BLOG : गेले काही दिवस कुळांगल (2021) ची चर्चा आहे. भारतानं ही तामिळ फिल्म ऑस्करला पाठवलेय. पॅबल्स असं कुळांगलचं इंग्रजी नाव, म्हणजे गारगोट्या. पॅबल्सची घोषणा होताच त्यानंतर एक बोंब उठली. ब्रिटन विरोधात असल्यानं उधम सिंग (2021) चा पत्ता कट झाला. शूजीत सरकारचा उधम सिंग अमेझॉन प्राईमवर आला. सिनेमाची चांगली हवा झाली. आता ऑस्कर इंट्रीच्या निमित्तानं पुन्हा चर्चेत आला. पॅबल्स या चर्चांपासून दूर आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल सर्किटमध्ये धुमशान करतोय. रॉटरडम फिल्म फेस्टिवलमध्ये गोल्डन लायन मिळाला. एक एक करत सर्वच महत्त्वाचे फिल्म फेस्टिवल पॅबल्सनं काबिज केले. परदेशात प्रदर्शित झाला. प्रेक्षक आणि क्रिटीक्सनी डोक्यावर घेतला. भारतात काही मोजके पेपर आणि एखाद चॅनेल सोडलं तर कुणाला पॅबल्सचं सोयरं सूतक नव्हतं. 


ऑस्करला सिनेमा पाठवण्याची जबाबदारी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची असते. या अंतर्गत येणाऱ्या फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाची ज्युरी समिती बसते. ती भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सिनेमाची निवड करते. ऑस्करला जाणारा सिनेमा अस्सल भारतीय असावा, त्याचबरोबर तो जगात कुठल्याही भागातल्या प्रेक्षकांना आकर्षित करणारा असावा अशी अपेक्षा असते. त्यानंतर अकाडमी ऑफ मोशन पिश्चर आर्ट्स एन्ड सायन्स अर्थात ऑस्करचे जगभरात पसरलेले सुमारे दहा हजार सदस्य हा सिनेमा पाहतात. त्यांच्या मतांवर हा पुरस्कार मिळतो. आपला सिनेमा 'बेस्ट इंटरनॅशनल सिनेमा' या कॅटेगरीमध्ये स्पर्धा करतो. तो या सर्वांना प्रभावी वाटला तर तो विजेता ठरतो. या सर्वांचा विचार केल्यास पॅबल्स इतर देशांच्या सिनेमांशी चांगला स्पर्धा करु शकतो. 


पॅबल्स हा सिनेमा तामिळनाडूतल्या ग्रामीण भागात घडतो. यात दारुड्या, तुसड्या बाप आणि त्याच्या 10 वर्षांच्या मुलाचा प्रवास आहे. हा प्रवास रणरणत्या उन्हातून घडतोय. दिग्दर्शक विनोथराजचा हा पहिलाच सिनेमा आहे. त्याचं आपल्या भवतालचं निरीक्षण चांगलं आहे. अर्ध्याहून अधिक सिनेमात बाप-लेकाचा रणरणत्या उन्हातला प्रवास सुरु आहे. यावेळी त्यानं तामिळनाडूच्या दुष्काळग्रस्त भागात नक्की काय सुरु आहे, याची नेमकी मांडणी दिग्दर्शक विनोथराजनं केलीय. 


भारतासारखा विकसनशील चंद्रावर यान पाठवतो. ते यशस्वी होत नाही. पण आपण आशावाद सोडलेला नाही. याच देशात उंदीर खाऊन जगणारी माणसं ही राहतायत. हे विनोथराज दाखवतो. हे उंदीर सहजासहजी मिळत नाहीत. त्यासाठी एका कुटुंबातल्या 80 वर्षांच्या आजीपासून तिच्या 5-6 वर्षांच्या नातवापर्यंत सर्व कुटुंब कामाला लागलंय. हे सर्व तापलेल्या वातावरणात बघणाऱ्याच्या अंगावर काटा उभा करतात. 


सिनेमाचा नायक तुसडा, नेहमीच तणतणारा, बेवडा बाप आहे.  त्याची बायको भांडण करुन माहेरी गेलीय. ती गेल्यानंतर घर चालवण्याची जबाबदारी या बाबाला जमत नाहीय. म्हणूनच तिला परत आणण्यासाठी निघालाय. मुलाला बरोबर नेलं तर ती येईलच असं त्याला पक्क वाटतंय. म्हणून त्यानं मुलाला थेट शाळेतल्या वर्गातून उचलून आणलाय. त्यांच्या या प्रवासात भारतातला पितृसत्ताक समाज दिसतो. निर्णय घेणारा हा घरातला कर्ता करविता पुरुषच आहे. बाईला आपलं असं मत नाही. ना घर सोडण्याचं आणि परत घरी जाण्याचं. कारण तिचे माहेरची पुरुष मंडळी ती परत जाणार की नाही याचा निर्णय घेतात. ही अशी सर्व परिस्थिती नव्या भारतातही तशीच आहे. असं प्रखर सबटेक्स्ट पॅबलमध्ये विनोथराजनं मांडलंय. 


पॅबल ऑस्कर पुरस्कार भारतात आणेल की नाही ही पुढची बाब आहे. पण आज भारताची परिस्थिती काय आहे, हे जगाला नक्की दाखवेल हे नक्की. ही ताकद उधम सिंगमध्ये नव्हती म्हणून कासवगतीने पॅबल्स पुढे गेला आणि स्पर्धेत जिंकला.