल्या एचएमटी घड्याळाचे नाव या वाणाला दिले. तिथून या वाणाचा प्रवास जो सुरू झाला तो नऊ वाणांच्या निर्मितीनंतरच थांबला. दादाजींना स्वत:ची तीन एकर शेती मुलाच्या आजारपणात विकावी लागली. आता संशोधन कसे करायचे, असा प्रश्न उभा ठाकला तेव्हा सुनेच्या वडिलांनी दीड एकराचा तुकडा त्यांना दिला. तोच त्यांच्या संशोधनाला शेवटपर्यंत साथ देत राहिला. नंतरच्या दशकात दादाजींचे नाव तांदूळ पीक उत्पादकांच्या वर्तुळात लोकप्रिय झाले. तेव्हा कृषी विद्यापीठाचे लक्ष त्यांच्याकडे गेले आणि या आधुनिक शास्त्रज्ञांनी दादाजींचे वाण अक्षरश: चोरले व सोना एचएमटी नावाने बाजारात आणले. तक्रार करणे, पाठपुरावा करणे हे दादाजींच्या स्वभावात नसल्याने ते गप्प राहिले. पुढे या चोरीचा गवगवा होऊनही शासनाने लक्ष दिले नाही.


 2010 मध्ये फोर्ब्सच्या यादीत त्यांचे नाव झळकले तेव्हा कुठे दादाजी संशोधक असल्याचा साक्षात्कार झाला. मग आपल्या राज्य सरकारने त्यांचा गावात जाऊन गौरव केला. संशोधनासाठी दोन एकर शेती दिली. केवळ स्तुतीने पोट भरत नाही व संशोधनही होत नाही. त्यासाठी आर्थिक मदत देखील पुरवावी लागते. ती मात्र कुणी पुरवली नाही व दादाजी शेवटपर्यंत आर्थिक अडचणींत राहिले. अशाच अवस्थेत त्यांनी शासनाने कृषिभूषण सन्मान देताना दिलेले सुवर्णपदक विकायला काढले तेव्हा ते नकली असल्याचे समोर आले.



एकदा मी जळगावला असताना मला कुणा मित्राचा फोन आलेला. म्हणाला आपण एक कार्यक्रम घेतोय. त्या कार्यक्रमात आपल्याला दादाजी खोब्रागडे गेस्ट म्हणून हवेत. मी दादाजींना फोन केला. त्यांच्या मुलाने उचलला. म्हटलं एक कार्यक्रम आहे, दादाजींना प्रमुख पाहुणे म्हनून बोलावणे आहे. तर तो दादाजी आल्यावर फोन करा,असं म्हटला. पुन्हा फोन केला दादाजी बोलले. त्यांना कार्यक्रमाचं सांगितलं. अडखळत बोलतं होते. त्यांना काहीतरी बोलायचं होतं पण बोलु शकत नव्हते अशी स्थिती होती. त्यांना सांगितलं, की तुमची तिकिटं वगैरे सगळ आयोजक देणार आहेत. कार्यक्रमाचं फायनल करून फोन ठेवला. तर परत वापस फोन केला. त्यांचा मुलगा बोलत होता. म्हणाला, दादा, कार्यक्रम वगैरे ठीक आहे, पण तिथं आल्यावर पैसे वैगेरे मिळतील ना? कारण अनेकदा आम्हाला रिकाम्या हाती यावं लागतं. हे ऐकून त्यांना थोडं विचित्र फील झालं. त्यांना म्हटलं काळजी करू नका, सगळी व्यवस्था आहे. अर्थात तो कार्यक्रम नंतर रद्द झाला. मला वाईट वाटले, मात्र त्यांना फोन केला तर त्यांच्या लक्षातही नव्हते याबाबत. हे सांगायचं कारण असं की, मोठ्या मोठ्या आयोजकांना देखील ह्या वंचित संशोधकाची गरज कळली नव्हती. इथं आज दोन-चार पुस्तकं वाचून भाषणबाजी करणारे लोकं आपापले रेट फिक्स करून बसलेत. मात्र अनुभवाचा खजिना असलेल्या माणसाला आयुष्यभर 'अर्थ'कारणाशी लढा द्यावा लागला. 


शेवटच्या काळात दादाजींना पक्षाघात झाल्यानंतर उपचारांसाठी शेतकऱ्यांनी सहा लाख रुपये गोळा केले. नंतर त्यांना अत्यंत दुर्लक्षित करणाऱ्या सरकारला काहीअंशी जाग आली आणि तत्कालीन फडणवीस सरकारनं गाजावाजा करत दोन लाख रुपये मदत म्हणून दिले. पब्लिसिटीत माहीर असणाऱ्या सरकारच्या या मदतीच्या बातमीमुळे ते अत्यंत आजारी आहेत हे लोकांना कळलं. शेवटी डॉ. अभय बंगांनीही मदतीचा हात पुढे केला. मात्र कष्ट करून थकलेल्या त्यांच्या शरीराने शोधग्राममध्ये 2018 साली आजच्या दिवशी अखेरचा श्वास घेतला. 


शास्त्रज्ञ म्हटलं की सुटबुटात आलेला कुणाशीही न बोलणारा, हातभर केस वाढवलेला, मोठी काळी फ्रेम डोळ्याला लावून एसी हॉलमध्ये तासनतास गप्पा झोडणारा इसम, असा एकंदरीत दृष्टिकोन या साध्या सरळ माणसाने मोडीत काढला. इथं एक पेटंट शोधलं तर सात पिढ्यांच्या जगण्याची व्यवस्था होऊ शकते असे संशोधक देखील आहेत. मात्र गरज ही शोधाची जननी असते या उक्तीप्रमाणे अनेकांच्या पोटाची आग शमविण्यासाठी धानाचे 9 वाण विकसित करूनही दादाजींच्या जगण्याची आयुष्यभर भ्रांत राहिली. एकदा चर्चेत वैद्यकीय अधिकारी डॉ. रेवत कानिंदे यांनी दादाजी दुर्लक्षित राहिल्याची काही कारणे सांगितली होती. एक तर विदर्भासारखा मागास असलेला प्रदेश, दुसरी त्यांची जात. यांच्याशी मी सहमत आहेच. कारण हाच शोध जर एखाद्या मोठ्या शहरातल्या संस्थेत लागला असता तर त्या संशोधकाला भेटण्यासाठी खुद्द प्रधानसेवक घरी गेले असते किंवा त्यांच्याबाबत 'मन की बात' तरी निश्चित केली असती. मात्र दादाजी खोब्रागडे एवढे मोठे संशोधक असूनही आयुष्यभर संघर्षरत राहिले. ज्या गोष्टीवर जगणं अवलंबून आहे अशा गोष्टीचा शोध लावणाऱ्या माणसाला मीडिया देखील एका कॉलममध्ये, स्ट्रीपमध्ये किंवा जास्तच झालं तर 10 मिनिटांची स्टोरी करून जिंदाबाद करत मोकळी होते. दादाजी खोब्रागडे यांना जाऊन आज तीन वर्ष झाली. आज त्यांची आठवण कुठल्याही नेत्याला झाली नाही. झाली असेल तरी काय फायदा आता? महाराष्ट्राचा हा कार्व्हर गेला आपल्यातून. तो ही, वंचित राहूनच. तुम्हाला भेटल्याचे ते दोन चार क्षण माझ्यासाठी आयुष्यभराचा ठेवाय दादाजी. अभिवादन तुमच्या कार्याला आणि व्यक्तित्वाला.