BLOG : ... हे आहे एकविसावं शतक. मुलींची गगनभरारी, बोर्डात टॉप करणाऱ्या मुली, प्रत्येक क्षेत्रात आपल्या मेहनतीने ठसा उमटवणाऱ्या मुली, महिलावर्ग, घर, ऑफिस सांभाळून संसाराचा गाडा हाकणारी इतकंच काय तर देशाचं नेतृत्व करण्यातही महिला आघाडीवर, माळरानावर कष्टाने नंदनवन फुलवणारी अशिक्षित महिला, कोरोनाने कुंकू पुसल्यानंतर पतीचाच व्यवसाय, कामधंदा सुरु करणारी होतकरु महिला.. अशी किती उदाहरणं द्यायची?  न्यूज चॅनेलवर तर आम्ही या गौरवगाथा दाखवतोच. ज्याठिकाणी वीजपुरवठा सुरळीत नाही, त्याही ठिकाणी वर्तमानपत्रातून या बातम्या सर्रासपणे तळागाळापर्यंत पोहोचतातच. सांगण्याचा अर्थ इतकाच, की अशी कोणतीही बातमी, घडामोड, गौरवगाथा नाही जी सामान्यांपर्यंत पोहोचत नाही. 


मग, इतकं सर्व काही असूनही आजही मुलगी नकुशीच का? आजही आपल्या समाजात मुलींना मनापासून स्वीकारलं का जात नाही? काही कुटुंबामध्ये मुलीच्या जन्मानंतर तिला लक्ष्मीच्या पावलांनी घरात आणलं जातं. तर काही ठिकाणी सैतान महिन्याभराच्या बाळाच्या हातावर चटके देतात. गेल्या 3-4 दिवसात घडलेल्या किंबहुना आता उघडकीस आलेल्या घटना मन सुन्न करतायत.  विचार करायला भाग पाडतायत की समानता आहे कुठे?


पुरुषाला बापाचा दर्जा ही बाईच मिळवून देते. मात्र त्याच बापाला आपली लेक नकुशी का होते? बारामतीत घडलेल्या घटनेनं तळपायाची आग मस्तकात जाते. अशिक्षितपणा, भोंदूपणा आपल्या समाजात आजही कितीही खोलवर रुजलाय, याची प्रचिती बारामतीत घडलेल्या प्रकारानंतर येते. तुझी बायको सैतान आहे, असं एक मांत्रिक सांगतो आणि नवरा त्यावर विश्वास ठेवतो. बायकोची अब्रू वेशीवर टांगतो, अघोरी कृत्य करतो आणि तिचा बळी देण्याचा प्रयत्नही करतो. यात सासरचे सैतानही साथ देतात. दुर्दैव म्हणजे यात मुलासोबत मुलीलाही जन्म देणारी सासू आणि बाई माणूस म्हणून घेण्याची लायकी नसलेली नणंदही दुसऱ्याच्या घरातून आलेल्या मुलीचा छळ करतात. सूनेला मुलगी होते, सासरच्यांना मुलगा हवा असतो, दिवा हवा पण पणती नको, याच मानसिकतेतून बुद्धी गहाण ठेवून, सुनेला पांढऱ्या पायाची म्हणत अघोरी पावलं उचणाऱ्यांची आपल्या समाजात काही कमी नाही. 


महिला अत्याचाराच्या घटना रोज घडतायत. कधी घरातूनच छळ तर कधी उपभोगाची वस्तू समजत होणारे बलात्कार. औरंगाबादमध्ये एका गावातल्या वस्तीवर दरोडेखोरांनी हल्ला केला. लूटमार तर केलीच मात्र त्यासोबतच पोटापाण्याच्या शोधात परराज्यातून आपल्या महाराष्ट्रात आलेल्या 2 महिलांवर सामूहिक बलात्कारही केला. एका महिलेच्या अवघ्या काही महिन्यांच्या बाळाच्या हाताला चटकेही दिले. नपुंसक हल्लेखोरांनी आपलं तथाकथित पुरुषत्व गाजवलं. आजही आपल्या महाराष्ट्रातल्या गावाखेड्यातलं हे भयाण वास्तव आहे की महिलांकडे फक्त उपभोगाच्या वस्तू म्हणूनच पाहिल्या जातं. आणि आपला समाजही अत्याचार झालेल्य़ा महिलेलाच मान खाली घालून आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतो, हे नग्न सत्य आहे. 


समाज बदलतोय, बदललाय असं आपण शहरी भागातल्या मुली, महिला जरी समजत असलो तरी काही वेडंवाकडं घडल्यास दोष हिचाच आहे, हे बोलणाऱ्या समाजाची मानसिकता कधीही बदलणारी नाही. एक गोष्ट मात्र नक्की की, समाज हा बाईपासूनच आहे. तिने स्वतःला संयमी, शांत, दोन पावलं मागे ठेवणारी म्हणून स्वतःला घडवलंय किंबहुना तिला घडवलं गेलंय. मात्र तिच्या याच स्वभावाचा गैरफायदा उचलला जातोय. कधी कौटुंबिक हिंसाचार करुन तर कधी तिच्यावर बळजबरी करुन तिची मुस्कटदाबी केली जातेय. कधी मानसिक त्रास देवून तर कधी अपेक्षांचं ओझं लादून तिला दाबलं जातंय. पुरुष आणि महिलेची बरोबरची ही कधीच होऊ शकत नाही. तिच्यातला संयमीपणा, घर, ऑफीस, मुलाबाळांचा जन्म, त्यांचं शिक्षण, व्यवहारीपणा, घरातल्या म्हाताऱ्या कोताऱ्यांचं आजारपण सांभाळणं, अशिक्षित असूनही मुलांचं चांगलं संगोपन करणं आणि त्यात. महिन्याच्या त्या दिवसात होणारा शारिरीक आणि मानसिक त्रास.. याची बरोबरी पुरुष कधीच करु शकत नाही. तिने तिच्यातलं कतृत्व पदोपदी सिद्ध केलंय आता वेळ आहे ती समानतेच्या बाता मारणाऱ्या समाजाची..  माणसांचा हा समाज बाईला जनावर समजत असेल, समाजाच्या डोळ्यादेखत काही विपरीत घडत असेल आणि तरीही समाज बंद डोळ्याने वावरत असेल तर हा समाजच नपुंसक आहे. तिला तिच्या मर्यादा चांगल्याच ठाऊक आहेत. सर्व बंधनं झुगारुन ती आकाशात स्वच्छंद भरारी घेऊ शकते.. मात्र तिला चांगलंच ठाऊक आहे.. की तिने जर असं केलं तर तिच्यात आणि पुरुषात फरक तो काय?