सन 2008, जागतिक आर्थिक मंदीचा काळ, अमेरिकेसारखा बलाढ्य देश आणि तिथली बॅंकिंग व्यवस्था संपूर्णपणे कोसळली होती. भारतातही भीतीचे वातावरण होते, माझ्या व्यवसायाची सुरूवात होऊन काही महिनेच झाले होते. माझा व्यवसाय तसा मनातल्या मनात, पोटात असतानाच आमच्या क्षेत्रातील सर्वच तज्ञ, माझे वरिष्ठ आणि मित्रपरिवार या आर्थिक मंदीच्या भीतीने मला अडवत होते पण मी यांतील बऱ्याच जणांना नाराज करून या वादळात उतरायचे ठरविले.


आमचे जवळजवळ 90% ग्राहक हे बहुराष्ट्रीय कंपन्या असताना, चांगल्या पगाराची मोठ्या कंपनीची नोकरी सोडून, सर्व कल्पना असतानाही आणि परतीचे सर्व दोर कापूनच मी यात उतरल्यामुळे माझ्यासमोर जिंकण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. अतिशय विश्वासाने, संपूर्ण नियोजन करून त्याचे तंतोतंत आणि काटेकोर पालन करत कित्येक संकटांचा सामना करत आजही हे मार्गक्रमण चालूच आहे.

आज हा लेख लिहायचे कारण म्हणजे करोना व्हायरसमुळे संपुर्ण जगावर आलेल्या संकटाने आज आपल्या देशात आणि महाराष्ट्रात धुमाकूळ घालायला सुरूवात केलीये आणि सर्वच जण आकांताने त्याची चर्चा, काळजी आणि त्याचे इतर सर्व परिणामांची चर्चा करताहेत. सर्वात जास्त महत्वाचे काय असेल तर ते म्हणजे माणसांचा जीव, सदृढ शरीर आणि आनंदी मन! आज कित्येक जण कुठेतरी तेच हरवून बसलेत. संकटं ही थांबत नाहीत आज ना ऊद्या ती जातीलच, त्याकामी आपले सरकार, या क्षेत्राशी निगडीत जगभरातील सर्व तज्ञ, शास्त्रज्ञ, डाॅक्टर आणि कर्मचारी मिळून नक्कीच मार्ग काढतील असा मला विश्वास वाटतो.

आता मुळ मुद्द्याकडे वळूया, मागील काही वर्षांपासून भारतात नवउद्योजक आणि तरूण व्यावसायिकांसाठी सरकारने विविध योजना आणल्या आणि आपल्याकडे जणू याची लाटच आली. आर्थिक मंदीच्या या काळात हा कोरोना व्हायरस कित्येकांची सुंदर स्वप्न पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळवतोय की काय आणि यांना वेळीच योग्य दिशा भेटली नाही आली तर या वादळात ही मंडळी हरवूनही जाऊ शकतात.

आजमितीस आंतरराष्ट्रीय व्यापार ठप्प आहे, जागतिक आणि भारतीय शेअर बाजार कोसळतोय, जनजीवन विस्कळीत आणि भयभीत आहे, कोणत्याही वेळी खाजगी ॲाफिसेस आणि कंपन्या बंद होऊ शकतात.

प्रश्नही जीवनमरणाचा आहे पण यांतील काही लघु, मध्यम व्यावसायिक आणि प्रथम पिढीतल्या तरूण नवउद्योजकांपुढे या सर्व प्रश्नांसोबत बॅंकेच्या हप्त्याचे प्रश्न, कामगारांच्या पगाराचा प्रश्न, व्हेंडर/काॅंट्रॅक्टरच्या पैशांचा प्रश्न, सरकारी कर आणि नोटिसांचा खर्च, नवीन ॲार्डरचा प्रश्न, मार्च अखेरीचे द्वंद्व आणि भविष्यात कोणीही मदतीला येणार नाही याची तीव्र जाणीव झोप उडवून जाते.

माझ्या उमेदीच्या 2007-08 काळात जवळजवळ या सर्व समस्या समोर होत्या पण मी एका त्रिसूत्रीचा वापर करत या संकटाचा सामना केला होता. आज नक्कीच बरेच जण याचा वापर करू शकतील.
ती त्रिसूत्री अशी.

1. स्वत:च्या आरोग्याची आणि आरामाची योग्य काळजी.
2. जिंकायचेच या ठाम विश्वासाने संपुर्ण ताकद, बुद्धी, अनुभव पणाला लावुन टिमवर्क करत पुढे जायचे.
3. दररोज Crisis Management करत रहायचे आणि वेळोवेळी सिंहावलोकन करायचे.

भारतात Crisis Management हा प्रकार विनोद आणि “तहान लागल्यावर विहिर खोदू” या तत्वावर चालतो.

त्यामुळे वेळेआधी किंवा वेळेवरही काही करणे म्हणजे मुर्खपणाचे समजले जाते. ते प्रथमत: बदलले पाहिजे.

आता आपण या अशा संकटाकाळी या उद्योजक आणि व्यावसायिक तरूणांनी कसे नियोजन आणि व्यवस्थापन करावे ते पाहूया-
1. आपल्या भारतीय संस्कृतीत पैसे बचत करण्यावर बराच भर असतो ही बचत आपण अडीअडचणीत असतानाच वापरतो. तो अडीअडचणीचा काळ म्हणजे हाच. सर्वात आधी हे पहा की तुमच्याकडे आजमितीस किती पैसे बचतीचे आहेत? त्यातून स्वत:साठी आणि कुटुंबीयांसाठी 6 महिने ते वर्षभराची तजबीज करून ठेवा. ही अशी बचत नसेल तर आजपासून येणाऱ्या पैशामधून या कामी रक्कम बाजूला करा.
2. आता हा विचार करा की जेव्हा तुम्ही व्यवसाय सुरू केला तेंव्हा तुमच्याकडे किती पैसे, संसाधने, कर्मचारी, ग्राहक आणि बाजारातील पत होती? उत्तर 100% नाही असेच येईल, पण तरीही तुम्ही उडी घेतली आणि बरे वाईट अनुभव घेत तग धरून आहेत, हा अनुभव हीच खुप मोठी जमेची बाजू असते, सर्व संकटावर मात करते ते या अनुभवातून मिळालेले लढण्याचे बळ. आता काही वेळ एकांतात घालवा (कोरोनामुळे ही संधी आपोआप मिळालीच आहे) आणि नंतर आपल्या नजिकच्या सहकाऱ्यांसोबत बसून एकदम नवीकोरी, क्रिएटिव्ह योजना तयार करा. ती नेहमीपेक्षा एकदम वेगळी असावी, त्यातही सर्वात महत्वाचे भान ठेवायचे की हे सर्व कमीत कमी खर्चात कसे होईल. याने नक्कीच तुम्हाला नवे बळ आणि शक्ती मिळेल.
3. करोना व्हायरसमुळे प्रवास , मार्केटिंग सर्विस कॉल, वीजबिल, इतर अनेक खर्च यावरही ही बरीच बंधने येतील त्यामुळे तुमचा काही खर्च कमी होऊ शकतो. तो वाचलेला पैसा तुम्ही नवीन पद्धतीने व्यवसाय वाढविण्यासाठी कसा वापरू शकाल याचा विचार करा; जर मनुष्यबळ नाही किंवा इतर अन्य काही कारणामुळे तुम्ही हातावर हात ठेवून बसून राहिलात तर उद्या नक्कीच कपाळावर हात मारायची वेळ येऊ शकते.
4. जी कामे हातात असतील ती लवकरात लवकर कशी पूर्ण करू आणि नवीन कामे नक्की किती येणार आहेत त्याची यादी बनवा त्यातून अंदाजे तुम्हाला किती पैसे येतील हेही कळेल आता ज्या ऑर्डर्स पुढील महिन्यात किंवा त्यानंतरच्या कालावधीत तुम्हाला येणार आहेत आणि आणि त्या कशा लवकरात लवकर तुम्ही घेऊ शकता ते पहा हे करीत असताना उगीचच फार दिवास्वप्न पाहू नयेत. अगदी नेटके आणि खरेखुरे आकडेच पकडावेत त्याने तुम्हाला सत्य परिस्थिती लक्षात येईल आणि तुम्ही कामाचे आणि आर्थिक नियोजनही व्यवस्थित कराल.
5. अशावेळी तुम्ही दुसऱ्या कोणावरही जबाबदारी ढकलून नामानिराळे राहायचा प्रयत्न करू नका नाहीतर अंत ठरलेला आहे हे समजून जा. आणि सर्वात महत्त्वाचे आणि शेवटचे
6. “ एक एक रुपया खर्च करताना तो असा करा की आपल्याकडील तो शेवटचा रुपया आहे” आपण जितकी काटकसर आणि पैशांचे व्यवस्थित नियोजन करू तितके चांगले यश आपणास मिळेल.

माझ्या मते महाकाय कंपन्यासाठी हा जेवढा कठीण काळ आहे त्याच्या उलट लहान आणि नवं उद्योजकांसाठी खूप मोठ्या संधी उपलब्ध करून देणारा आहे.

2008 ला या अशाच वादळातून याच मार्गांनी आमचे जहाज निघालेय. यश-अपयश हा आयुष्याचा भाग आहे न जाणो भारताच्या उद्योग विश्वासाठी ही सुवर्णसंधी ठरेल आणि गुगल, उबेर, ॲपल, टेसला यांच्या तोडीस तोड तीय कंपन्या जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवतील.

आपण या संकटाला न घाबरता काळजीपूर्वक एकजुटीने तोंड दिले तर हे संकटही ही निघून जाईल आणि चौथ्या जागतिक औद्योगिक क्रांतीची ही नांदी आपणास मेहनत आणि परिश्रमाच्या जोरावर प्रथम क्रमांकावर घेऊन जाईलं.

झोपेत असो की जागेपणी स्वप्न ही नेहमी मोठीच पाहिली पाहिजेत आणि मग सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत ती पूर्ण करण्यासाठी कष्ट, कष्ट आणि कष्ट करत राहिले.