Buldhana Accident : सकाळी विदर्भ ट्रॅव्हल्सचा अपघात झाल्याची बातमी (Buldhana Accident) पाहून आईचा फोन आला. ती जरा घाबरलेलीच होती. आपली लेकरं याच गाडीने मागील 8 वर्ष प्रवास करत आहेत, सुदैवानं आपल्यासोबत एवढे वर्ष असं काही घडलं नाही, असं तिच्या थरथरत्या आवाजातून जाणवत होतं. पण भविष्यात असं आपल्यासोबतही घडू शकतं, याची भीतीदेखील तिच्या बोलण्यात जाणवली. खरंतर याच बसने आम्ही गावातले सगळेच प्रवास करतो. गावातून पुण्यात यायचं म्हटलं की या बस शिवाय कोणताही पर्याय उपलब्ध नाही. ट्रेनची मागणी मागील तीन वर्षांपासून करत आहोत. मात्र ती पूर्ण झाली नाही. आज हा अपघात पाहून माझ्या आई-वडिलांची जी परिस्थिती झाली तीच परिस्थिती याच बसने प्रवास करणाऱ्या मुलांच्या अनेक पालकांची झाली असावी. तेवढ्यातच एका जवळच्या मित्राचा फोन आला. 'गावी जाताना नीट जात जा गं पोरे किंवा मग ट्रेनने जात जा', ही त्याची वाक्य होती. त्यावरुन या स्लीपर कोच बस कधी धावती शवपेटी होईल याचा काही नेम नाही, असा विचार आला.


दिवसभर याच अपघाताच्या बातम्या केल्या. सरकारची मदत, विरोधकांच्या टीका, समृद्धी महामार्गाची रचना, अनेक कुटुंबियांचे हंबरडे आणि माझ्यासारख्याच स्वप्नांचा पाठलाग करत येणाऱ्या तरुणांच्या दुर्दैवी अंताच्या बातम्या करताना अनेकदा हात थरथरले. त्यांच्या कुटुंबियांचा हंबरडा पाहून काळजाचे ठोके चुकले. त्यावेळी घरातील एखादं व्यक्ती प्रवासासाठी निघत असताना कुटुंबियांची काय अवस्था असू शकते, हे कळलं.


दर तीन ते चार महिन्यांनी संध्याकाळच्या बसने मी चंद्रपूर गाठते. हा प्रवास 16 ते 18 तासांचा असतो. स्वत:च तिकीट काढायचं. कितीही उशिराची बस असली तरी गावाची ओढ असल्याने एकटं संगमवाडीत थांबायचं आणि थेट वरोरा आलं की उठायचं हा परत जातानाचा कार्यक्रम असतो. मात्र गावाहून पुण्यात येताना सगळ्यांची काळजी पाहून धस्स होतं. माझ्याच घरात झालेला एक किस्सा सांगते, लेक पुण्याला जाणार म्हणून सकाळपासूनच तयारी सुरु होते. खाण्याचे पदार्थ, बॅग भरणं, बाहेरुन सामान आणणं आणि यानंतर कधी मोर्चा गावाला वळणार याची विचारपूस होणं, हे कायमचं आहे. त्यात एकदा डब्बा बनवत असताना मावशी आणि आईचं संभाषण कानावर पडलं. 'या पोरांचे शाळेचे डब्बे देताना काही वाटायचं नाही कारण तो डब्बा काहीही झालं तरी संध्याकाळी खरकटा परत यायचा. मात्र आता हा डब्बा एक दोन महिन्यांनीच परत येतो', हे ऐकून डोळ्यात पाणी आलं. परत येताना डब्बा देत असताना आईचा हात आणि वडिलांचे डोळे का कापतात?, हे आज झालेल्या अपघातानंतर कळलं. त्यांना या प्रवासाची भीती वाटते. प्रवासात अघटीत काही घडलं तर... याची धास्ती असते, हे कळलं.


माझ्यासारखेच पुण्यात कामाचं स्वप्न पाहून आज अपघातात मृत पावलेले तेजस, संजीवनी आणि अवंती निघाले होते. त्यांच्याही कुटुंबियांनी त्यांना खायला डबा दिला असेलच. परत कधी येणार, नीट जा, गाडी खाली उतरल्यावर लक्ष ठेव, अधेमध्ये फोन करत राहा आणि नीट काम कर अशा अनेक सूचना आणि प्रश्न विचारले असतील. मात्र या तिघांच्याही स्वप्नांचा असा चुराडा होईल आणि त्यांच्या आयुष्याची अशी राखरांगोळी होईल, असा विचारही आला नसेल. घरातील हसते, खेळते, स्वप्न जगणाऱ्या लेकरांचे असे मृतदेह घरी येतील, असं त्यांना कधीच वाटलं नसावं. वर्ध्याच्या तेजसच्या आईचा व्हिडीओ तर डोळ्यात पाणी आणणारा आहे. माझा तेजस जाऊच शकत नाही, अशा शब्दांत आई टाहो फोडताना दिसत आहे. 


'प्रत्येक गावात थांबत असल्याने महाग असली तरी सोयीची'


विदर्भ ट्रॅव्हल्स किंवा या स्लीपर कोच ट्रॅव्हल्स तीन ते चार गावातून पुण्यासाठी रवाना होतात. विदर्भातून पुण्यात यायचं म्हटलं तर फार ट्रेन उपलब्ध नसल्याने अनेक प्रवासी हाच पर्याय निवडतात. नागपूर, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ या चार शहरातून ही बस निघते. मात्र त्या शहरांच्या दरम्यान असलेल्या प्रत्येक गावात ही बस थांबते. त्या गावातील प्रवाशांना ही बस जास्त सोयीची पडते. त्यामुळे कितीही महाग तिकीट असलं तर अनेक लोक याच बसने प्रवास करतात. 


अपघाताला जबाबदार कोण?


अपघातावरुन राजकारण झालं. त्यानंतर अनेकांनी समृद्धी मगामार्गाच्या रचनेवर टीका केली, रोड एक्सपर्टचे सल्ले घेतले गेले, कुटुंबियांना मदत जाहीर करण्यात आली, केंद्र आणि राज्य सरकारकडून चौकशीचे आदेश दिले. हे सगळं केलं तरीही मात्र या अपघाताला जबाबदार कोण?, हा प्रश्न निरुत्तरीतच राहतो.


'चंद्रपूर मार्गावर एकच ट्रेन, त्यामुळे बसने प्रवास'


तीन ते चार वर्षांपूर्वी तत्कालीन गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी पुणे ते काजीपेट ट्रेनला चंद्रपूर आणि काही गावांमध्ये थांबे मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यानंतर काही गावांमध्ये ट्रेनला थांबे मिळाले. मात्र ही ट्रेन आठवड्यातून एकदाच असते. दर शुक्रवारी पुण्यातून निघते तर रविवारी चंद्रपूरकडून पुण्यात येते. एकच दिवस ट्रेन असल्याने अनेक नागरिकांना परिणामी बसचा एकमेव पर्याय उरतो. मागील काही वर्षांपासून ट्रेन किमान आठवड्यातून दोन वेळा असावी, अशी मागणी विदर्भातील विद्यार्थ्यांकडून आणि नागरिकांकडून केली जात आहे. मात्र या मागणीला अजूनही यश आलं नाही आहे. त्यामुळे बसने प्रवास करण्याशिवाय पर्याय नाही त्यातच बसचे असे अपघात होत असेल तर अजून किती जीव जातील हे सांगता येत नाही. 


बस मालकांचे खिसे गरम मात्र प्रवाशांची जबाबदारी कोणाची?


नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ किंवा वर्धा या चार शहरातून या बस पुण्यात येतात. त्यात या बसचं तिकीट सामान्यांच्या खिशाला पडरवडणारं नसतं. प्रत्येकी किमान 1400 ते 1800 च्या दरम्यान तिकीट असतं. त्यात दिवाळी किंवा सणासुदीचे दिवस असले की तिकिटाचे हे दर दुपटीने वाढतात. मात्र प्रवासासाठी पर्याय नसल्याने दुप्पट दर देऊन प्रवास करतात. यात सगळ्या स्लीपर कोच मालकांचे खिसे गरम होतात. रात्रभराचा हा प्रवास असतो. त्यात बसमध्ये अनेकदा AC मध्येच बंद केले जातात. त्यामुळे प्रवासी अनेकदा तक्रारी करतात किंवा अनेकदा रस्त्यातच बस बंद पडते त्यानंतर दुसरी बस बोलवून त्याने प्रवाशांना पुढे पाठवण्यात येतं. बसची स्थिती आणि योग्य देखभाल केली जात नाही शिवाय प्रवाशांना बसमध्ये बसताना अनेकदा आपत्कालीन खिडकी किंवा आग विझवणारी यंत्रणा कुठे आहे? ती कशी वापरावी?, याची माहिती दिली जात नाही. त्यामुळे जर रस्त्यात असा अपघात झाला तर प्रवाशी गुदमरुन दगावतात आणि परिणामी अनेकांचं हसती, खेळती घरं उद्ध्वस्त होतात.