लॉकडाऊनने माणसाला पुन्हा एकदा शून्यावर आणून ठेवलं. हिंदी इंडस्ट्रीही याला अपवाद नाही. या इंडस्ट्रीला लॉकडाऊनमुळे भले फार काही फरक पडला नसेल, पण या काळात घडलेल्या घटनांनी या इंडस्ट्रीला आतून पुरतं बदलून टाकलं आहे.


एखादी घटना आपल्या आयुष्यात घडते आणि त्यानंतर आपलं आयुष्य बदलून जातं. आपला प्राधान्यक्रम बदलून जातो. समोर येणाऱ्या कोणत्या माणसांना किती महत्व द्यायचं हे आपण ठरवतो. सामान्य माणसांबद्दल असं झालंच आहे. लॉकडाऊन लागला आणि आता तो अनलॉकही झाला या काळात अनेक लोकांना आपला प्राधान्यक्रम कळला आहे. गरजा समजल्या आहेत. कोण आपलं कोण परकं याचा अंदाज आला आहे. याला हिंदी सिनेसृष्टीही अपवाद नाही. या लॉकडाऊनने हिंदी इंडस्ट्रीला खूप काही शिकवलं आहे. आता तुम्ही म्हणाल, त्यांना काय पडली होती? घर, गाडी, पैसा सगळं तर होतं त्यांच्याकडे. होय. अगदीच होतं. पण या काळात घडलेल्या घडामोडींनी हिंदी इंडस्ट्रीला अगदीच सावध बनवलं आहे. हा अध्याय सुरू होतो सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर. आणि याची प्रचिती आली ती आत्ता अनुराग कश्यप आणि तापसी पन्नूवर झालेल्या आयकर विभागाच्या छापेमारीवेळी.


बुधवारी सकाळपासून बातम्यांचा रतीब सुरू झाला तो तापसी आणि अनुराग यांच्या नावाने. केंद्राच्या अखत्यारीत येणाऱ्या इन्कम टॅक्स विभागाने दोघांच्या घरांवर छापे मारले आणि चौकशी सुरू झाली. या घटनेला 24 तास उलटून गेले मात्र बॉलिवूडमधला एकही मोठा कलाकार यावर बोललेला नाही. नाही म्हणायला अपवाद आहेत पण त्यांनीही प्रतिक्रिया दिलीय ती सावरत सावरत. खरंतर, ही घटना घडल्याचं कळल्यानंतर प्रत्येकाला त्याचा अंदाज आला होताच. आणि नाही म्हणायला, प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न चमकून गेला आहे, की फक्त तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप हे दोघेच का? काहींना याच छापेमारीत आपआपल्या मनात दडलेल्या प्रश्नांची उत्तरंही मिळाली. छापेमारी झाली? कुणावर झाली? अनुराग आणि तापसीवर? हं.. मग बरोबर आहे. असा काहींचा दृष्टिकोन आहे.


तापसी पंन्नू आणि अनुराग कश्यप यांच्या घरावर धाडी टाकणे हा कामाचा भाग आहे असं संबंधित अधिकारी सांगताना दिसतायत. तसा तो असेलही. कारण, कुणावर छापा टाकायचा.. कधी टाकायचा.. आणि कितीवेळ तो ठेवू द्यायचा हे सगळं ती यंत्रणा ठरवते. ते त्यांच्या जागी बरोबर असेलही. तरी प्रश्न उरतोच. फक्त तापसी आणि अनुराग का? आपल्याकडे एका सिनेमासाठी 100 कोटींवर मानधन घेणारे चिक्कार कलाकार आहेत. केवळ मानधन नव्हे, तर विविध कंपन्यांत पैसे गुंतवून ते भागीदारही झाले आहेत. अर्थात या दिसणाऱ्या गोष्टी झाल्या सगळा देश लॉकडाऊनमुळे आर्थिक मेटाकुटीला आला असताना, श्रीमंत कलाकारांच्या जागतिक क्रमवारीत पहिल्या वीस लोकांत येणारे कलाकारही आहेतच आपल्याकडे. कोण चूक कोण बरोबर हा मुद्दा इथे नाही. पण अशावेळी छापा मारायचा तर अशा मोठ्या माशांवर मारता आला असताच. पण वर्षातून एखाद दोन सिनेमे करणारी अभिनेत्री. त्यातही तिने केलेले बहुतांश चित्रपट वास्तव जगण्याच्या जवळ जाणारे असतात. अशी अभिनेत्री छापेमारीसाठी निवडली जाते, आणि दुसरा दिग्दर्शक एक असा दिग्दर्शक असतो जो नव्या नव्या लोकांना आपल्या चित्रपटातून संधी देत असतो. आपली मतं धडाडीने मांडत असतो. पण तोही करताना वर्षाला पाच सिनेमे करत नाही. त्याचे चित्रपटही असेच जगणं उलगडून दाखवणारे. आयकर विभागाला याच दोन कलाकारांची 'टीप' कशी काय मिळाली असेल? असो मिळाली तर मिळाली. हरकत नाही. या वरच्या काही ओळींमध्ये ज्याला आपण बिटविन द लाईन्स म्हणतो, ते ठासून भरलं असू शकतं. ते न वाचत्या येण्याइतपत आपण किंवा बॉलिवूड अडाणी नाही. पूर्वी ही थेट बोलूनही दाखवलं जात होतं. पण आता मात्र हिंदी इंडस्ट्री फारसं बोलत नाही. तापसी आणि अनुरागच्या घरांवर छापा टाकून 24 तास उलटून गेले, तरी हिंदीतले कोणीच कलाकार यावर बोलत नसताना दिसतात. अपवाद केवळ अनुभव सिन्हा आणि अभिनेत्री स्वरा भास्करचा. या दोघांनीही आपल्या ट्विटमध्ये तापसी आणि अनुराग हे धरोदात्त असल्याचं म्हटलं आहे. अनुभव सिन्हा यांनी आपल्याल हे दोघेही प्रिय असल्याचं म्हटलं आहे. तरी कुणीही कसलेही प्रश्न विचारलेले नाहीत. ना कोणा गोष्टीबद्दल शंका विचारली आहे. स्वरा आणि अनुभव सिन्हा यांचा अपवाद वगळला तर इतर कोणीही कलाकार यावर बोललेला नाही.


सर्वसाधारणपणे हिंदी इंडस्ट्री कधीच अशी भरभरून बोललेली नाही. पण तापसी आणि अनुरागने वास्तवदर्शी चित्रपट केले असले तरी बऱ्याच ए लिस्टर कलाकारांसोबत त्यांनी कामं केली आहेत. ते कलाकारही यावेळी गप्प आहेत. या छापेमारीबद्दल बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या कलाकारांच्या पीआर टीम्सना विचारलं, तर संबंधित कलाकार यावर काहीच बोलणार नसल्याचं सांगितलं जातं. काही मंडळी आपला कलाकार जरूर बोलेल असं सांगतात पण, कनेक्ट होत नसल्याचं कारण पुढे केलं जातं. हे होतं आहे आणि यापुढेही होत राहणार आहे. याची सुरूवात झाली ती सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर. 14 जूननंतर सगळ्या गोष्टी बदलू लागल्या. सुरूवातीला हे प्रकरण इतकं वाढेल असं वाटलं नव्हतं. पण त्यात हळूहळू अंमली पदार्थांचा मुद्दा आला आणि मग कलाकारांची पाचावर धारण बसू लागली. त्याआधी नेपोटिझमचा मुद्दा ऐरणीवर आला होताच. नेपोटिझमचा खांदा पकडून नव्या कलाकांवर कशी दहशत माजवली जाते असंही सांगण्यात आलं. यात अनेक बडे निर्माते आले. कलाकार आले. तिथून हा सगळा प्रकार पार अंमली पदार्थांपर्यंत गेला. सुशांतसिंह राजपूत प्रकरण केंद्राने हातात घेतल्यावर मात्र प्रकरण जोरात तापलं. अर्थात मग कंगना रनौतने ट्विटरवरून बॉलिवूडचा केलेला उद्धार.. अनेक ए लिस्टर कलाकारांवर केलेले आरोप.. यामुळे बॉलिवूड खरंतर भंडावून गेलं होतं. त्यावेळीही यापैकी कुणीच काही बोललं नव्हतं. त्यावेळी हिंदी इंडस्ट्रीने स्वत:च्या तोंडावर बसवून घेतलेली दातखीळ अजूनही सुटलेली नाही. कारण, ती दातखीळ सुटून आपण काही बोललो तर आपण उगाच 'नजरेत' येऊ ही भीती अनेकांना वाटते. तर अनेकांची तोंडं नार्कोटिक्स ब्युरोच्या छापेमारीवेळी कायमची बंद झाल्याचंही कळतं. अर्थात यावर थेट आणि उघड कोणीच बोलत नाहीय. उद्या आपण काहीही बोललो तर आयटी, ईडी, नार्कोटिक्स नाहीतर आणखी काहीतरी.. असं बालंट आपल्या अंगावर नक्की सोडलं जाईल असं इंडस्ट्रीला खात्रीने वाटू लागलं आहे. इथे एक गोष्ट सगळ्यात महत्वाची ती अशी, की हिंदी इंडस्ट्रीतला प्रत्येकजण चार पैसे जास्त खर्च करेल पण आपली इज्जत आणि नाव कसं टिकून राहील हे पाहात असतो. आणि नेमकी हीच बाब प्रत्येकाला कळून चुकली आहे.


सर्वात महत्वाचं हे कमी म्हणून की काय, पण केंद्राच्या अखत्यारित येणाऱ्या यंत्रणेने उचललेलं एखादं पाऊल आपल्याला आवडलं नाही म्हणून आपण जर सोशल मीडियावर काही बोललो तर नको त्या भलत्यांच्या नजरेत येऊच. शिवाय, या सगळ्यांच्या वर बसलेली कंगना रनौतच्या शब्दबंबाळ ट्विटच्या जाळ्यात आपण विनाकारण येऊ अशी भीतीही अनेकांना वाटते. पण सुशांत प्रकरणानंतर आता हिंदी इंडस्ट्री बरीच शहाणी झाली आहे. आता अनलॉक झाल्यावर कलाकार आपआपल्या कामाला लागले आहेत. पण केंद्रातले कोणतेही विषय असोत, अगदी पेट्रोलचे वाढलेले दर असोत किंवा शेतकरी आंदोलन असो.. अगदी गेल्या वर्षीपर्यंत सरकारी धोरणांवर, निर्णयांवर टीका करणारे.. आता खूप कमी झाले आहेत. कारण, यात कुणाला पडायचंच नाही. इथे प्रत्येकाला काम करायचं आहे. ते काम वगळून इतर गोष्टी करत राहिलो तर त्यात वेळ तर फार जातोच शिवाय, निष्कारण मनस्ताप सहन करावा लागतो अशी काहीशी मानसिकता कलाकारांची झाली आहे. ही अवस्था जरी गेल्या वर्षी झाली असली तर ती पुढचे काही वर्षं तशीच असणार आहे.


आता खूप गोष्टी बदलून गेल्या आहेत. या लॉकडाऊनमध्ये घडलेल्या घटनांमुळे हिंदी इंडस्ट्रीतल्या प्रत्येक कलाकाराला बदलून टाकलं आहे. याच सर्व कलाकारांची मिळून मनोरंजनसृष्टी होते. या कलाकारांचीच मानसिकता बदलल्यामुळे मनोरंजनसृष्टीही बाहेरून तशी नेहमीप्रमाणे भासत असली तरी ती आतून पूर्णत: बदलली आहे. साहजिकच मनोरंजन पत्रकारिता जी 2020 च्या मार्चपर्यंत प्रतिक्रियांवर बेतलेली होती ती आता 2021 पासूनही बदललेली असेल.