BLOG : भारतात दर तासाला 52 अपघात म्हणजे दर मिनिटाला साधारण एक अपघात होतो. त्यात दररोज 461 म्हणजे दर तासाला साधारण 20 लोक आपला जीव गमावतात. ही आकडेवारी चिंताजनक आहे. रस्ते अपघातात जगभरात 13 लाखांपेक्षा जास्त लोक मृत्यूमुखी पडतात. त्यातले 90 टक्क्यांपेक्षा जास्त जीव अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील देशांमध्ये जातात. भारतात दर वर्षी होणाऱ्या रस्ते अपघातांची संख्या साधारण साडेचार लाख आहे. या रस्ते अपघातात जवळपास पावणे दोन लाखांपेक्षा जास्त लोक मृत्यूमुखी पडतात.


केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अहवालातील एका आकडेवारीनुसार 2022 या वर्षात देशात एकूण 4 लाख 61 हजार 312 रस्ते अपघात झाले. त्यामध्ये 1 लाख 68 हजार 491 व्यक्तींचा मृत्यू झाला तर 4 लाख 43 हजार 366 जण जखमी झाले. या अपघातांमागे अतिवेगाने वाहन चालवणे, निष्काळजीपणे वाहन चालवणे, दारू पिऊन वाहन चालवणे, वाहतूकविषयक नियमांचे पालन न करणे ही महत्वाची कारणं आहेत. 


महाराष्ट्रात सुद्धा अपघातांची आणि बळींची संख्या मोठी आहे. फक्त राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांचा विचार केला तर देशात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. 2022 सालात महाराष्ट्रात 33 हजार 383 अपघात झाले, त्यात 15 हजार 224 लोक मृत्यूमुखी पडले. त्यात महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या अपघातांचा वाटाही मोठा आहे. 


राज्यातील राष्ट्रीय महामार्गावर 9 हजार 417 अपघात झाले त्यात 4 हजार 923 लोकांनी आपला जीव गमावला. राज्य महामार्गावरील अपघातातही महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे, राज्य महामार्गावरील अपघातात 3 हजार 820 लोकांचा बळी गेला आहे. जीवघेण्या 14 हजार 58 अपघातांपैकी 10 हजार 157 अपघात ग्रामीण भागात झाले आहेत तर 3 हजार 901 अपघात शहरी भागात झाले आहेत. 


मद्याच्या धुंदीत गाडी चालवल्यामुळे 335 अपघात झालेत, त्यात 133 बळी गेले आहेत तर 269 जखमी झाले आहेत ज्यातल्या गंभीर जखमींची संख्या 172 आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक रस्त्यांचं जाळं आणि सर्वाधिक 3 कोटी 77 लाख मोटर वाहनांची संख्या आहे. त्या तुलनेत अपघात आणि बळींची संख्या कमी वाटत असली तरी तो फक्त स्टॅटिस्टिक्सचा मुद्दा आणि त्यातून आपलं समाधान करुन घेण्याचा प्रयत्न असू शकतो. प्रत्यक्षात एकही माणूस रस्ते अपघातात जखमी होणं किंवा जीवानिशी जाणं हा त्या कुटुंबासाठी, नातेवाईकांसाठी मोठा आघातच असतो. त्यांचं होणारं नुकसान कोणत्याच आकड्यात लपणं शक्य नसतं.


पुणे कल्याणीनगर पोर्शा कारचा अपघात भीषणच आहे. पण याची जास्त चर्चा झाली कारण त्यात अनेक गोष्टी अशा घडल्या ज्याने सर्वसामान्यांचं लक्ष वेधून घेतलं गेलं. दोन सव्वा दोन कोटींची पोर्शा गाडी... धनाढ्य बिल्डरचा अल्पवयीन मुलगा.. मद्याच्या अमलाखाली त्याने बेदरकार कार चालवणं आणि दोन निष्पाप जीवांचं चिरडलं जाणं. त्यानंतर सरकारमधील एका पक्षाच्या आमदाराने स्वत: मध्यरात्री पोलीस ठाण्यात जाणं... त्यात पोलिसांनी प्रकरण फारसं गांभीर्याने घेतलंय असं न वाटणं... रुग्णालयातही निकष कठोरपणे पाळले गेले नाहीत असे आरोप होणं.. न्यायालयाने या मुलाला तात्काळ सोडणं आणि हाईट म्हणजे त्याला दिलेल्या शिक्षेत त्याला 300 शब्दांचा निबंध लिहायची शिक्षा देणं... या सगळ्या गोष्टींमुळे हा अपघात राज्यभर-देशभर चर्चेत राहिला. यात राजकारण आल्यामुळे याची गंभीर दखल घेतली गेली. हे नसतं झालं तर कोणी सांगावे हा अपघात देशात वर्षाला घडणाऱ्या इतर 4 लाख अपघातांपैकी एक बनून गेला असता.


नशीब काही लोकांनी व्हिडीओ काढले आणि त्यामुळे निदान काही न नाकारता येणारे पुरावे तरी हाती आले. आपली सिस्टम प्रत्येक लेव्हलला किती कॉम्प्रमाईज होऊ शकते याची जाणीव या अपघाताने आणि अपघातानंतरच्या घटनाक्रमांनी पुन्हा झाली. 


असे प्रकार  टाळता येणं शक्य आहे आणि त्यासाठी बस एक बंदा काफी असतो हे आपण याआधी पाहिलंय. कुणीतरी कुठेतरी पाठीचा कणा दाखवतं आणि अन्यायाला वाचा फुटते. इथेही ते होईल आणि पुणे अपघातात जीव गमावलेल्या त्या दोन निष्पाप जीवांना, त्यांच्या नातेवाईकांना न्याय मिळेल अशी आशा करुयात.