BLOG : मागच्या ब्लॉगमध्ये सांगितल्या प्रमाणे विनाद सर आणि मी बाईकवरुन नाशिक ते जळगाव असा 240 किमीचा प्रवास करुन जळगावात दाखल झालो. इतर सहकारी मागून येत होते आणि तोवर आम्ही निवांत बेडवर पडून हॉटेलमध्ये जेवताना जे काही झालं ते आठवून दोघेही हसत होतो. संध्याकाळी 6 वाजता इतर सहकारी देखील पोहोचले. आम्ही पोहोचलो आहोत हे सांगण्यासाठी आम्ही चंद्रशेखर नेवे सरांना फोन केला. नेवे सर आमचे स्थानिक प्रतिनिधी. ते फोनवर म्हणाले. "रात्री जेवायला भेटू, मस्त भरीत खायला घालतो.". आमचं एक ठरलेलं असायचं, ज्या जिल्ह्यात जायचं तिथलं खायचं. 


रात्री 9 वाजता आम्ही एका भरीत सेंटरमध्ये पोहोचलोय ज्वारीची भाकरी, भरीत, शेवभाजी आणि अळूवडी हे पदार्थ मागवले आणि सर्वांनी ताव मारला. आयुष्यात पहिल्यांदा मी व्हेज मन लावून खात होतो. जळगावचं भरीत मनात घर करुन गेलं आणि अळूवडीनं तर जीभेवरच राडा केला. त्यात नेवे सरांनी आमच्यासाठी खास मठ्ठा आणला होता. आता मठ्ठा म्हणजे ताकाचाच प्रकार असतो फक्त यात मीर्ची, कोथिंबीर वापरली असते. आजवर असा मठ्ठा कुठेच प्यायलो नाही, हे माझंच नाही, साऱ्यांचं मत आहे. जेवण उरकलं आणि थेट हॉटेलवर पोहोचलो. कधी नव्हे ते त्यादिवशी आम्ही गप्पा मारत बसलो आणि झोपायला 2.30 वाजले. सकाळी स्मिता वाघ यांच्यासोबत मुलाखत होती. 


दुसऱ्या दिवशी हॉटेलवर नाश्ता केला आणि स्मिता वाघ यांच्या निवासस्थानी पोहोचलो. उन्मेष पाटील मुंबईत संजय राऊतांना भेटायला आले होते, पण ठाकरे गटात जाणार की नाही यावर स्पष्टता नव्हती. त्यामुळे मुलाखतीत प्रश्न नेमका विचारायचा कसा, हाच प्रश्न आम्हाला पडला होता. मुलाखत शूट होते, ती आम्ही मुंबईला पाठवतो, त्यानंतर ती एडीट होऊन चॅनलवर लोकांना दिसते. या प्रोसेसला वेळ लागतो. हे सगळं करेपर्यंत इथं राजकारणात सत्तापालट होऊ शकतो, त्यामुळे कधीकधी खूप कठीण असतं काम करणं. आता इथंही तेच घडलं, वाघ म्हणत होत्या उन्मेष भावा सारखा आहे. कुठेही जाणार नाही.. वगैरे-वगैरे पण इथे मुलाखत चॅनलवर दिसेपर्यंत उन्मेष भाऊंनी बाजीच पलटवली. उन्मेष पाटलांनी भाजप सोडल्याचा फटका जितका भाजपला बसला नसेल तितका आमच्या एपिसोडला बसला. पण असो काय करणार? आमच्या हातात असतं, तर दोन दिवसांनी बंड करा असं मी नक्कीच त्यांना सांगितलं असतं. 


ही मुलाखत आटपून आम्ही लोकांचे बाईट्स घेतले. शिर्डीप्रमाणे इथे सुद्धा आमच्यामुळे लोकांमध्ये मारामारी होते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण वेळेत गुंडाळलं आणि थेट रावेर लोकसभा मतदार संघाकडे निघालो. रावेरला जाताना आम्ही सगळे कारमध्ये आणि रियाज चाचांसह नेवे सर बाईकवर होते. सरांनी चार वेळा तरी विचारं कारमध्ये जागा नाही का? पण जळगावचं ऊन पाहून कुणी उतरायलाच तयार नाही. 43 डिग्रीच्या उन्हात नेवे सर बाईकवर होते आणि आम्ही कारमध्ये. खरंच वाईट वाटलं. आमची चूकच झाली. आम्ही कुणी तरी त्यांना कारमध्ये जागा द्यायला हवी होती. हा किस्सा मी ब्लॉगमधून सहज वगळला असता पण मनाला ते पटत नव्हतं. मी माती खाल्ली, हे सगळ्यांना समजलं पाहिजे. पुढच्या वेळेस अशी चूक करणार नाही. 


रावेरला रक्षा खडसे पक्षाच्या मेळाव्यात होत्या. मेळावा झाला होत आणि सगळे जेवणाच्या पंगतीत होते. स्वतः रक्षा खडसेंनी सुद्धा कार्यकर्त्यांसोबत जेवण केलं. त्यांनी दुरून आम्हाला सुद्धा हात करुन जेवायला बोलावलं होतं..प्रचंड भूक होती पण अतीप्रचंड उन्हामुळे आमची इच्छेचं निधन झालं होतं. अर्ध्यातासात रक्षा खडसेंसह मुलाखत सुरु झाली. रक्षाताईंच्या कार्यकर्त्यांना त्यांची फार काळजी...मुलाखत बाईकवर आहे कळताच असा रुट शोधला की डोक्यावर झाडं आणि त्यामुळे रस्त्यावर थोड्या प्रमाणात सावली होती. मुलाखत करता करता आम्ही चुकून मिलिट्रीची प्रॉपर्टी ट्रेसपास केली. चूक लक्षात येताच सुधारली आणि मुलाखत सुद्धा वाईंडअप केली. तिथून आम्ही पुढे निघालो...थोडं जेवलो आणि थेट भुसावळला लोकांचे बाईट्स घ्यायला पोहोचलो.


पोहोताच क्षणी कोरोनाची आठवण झाली. रस्त्यावर एक पाखरु सुद्धा नव्हतं. आता करायचं काय तर म्हटलं सर्वात आधी सावली शोधून आडोसा घेऊ. बाकी करु मॅनेज. चंद्रशेखर सरांनी एक-एक करत माणसं जमवायला सुरुवात केली. जिथे एकही माणूस नव्हता तिथे आता 15 - 20 लोकं जमा झाली. सगळ्या अपेक्षा सोडल्या होत्या पण सोनं झालं. आलेले सर्व जण विविधं पक्षांचे कार्यकर्ते होते. आता एपिसोडमध्ये हे नॅच्युरल वाटावं म्हणून एक सीन तयार केला. माझ्यासमोरच एक लग्नाचा कार्यक्रम होत होता. कॅमेरामॅन रोल म्हणाला आणि मी सुरु केलं, "आम्ही इथे लग्न समारंभात आलो होतो, तिथे आम्हाला सर्व पक्षांचे कार्यकर्ते भेटले. इतर वेळी टीका करणारे एकाच पंगतीत जेवायला बसले होते." हे वाक्य ऐकताच सगळे कार्यकर्ते तुफान हसले. मला ही बरं वाटलं, पंच योग्य बसलाय. आम्ही हे चीट केलं, पण ते अनेकांना कळलं नसेल, पण काहींना हे कळलं असेल तर ते मनातल्या मनात म्हणाले ही असतील, "काय मूर्ख बनवातायत.." पण असो...


आम्हाला प्रचंड गरम झालं होतं. मनसेच्या शहराध्यक्षांनी लस्सी मागवली आणि जबरदस्तीने आम्हाला पाजली. त्या जबरदस्तीत आपुलकी होती. जळगावमध्ये आमचं काम संपन्न झालं. चंद्रशेखर सरांसह एक फोटो घेतला आणि त्यांच्यासह जळगावचा निरोप घेतला. संध्याकाळी 6 वाजता आम्ही जळगाव सोडलं. पुढचा स्टॉप होता, छत्रपती संभाजीनगर. 


भुसावळ सोडल्यानंतर जामनेरला आम्ही चहासाठी थांबलो. बाईकमध्ये पेट्रोलही ही भरायचं होतं. तुफान भूक लागली होती पण खाण्यासाठी काहीच नव्हतं. एक चहा घेतला आणि एक क्रीमरोल. UPI ला आलेला झटका पाठ सोडत नव्हता. इथेही पेमेंट होईना. ना विनोद सरांचं, ना माझं. तिथे बाईकमध्ये पेट्रेल भरलं, तर तिथे सिद्धेशचंही पेमेंट अडकलं. अनेक प्रयत्नानंतर कसंबसं पेमेंट झालं आणि आम्ही निघालो. मी पुढे जाताच पाठून आवाज आला..."ओ दादा...थांबा" मी मागे वळलो, तर चहावाला बोलवत होता. मी मनात म्हटलं, साला पैसे तर दिले मी.


दुकानावर पोहोचल्यावर दुकानाचा मालक उठला, "तुम्ही ABP Majha वाले ना. कार्यक्रम बघतो आम्ही. चॅनलही तेच पाहतो. चांगलं सुरु आहे..." हे म्हणता-म्हणता त्याने माझ्यासाठी एक खुर्ची आणली. मी त्याच्या कौतुकाचा स्वीकार केला आणि त्याच्यासह 5 मिनिटं गप्पा मारल्या. मुळात ही ओळख आमची नसून आमच्यासह असलेल्या बाईकची होती. बाईक होती म्हणून आम्ही होतो. 


जामनेरनंतर विनोद सरांनी बाईक घेतली आणि मी त्यांच्या शेजारी बसलो. अंधार, खराब रस्ता आणि रस्त्यावरची धूळ तुडवत आम्ही संभाजीनगरमध्ये एन्ट्री केली. आम्हाला रस्त्यात अब्दुल सत्तारांचा मतदारसंघ लागला. त्यांनी खरंच त्यांच्या मतदारसंघात लक्ष द्यायला हवं, हे पाहोताच क्षणी वाटलं. सिल्लोडमध्येही रस्त्यात एकाने आमची बाईक थांबवली. त्याला सेल्फी हवा होता. अर्थात बाईकसोबत. पण थेट कसं बोलणार ना, म्हणून भावानं पहिला सेल्फी आमच्यासह घेतला आणि दुसरा बाईकसह. सत्तारांनी या पठ्ठ्याला शोधून राजकारणीची संधी द्यायला हवी. गोड बोलून कार्यक्रम करेल. 


रात्री 10 वाजताच्या दरम्यान आम्ही फुलंब्रीला जेवायला थांबलो. मी जाम थकलो होतो, बाईकवर बसून डुलक्या देत होतो आणि ते रिस्की होतं. दिपेशला म्हटलं की, भावा तु बस बाईकवर मी जातो कारमध्ये, तो ही एका फटक्यात तयार झाला. 


संभाजीनगरमध्ये राहण्याचं हॉटेल आधीच बूक केलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी संभाजीनगरहून अंतरवली सराटीत जाणार होतो, त्यामुळे जालन्याचे प्रतिनिधी रवी मुंडेंसह चर्चा करून त्यानुसार हायवेजवळचं हॉटेल निवडलं होतं. रात्री 12 वाजता हॉटेलला पोहोचलो. 


आता जालन्यात काय घडलं, संभाजीनगरमध्ये काय नडलं, हे भाग 6 मध्ये पाहू...


याच लेखकाचा हा ब्लॉग वाचा :