BLOG : संभाजीनगरमध्ये आमची तिसरी सकाळ होती. मनोज जरांगे, इम्तियाज जलील आणि चंद्रकांत खैरेंसारख्या बड्या नेत्यांच्या मुलाखती झाल्यामुळे  मन प्रसन्न होतं आणि टेन्शन कमी होतं. फक्त वाईट एकाच गोष्टीचं वाटत होतं की आमचा दौऱ्या लवकर संपणार होता. आम्हाला मुंबई ऑफिसमधून विदर्भ स्कीप करायला सांगण्यात आलं होतं, त्यामुळे बीड हा आमचा शेवटचा स्टॉप असणार होता. आमची संपूर्ण टीम गेली 20 दिवस एकत्र होती. त्यामुळे एक नातं तयार झालं होतं. सगळ्यांशी एक कनेक्शन निर्माण झालं होतं. 


पण असो... जास्त इमोशनल होऊन चालणार नव्हतं. तर आम्ही सकाळी लवकर उठलो. तुफान भूक लागली असल्याने मी आणि अनिल सर पुढे ब्रेकफस्टसाठी गेलो. आजचा ब्रेकफस्ट जरा वेगळा होता... जवळपास 30 ते 35 पदार्थ होते. आम्ही त्यात चिकन सॉसेजेस आणि चिकन स्टिव्ह घेतलं आणि पोटभरून खाल्लं. आमचं होईपर्यंत विनोद सर, सिद्धेश आणि दिपेश सुद्धा आले. साऱ्यांचं आटपताच आम्ही बाहेर पडलो. आमचा पुढचा मुक्काम होता परभणीत. 


संभाजीनगर ते परभणी हे अंतर जवळपास 210 किमीचं होतं. त्यात संध्याकाळी 4 वाजता पंजाबराव डख यांची मुलाखत ठरली होती. सकाळी 11 च्या दरम्यान आम्ही हॉटेल सोडलं... मी आणि विनोद सर अर्थात  बाईकवर आणि बाकी सगळे कारमध्ये. एक पाण्याची बॉटल घेतली आणि निघालो. खरं सांगायचं तर संभाजीनगर ते परभणी कधी पोहोचलो हे कळलच नाही. 210 किमीचं हे अंतर अगदी सहज कापल्या सारखं वाटलं आम्हाला. वाटेत फक्त एकदा उसाचा रस प्यायला थांबलो आणि एकदा पाणी प्यायला. भयंकर ऊन होतं त्यामुळे रस्ता, बाईक आणि आम्ही दोघे... सगळेच तापलो होतो. 


मी विनोद सरांना म्हटलं, जरा एक झाड बघा आणि बाईक साईडला लावा, पाणी घेऊ घोटभर. एक सुंदर अशा झाडाखाली आम्ही बाईक लावली आणि आत्मातृप्त झाला. झाडाखाली गरमी जाणवत नव्हती, त्यात जरा थंडच वाटत होतं. आजूबाजूचा परिसर पाहून जाम भारी वाटलं. दोन्ही बाजूला जंगल, लोकांची शेतं, रस्त्याच्याकडेला झाडं आणि मध्ये रस्ता. फोटो काढण्याचा मोह ना विनोद सरांना आवरला ना मला. 


आम्ही फोटोकाढत असताना... आमची कार येताना दिसली. आम्ही फोटो काढतोय पाहून ते ही थांबणारच होते इतक्यात विनोद सर म्हणाले, "त्यांना सांग पुढे जायला...इथे थांबलो तर झालंच मग.." मी देखील त्यांना हाताने पुढे जाण्याचा इशारा केला आणि 5 मिनिटांनी आम्ही सुद्धा रस्ता धरला. पुढे येताच मी विनोद सरांना अचानक म्हटलं... सर सर थांबा! त्यांना कचकचीत ब्रेक मारला आणि बाईक जागच्याजागी उभी राहीली. सर मला काय झालं विचारणार इतक्यात मी फोन काढला आणि एक फोटो घ्यायला लागलो. माझ्या समोर एक बोर्ड होता त्यावर तीन गावांची नावं लिहिली होती. त्यातील एक गाव होतं 'विटा'.विनोद सरांनी ते पाहिलं आणि डोक्यालाच हात लावला. मला म्हणतात... "तुझं काय अडलंय सांग मला..." मी म्हटलं वेळ आल्यावर नक्की सांगेन. फक्त विनोद सरच नाही तर अनेकांना पडलेला प्रश्न आहे हा. आयुष्यात काही गोष्टी अशा असतात ज्यांच्यासाठी अनेक महत्वाच्या गोष्टी बाजूला सारून थांबतो आपण..त्यातलीच ही एक गोष्ट...पण असो.


तर मी फोटो काढला... इंस्टाग्रॅमवर स्टोरी टाकली आणि पुन्हा मार्गस्थ झालो. आम्ही 2 वाजता परभणीत पोहोचलो... फक्त तीन तासात 210 किमी पार करण्याचं मुख्य कारण म्हणजे रस्ते... एकदम सुसाट. हो पण परभणीच्या हद्दीत येताच पार बाजार उठला होता रस्त्यांचा. 


आम्ही येणार याची कल्पना आम्ही पंकज क्षीरसागर सरांना दिली होती. त्यांनीच आम्हाल  एक हॉटेल सजेस्ट केलं होतं जे आम्ही मुंबईला कळवून बूक केलं. हॉटेलच्या दिशेनं जाताना एका क्षणासाठी वाटलं कुठे आलोय आम्ही.. त्याचं कारण म्हणजे आमच्या आजूबाजूला फक्त घाण होती. संपूर्ण परिसर हा गलिच्छ होता. कसंबसं हॉटेलवर पोहोचलो आणि फ्रेश झालो. वॉशरुममधून बाहेर आलो तर समोर पंकज सर आणि त्यांचा कॅमेरामॅन विशाल. दोघांनाही मी पहिल्यांदा भेटत होतो. परभणीत येताच पंकज सरांना जेवण कुठे केलं तर बरं होईल यासाठी मी फोन केला होता. त्यावर ते म्हणाले होते की मी आल्यावर घेऊन जातो... त्यामुळे पुढचा विषय क्लिअर होता.. आता जेवायला जायचं. 


हॉटेलमधून जेवणासाठी बाहेर पडताना पंकज सर आम्हाला म्हणाले, "आपण जिथे चाललोय ते फार मोठं हॉटेल नाही... छोटा ढाबा आहे... चालेल ना? पण चांगलंय..." त्यांना वाटलं असेल मुंबई-पुण्याची पोरं आहेत... मोठमोठ्या हॉटेलमध्ये जात असतील... आता त्यांना कसं सांगणार आदल्यारात्री संभाजीनगरमध्ये रस्त्यावर बसून भुर्जीपाव खाल्ला होता ते. आम्ही म्हटलं.."चला ओ सर..कुठे काय?"


पुढच्या 10 मिनिटांमध्ये आम्ही एका ढाब्यावर पोहोचलो... एकदम लहान.. आतमध्ये नावाला उजेड आणि हलणारा टेबल. आता पुस्तकाचं कव्हर पाहून जज करायंच नाही असा धडा आयुष्यानं आजवर दिलाच होता त्यामुळे जज कायच करणार आम्ही. पंकज सर म्हणाले... "मटण चांगलं आहे इथलं..मटण घ्या...". ऑर्डर दिली आणि गप्पा मारत बसलो. मुळातच परभणीच्या राजकारणाबद्दल आम्हाला डिटेल माहित नव्हतं. त्यामुळे पंकज सरांकडून सगळं समजून घेत होतो. ते सुद्धा एका शिक्षकाप्रमाणे आम्हाला सगळं शांतपणे सांगत होते.   


बोलता बोलता जेवण आलं आणि राजकारण बाजूले ठेवलं.  भात, मटणाची ग्रेवी आणि दोन भाकऱ्या. महत्वाचं म्हणजे इतर ठिकाणांसारखी भली मोठी भाकरी नव्हती... नॉर्मल साईजची होती. आता प्रत्येकाची भूक ही सारखी नसते... भाकरीचा आकार नॉर्मल ठेवला तर खाणारा व्यक्ती लागली तर आणखी एक घेऊ शकतो. मी अनेकांना पाहिलंय.. भाकरी खाऊन पोट भरतं आणि भात फेकून द्यावा लागतो. इथे असं नव्हतं.. बरं वाटलं. भाकरी संपेपर्यंत पंकज सर म्हणाले... इथली बिर्याणी घ्या... फेमस आहे. आम्ही अन्नाला कधीच नाही म्हणत नाही... मागवली एक प्लेट. खरंच सांगतो मित्रांनो... सोलापुरात आफताबने खायला घातलेली बिर्याणी आणि परभणीत पंकज सरांनी खायला घातलेली बिर्याणी सात जन्मात विसरत नसतो मी... तुफान!


पोट छातीला लागेपर्यंत जेवलो आणि पुन्हा माघारी हॉटेलवर गेलो. 4 वाजता पंजाबरावांना भेटणार होतो...पाऊण तास बाकी होता. 10 मिनिटं झोप काढली आणि परभणीच्या मार्केटमध्ये पोहोचलो. पंजाबराव आमचीच वाट पाहत होते. पंजाबराव म्हणजे एकदम साधा माणूस... सरळ मार्गाने चालणारा माणूस. आम्ही शूटिंग वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून सुरु करणार होतो. त्यामुळे आमची कार आणि बाईक पुढे गेली आणि आम्ही पंजाबरावांच्या कारमधून गेलो. त्यांना मी कारमध्ये कॉन्सेप्ट समजावत होतो शोची पण त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं टेन्शन जाणवलं. कदाचित मीडियासमोर असा शो करण्याची त्यांची ही पहिलीच वेळ होती. मी सिद्धेशला म्हटलं "यांना खुलवणं टास्क असणारे कदाचित..." सिद्धेश म्हणाले.."बघू रे..होईल"


आम्ही विद्यापीठाच्या गेटपासून इंटरव्हिव सुरु केला आणि मुख्य रस्त्याला आलो. कारमध्ये शांत बसलेले पंजाबराव पूर्णपणे खुलले होते. आम्ही त्यांना प्रश्न विचारणं सोडाच.. त्यांनीच आमची शाळा केली... आम्हालाच विचारलं.."तुम्ही इथे कुठे फिरताय?" सर्वाधिक धमाल आली ती थोडं पुढे आल्यावर.. त्यांना विचारलं..तुमचा मतदार कोण? मत कोण देणार? त्यावर त्यांनी उत्तर दिलं आणि शेवटी म्हणाले..."हे बघा मी लोकांना हात दाखवतो...ते ही दाखवतील मला..." आम्ही सगळे तुफान हसलो.


अर्ध्यातासाने मुलाखत संपली.. आम्ही बाईकवरुन उतरलो आणि पंजाबरावांसह फोटोशूट केलं. आमच्यासाठी दिवस तसा संपला होता कारण आज एकच पंजाबरावांची मुलाखत लाईनअप केली होती. पण पंकज सरांनी जादू केली... पंजाबरावांना सोडलं तिथू 25 फुटांवर ठाकरे गटाच्या संजय जाधवांचं ऑफिस होतं. आम्ही पंजाबरावांसह फोटो काढतो इतक्यात पंकज सरांनी जाधवांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना मुलाखतीसाठी तयार केलं. आम्ही जाधवांच्या ऑफिसमध्ये जाताच त्यांनी आम्हाला मस्त गारेगार कोल्ड कॉफी पाजली. जिथे कोणतीही मुलाखत लाईन्डअप नव्हती तिथे पुढच्या 20व्या मिनिटाला संजय जाधव आमच्या बाईकमध्ये बसले होते. हे सगळं घडवून आणारा माणूस म्हणजे... पंकज क्षीरसागर!


एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर एक जिल्हा वगळता शिवसेना प्रत्येक जिल्ह्यात फुटली, तो जिल्हा म्हणजे परभणी. परभणी शिवसेनेसाठी महत्वाचा गड मानला जातो, त्याचं कारण म्हणजे शिवसेनेला धनुष्यबाण याच परभणीने दिलं. 1989 साली अशोक देशमुख शिवसेनेचे उमेदवार होते पण तोपर्यंत पक्षाला मान्यता नव्हती. त्यांच्या विजयानंतर शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह मिळालं. या सगळ्या इतिहासामुळे संजय जाधवांसह चर्चा करण्यात मजा आली.


मुलाखतीनंतर आम्ही गुळाचा चहा घेतला आणि पुन्हा हॉटेलवर आलो. रात्री पंकज सर एका ढाब्यावर जेवायला नेणार होते त्यामुळे रुमवर मस्त लोळत पडलो होतो. रियाज चाचांनी इफ्तारीसाठी भला मोठा कलिंगड आणला होता... सगळे तोच खात बसलो. 


रात्री 9.30 वाजता पंकज सर पुन्हा हॉटेलवर आले आणि आम्ही जेवायला निघालो. आम्हाला वाटलं असेल जवळपास पणे ते ठिकाण भलतंच लांब होतं. अर्धातास झाला तरी हॉटेल येईना.. मला दिपेश म्हणतो... बॅगा घेतल्या असत्या तर इथूनच मुंबईला गेलो असतो. मोठा रस्ता.. दोन्ही बाजूला शेत आणि काळाकुट्ट अंधार.. पुढे पंकज सरांची कार आणि मागे आमची. पुढे दहा मिनिटांनी पंकज सरांच्या कारचा राईट इंडिकेटर सुरु झाला... म्हटलं...आलं वाटतं. उजवीकडे पाहतो तर जंगल आणि त्यातून एक कार जाईल इतकाच रस्ता. मनात म्हटलं कुठे चाललोय देव जाणे... 


खरं सांगतो मला अभिजीत पानसेंच्या रेगे सिनेमातील शेवटचा सीन आठवला. आम्ही कारमध्ये रेगेचीच चर्चा करत होतो इतक्यात कार थांबली. उजवीकडे एक छोटा ढाबा होता. एका फिल्ममध्ये असतो तसाच. त्या ढाब्यावर एक मुलगा आणि एक चाचा असे दोघेच होते. पंकज सरांनी सगळी ऑर्डर सांगून ठेवली होती त्यामुळे वेट करावं लागलं नाही... मस्त पैकी गावठी कोंबडीच्या अंड्याचं ऑम्लेट... गावठी कोंबड्याचा मसाला.. रोटी आणि भात. चोहीबाजूला शेती, डोक्यावर मोकळं आकाश आणि हलकासा गार वारा... लय भारी वातावरण होतं...पंकज सरांनी माहोल केला होता.


दोन तास आम्ही तिथेच होतो... जेवण झाल्यावर रात्री 12 वाजता पुन्हा हॉटेलवर पोहोचलो. पंकज सरांनी एक धक्का दिला. म्हणाले, "सकाळी 7 वाजता महादेव जानकरांची मुलाखत करायची आहे. ते तयार नव्हते पण आपण त्यांना कन्विंस केलंय." आम्ही सकाळी उठण्याच्या टेन्शनमध्येच झोपलो.


सकाळी कधी नव्हे ते सगळे वेळेवर उठले आणि 7 वाजण्याच्या आधीच आम्ही विद्यापीठाजवळ पोहोचलो. इथे पोहोचल्यावर कळलं की लाईट उलट आहे त्यामुळे आपण जानकर जिथे आहेत तिथूनच सुरु करू. महादेव जानकरांना जरा घाईच होती.. आमची कार यायला आणि जानकर निघायला. मला वाटलं चालले की काय पण नाही. ते म्हणाले, "मी जरा RSSच्या कार्यालयात जाऊन येतो."


जानकरांनी शब्द पाळला. मला वाटलं होतं हे काय आता येत नाही माघारी, पण अर्ध्यातासात 'ही वॉज बॅक'. मी हे इंग्रजीत लिहिलं कारण जानकरांना इंग्रजी भाषा फार आवडते. त्याबाबत मी त्यांनी मुलाखतीत विचारलं सुद्धा. त्यावर ते म्हणाले की, "मला इंग्रजी भाषा आवडते म्हणून मी बोलत असतो अधून मधून."


जानकरांची मुलाखत आटपली आणि आम्ही पुन्हा मार्केटमध्ये गेलो. तिन्ही उमेदवारांची मुलाखत झाली होती पण लोकांसह संवाद बाकी होता. भाजीवाल्या आजोबांपासून भाजी खरेदी करणाऱ्या काकूंपर्यंत सगळ्यांशी गप्पा मारल्या. त्यात एक जम तर इतका कट्टर होता की मला म्हणतो, फक्त बंडू बॉस... मोदींना तडीपार करणार... त्याचं वय 18 होतं पण डायलॉगबाजी तुफान. यात बंडू बॉस म्हणजे संजय जाधव. त्यांना प्रेमाने लोक बंडू म्हणतात.


लोकांच्या बाईट्स झाले आणि आम्ही पेटपूजा करायचं ठरवलं. जवळच एक साऊथ इंडियन हॉटेल होतं. खानावळीचाच एक प्रकार होता तो. मी मुळात साऊथ इंडियन फक्त ठराविक ठिकाणी खातो. मुंबईत रामाश्रय, आर्य भवन आणि आनंद भवन. पुण्यात वैशाली, रुपाली आणि समुद्रमध्ये. पण कोल्हापूरचा अनुभव छान होता... म्हटलं करु ट्राय. आधी मेदू वडा मागवला आणि तो खाताखाता अनिल सरांच्या ताटातला ऑनियन उत्तप्पा टेस्ट केला... डायरेक्ट ढगात! इतका भारी उत्तपा मी मुंबईतही खाल्ला नव्हता. ऑनियन उत्तप्प्यात ऑनियनचा पाऊस पाडला होता आणि कांदा हलका करपेपर्यंत उत्तप्पा भाजला होता. खूप भन्नाट टेस्ट होती. पोटभर खाल्ल आणि बाहेर पडलो. बाईकवर बसायला जातो इतक्यात विशाल म्हणाला, "बाईक मी घेतो". आमच्या बाईकवर विशाल आणि पंकज सर तर विशालच्या स्प्लेंडरवर मी आणि अनिल सर. 


पुढच्या दहा मिनिटांत हॉटेलवर पोहोचलो. चेकाआऊट करायंचं बाकी होतं त्यामुळे पटकन वर गेलो आणि बॅग भरली. खाली चेकआऊट करता करताच पंकज सर आणि विशालचा निरोप घेतला आणि ते त्यांच्या कामासाठी रवाना झाले. 


संपूर्ण दौऱ्यावर सगळ्या स्थानिक प्रतिनिधींनी आम्हाला VIP ट्रिटमेंट देत मदत केली. आम्हाला कुठेच त्रास झाला नाही... पण त्यातही पंकज सरांनी केलेल्या अरेंजमेंट्स, लाईनअप हे फार कट टू कट आणि सरळ होतं. या माणसाने आम्हाला अगदी लहान भावांप्रमाणे जपलं. मी सोलापूरच्या ब्लॉगमध्ये म्हटलं होतं की आपल्या आयुष्यात एकतरी आफताब हवाच... त्याच प्रमाणे आपल्या आयुष्यात एक तरी पंकज सर हवेच! माझ्या सात पिढ्या पंकज क्षीरसागर हे नाव विसरणार नाही!


हॉटेलमधून चेकआऊट केलं आणि पुढच्या मुक्कामासाठी निघालो. अंतर फार नव्हतं... परभणीपासून 75 किमी..जिल्हा नांदेड!


पुढची कहाणी... भाग 09 मध्ये.


याच लेखकाचा संबंधित ब्लॉग वाचा: